कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा
- जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे निर्देश
कोरोनाबाबत लक्षणे दिसताच सर्व प्रकारची दक्षता घेणे आवश्यक आहे. यात निदान व उपचाराच्या प्रक्रिया गतीने राबविणे आवश्यक आहे. मृत्यूदर कमी होण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
कोरोना उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेताना ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, आजाराचे निदान होण्यापूर्वी सिटी स्कॅन काढल्यावर त्यावर कोरोनासदृश्य लक्षण आढळल्यास आरटीपीसीआर चाचणीद्वारे तपासणी करणे आवश्यक आहे. लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करणे व दाखल करून घेणे ही प्रक्रिया गतीने होण्याची गरज असते. यात कुठेही हलगर्जी होऊ नये. गृह विलगीकरणातील व्यक्तींना टेलिमेडिसिनद्वारे सेवा पुरविण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचेही योगदान मिळणे आवश्यक आहे. गृह विलगीकरणातील व्यक्तींशी सतत संपर्क असावा. कुठलेही लक्षण आढळल्यास दाखल करणे व उपचाराच्या हालचाली तत्काळ व्हाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
No comments:
Post a Comment