बांग्लादेशींना खोटे पुरावे प्रकरणी समिती स्थापन
*पोलिसांचा स्वतंत्रपणे तपास
अमरावती, दि. 9 : अंजनगाव सुर्जी येथे बांग्लादेशी, रोहिंग्या मुस्लिमांना खोटे पुरावे दिल्याच्या तक्रारीवरून खबरदारीचा उपाय म्हणून दर्यापूर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच याबाबत पोलिसही स्वतंत्ररित्या तपास करीत आहे.
मालेगाव येथील बांग्लादेशी, रोहिंग्या मुस्लिम यांना खोट्या पद्धतीने जन्माचा दाखला देण्यासंदर्भात माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री यांना एसआयटी नियुक्त करण्याबाबत विनंती केली आहे. तसेच अशाच प्रकाराचे प्रकरण राज्यात अन्य ठिकाणीही होत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या ६ महिन्यात एक हजाराहून अधिक बांग्लादेशी, रोहिंग्या मुस्लिम यांना खोटे पुरावे दाखले, कागदपत्राच्या आधारावर जन्माचा दाखला अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांनी दिले आहेत, असे तक्रारीत नमुद आहे. त्यामुळे मालेगावसाठी नियुक्त केलेल्या एसआयटीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून त्यात अंजनगांवसुर्जी तालुक्याचाही समावेशाची विनंती केली आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी, दर्यापूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. यात उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी सदस्य आहेत. सदर समितीस नमुद तक्रारीत देण्यात आलेले जन्माचे दाखले आणि त्यासाठी देण्यात आलेले पुरावे याची कसून तपासणी करण्याबाबत, तसेच समितीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबत पोलीस विभागही त्यांच्या स्तरावर सखोल तपास करीत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे.
00000
अमरावती , दि . 9 (जिमाका) : धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत न्युक्लिअस बजेट योजनेतंर्गत आदिवासी बांधवांसाठी वर्षभर विविध योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गंत मंजूर योजनांचा लाभ घेण्यासाठी अनूसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज निःशुल्क मागविण्यात येत आहेत. प्रसिध्दी दिनांकापासून अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख दिनांक 14 फेब्रुवारी 2025 राहील. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, सहायक जिल्हाधिकारी तथा धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे .
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी कार्यक्षेत्राअंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2024-2025 अंतर्गत मंजूर योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून योजनांचे अर्ज निःशुल्क मागविण्यात येत आहेत. या योजनांचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर, तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय, धारणी या ठिकाणी अर्ज उपलब्ध आहेत. तसेच नांदगाव खंडेश्वर, भातुकली, अमरावती, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती येथे अर्ज उपलब्ध आहेत. तसेच मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी विकास शाखा, दूरध्वनी क्र. 07226-224217 येथे संपर्क साधावा.
पुढील योजनांसाठी अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत :
आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन संच 85% अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना शेतीच्या संरक्षणासाठी तार जाळी, सोलर फेंसिंग 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी महिला बचतगटांना 85 टक्के अनुदानावर कृषी अवजारे बँक उघडण्यासाठी अर्थसहाय्य देणे, आदिवासी महिलांना 85 टक्के अनुदानावर सोयाबीन, गहू, मका इत्यादी पीक कापणीसाठी कापणी यंत्रण (ब्रश कटर) पुरवठा करणे, आदिवासी लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाचा 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी महिला पुरुष बचत गटांना अगरबत्ती मेकींग मशिन 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी महिला बचत गटांना पापड मेकींग मशीन 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी सुशिक्षित युवक-युवतींना 85 टक्के अनुदानावर होजियरी मशीन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, आदिवासी बचत गट, समुह यांना 85 टक्के अनुदानावर मंडप डेकोरेशन, डी.जे. साऊंड इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी अर्थ सहाय्य देणे, आदिवासी युवतींना 85 टक्के अनुदानावर शिलाई मशीन खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे तसेच आदिवासी बचत गट, समुहाला लाकडापासून कलात्मक शोभेच्या वस्तू तयार करुन विक्री करण्यासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थ सहाय्य करणे या योजनांचा समावेश आहे.
वरील योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करुन पात्र तसेच अपात्र अर्जदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करताना दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परित्यक्ता, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल.
वसतिगृहाच्या विद्यार्थांच्या वाचनालयासाठी इमारत मिळण्यासाठी आवाहन
अमरावती , दि . 9(जिमाका) : आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या विद्यार्थांसाठी दोनशे आसन क्षमतेच्या वाचनालयासाठी अमरावती शहरात इमारत भाडेतत्त्वावर मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे .
प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या वाचनालयासाठी दोनशे आसन क्षमतेची इमारत भाडेतत्त्वावर हवी आहे. यासाठी संबंधितांनी प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, धारणी येथे सादर करावे. या वाचनालयासाठी भाडेतत्त्वावरील इमारतीचे प्रस्ताव सादर करत असताना इमारत भौतिक सोयी-सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण इमारत असणे अनिवार्य आहे. प्रकल्प कार्यालय, धारणीचे ई-मेल - poitdp.dharni-mh@gov.in/
राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि.९ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना राबविण्यात येते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार या योजनेंतर्गत निवडी अंती सन २०२४ चे राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकांसाठी दि.१ जानेवारी, २०२५ ते ३१ जानेवारी, २०२५ या विहित कालावधीत प्रवेशिका मागविण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर प्रवेशिकेच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे उपलब्ध आहेत. दिनांक १ जानेवारी, २०२५ ते ३१ जानेवारी, २०२५ या विहित कालावधीत या कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रवेशिका व पुस्तके खास दूतामार्फत किंवा टपालाने दि. १० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत , दुसरा मजला ,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५ या कार्यालयात पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे. आपल्याकडील प्रवेशिका दि . १० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत या कार्यालयाकडे पाठविण्यास संबंधितांना सूचना द्याव्यात. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे .
***
--
No comments:
Post a Comment