Friday, January 3, 2025

DIO NEWS AMRAVATI 3.1.2025

 













सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

             अमरावती, दि. 3 (जिमाका) : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

यावेळी अधीक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 00000

विकासासाठी महिलांना प्रोत्साहन देण्यात यावे

                     -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 3 : महिलांमध्ये विकासाची मोठी क्षमता आहे. त्या कोणतेही काम करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 मेळघाट हाट येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महिला व बालविकास उपायुक्त विलास मरसाळे, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, प्रमुख वक्त्या क्षिप्रा मानकर, आहारतज्ज्ञ दिपाली भैसे आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, संपूर्ण समाज मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात असताना सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकविले. महिलांच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने शिक्षण महत्वाचे ठरले आहे. महिलांच्या शिक्षणामुळे आज सर्व क्षेत्रात महिलांचा पुढाकार आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी माविम चांगले कार्य करीत आहे. नुकत्याच झालेल्या महालक्ष्मी सरसमध्ये जिल्ह्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. बचतगटांना मेळघाट हाटच्या माध्यमातून पॅकेजिंग, ब्रँडींगची सुविधा दिल्यामुळे विविध संकेतस्थळावरून या वस्तूंची विक्री होणार आहे. महिलांवर टाकलेला विश्वासाने केलेले कार्य सार्थ ठरविले आहे.

 श्रीमती महापात्र यांनी, महिलांनी एकमेकींना प्रोत्साहित आणि पाठींबा देण्याची गरज आहे. सुदैवाने राज्यातील महिला सक्षम आहेत. महिलांनी वस्तू उत्पादीत करताना त्यांच्या पॅकेजिंगवरही लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना केवळ प्रोत्साहनाची गरज आहे. पर्यटन विभागाने 15 लाख कर्ज देणारी आई योजना जाहिर केली अहो. याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

 प्रमुख वक्त्या क्षीप्रा मानकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर प्रकाश टाकला. पतीच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी महिला शिक्षणाचे कार्य नेटाने पार पाडले. तसेच केशवपनाविरूद्ध न्हाव्यांचे मतपरिवर्तन करून त्यांचा सहभाग करून घेतला. त्यासोबतच त्यांनी साथीच्या काळात अमुल्य योगदान दिले. महिलांनी त्यांचा वैचारिक वारसा जपावा, असे आवाहन केले.

 यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या रांगोळीभोवतील 194 दिवे प्रज्वलीत करण्यात आले. याठिकाणी सकस आहार स्पर्धा घेण्यात आली. तसेच पिंक ई-रिक्षाचे सादरीकरण करण्यात आले.

 यावेळी सकस आहार स्पर्धेतील प्रथम अरूणा वंजारी, द्वितीय विणा जामनिक, आणि तृतीय गौतमी म्हैसकर यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या सरिता किल्लेदार, कृष्णमूर्ती ढेरे, भाग्यश्री खरकाटे, निलिमा बोबडे, अर्चना बोबडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रविणनगर येथील सिदरा महिला बचतगटाला सहा लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. एकता अल्पसंख्याक लोकसंचालित साधन केंद्राच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

 00000

मुलींचे पालक, नातेवाईकांच्या शोध घेण्यासाठी

सहकार्य करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 3 (जिमाका) : बाल कल्याण (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार अनाथ, सोडून दिलेल्या,  त्याग केलेल्या त्याग केलेल्या बालकांची माहिती प्रसारित करुन दत्तकपूर्वी बालकांचे नैसर्गिक आई-वडील मिळावे, नातेवाईकांचा शोध लागावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतात. या अनुषंगाने खालील मुलीच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे यांनी केले आहे.   

 कु. सिता प्यारासिंग पवार, वय 14 वर्षे 3 महिने ही बालिका रेल्वेमध्ये तिच्या वडिलांच्या सक्तीमुळे भीक मागताना पोलिसांना आढळली. पोलीसांनी तिला अॅडिशनल चिल्ड्रेन होम, मानखुर्द  येथे दि. 15 मार्च 2015 रोजी दाखल केले. तिला आई नसून वडील दारुच्या आहारी गेले आहेत. दि.16 सप्टेंबर 2015 रोजी मानखुर्द बालकल्याण समितीने अमरावती येथील शासकीय मुलींचे निरीक्षण गृह, बालगृह येथे या बालिकेला दाखल केले. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रवेशितेचे जन्मदाते किंवा कोणतेही नातेवाईक यांचा शोध लागलेला नाही किंवा तिला भेटण्यास आले नाहीत.   

 कु. लक्ष्मी जनकरामसिंह धुर्वे, वय 15 वर्षे 11 महिने  ही बालिका वरुड बसस्थानकावर बेवारस स्थितीत फिरत असताना सामाजिक कार्यकर्त्यास आढळली. त्यांनी अमरावती येथील बाल कल्याण समिती येथे सदर बालिकेला त्यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी या बालिकेस सदाशांती बालगृह, वृंदावन कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे दि.25 एप्रिल 2014 केले. ही बालिका तिच्या आईचे नाव केवळ शांता असे सांगते. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रवेशितेचे जन्मदाते किंवा कोणतेही नातेवाईक यांचा शोध लागलेला नाही किंवा तिला भेटण्यास आले नाहीत.      

 कु. राणी बुधिया पवार, वय 11 वर्षे 4 महिने 25 दिवस ही बालिका प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला सामान्य रुग्णालय,जालना येथे उपचारासाठी  दाखल करण्यात आले. तब्येत सुधारल्यानंतर तिला बाल कल्याण समिती, जालना यांच्यासमोर हजर करण्यात आले असता तिचा राहण्याचा पत्ता अमरावती जिल्ह्यातील मोगरा, ता. चांदुर रेल्वे येथील असल्याचे सांगितले. त्या पत्त्यावर विचारपूस केली असता, अलिशान बुधिया पवार, हा तीन महिन्यांपासून घरुन पळून गेल्याचे समजले. परंतु  बुधिया हिच्या नातेवाईकांचा पत्ता मिळाला नाही. बाल कल्याण समिती,जालना यांच्या आदेशाने तिला अमरावती येथील शासकीय मुलींचे अनुरक्षण गृह,बाल गृह, येथे स्थानांतरित करण्यात आले व तेथून दि.10 डिसेंबर 2019 रोजी सदाशांती बालगृह येथे तिच्या पुढील संगोपन व पुर्नवसनासाठी बाल कल्याण समितीच्या आदेशाने दाखल करण्यात आले. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रवेशितेचे जन्मदाते किंवा कोणतेही नातेवाईक यांचा शोध लागलेला नाही किंवा तिला भेटण्यास आले नाहीत.    

 कु. दिशा योगेश इंगळे, वय 14 वर्षे 13 दिवस ही बालिका तिच्या दुसऱ्या मानलेल्या आईकडून मानसिक व शारीरिक छळामुळे खोलापुरी गेट पो. स्टे.येथे तक्रार प्राप्त झाल्याने बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार बाल कल्याण समितीच्या आदेशाने तिला शासकीय मुलींचे निरिक्षणबाल गृहात दाखल केले. पुढील संगोपन व पुर्नवसनाच्या दृष्टीने तिची बदली दि. 1 जून 2019 रोजी सदाशांती बालगृह येथे केली. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रवेशितेचे जन्मदाते किंवा कोणतेही नातेवाईक यांचा शोध लागलेला नाही किंवा तिला भेटण्यास आले नाहीत.

 कु.सीमा हिरालाल मावस्कर, वय 14 वर्षे 3 महिने 1 दिवस ही बालिका वडाळा रेल्वेमध्ये तिच्या सावत्र वडीलांच्या सक्तीमुळे भीक मागताना पोलीसांनी आढळली. पोलीसांनी तिला चिल्ड्रेन होम, उमरखेड ,मुंबई येथे  दि. 23 मार्च 2015 रोजी पोलीसांनी दाखल केले. तिचे मानलेले सावत्र वडील जबरदस्तीने रेल्वेमध्ये कोलांट्या उड्या मारुन भीक मागण्यास बाध्य करत होते. दि. 29 सप्टेंबर 2015 रोजी तिला शासकीय अभिक्षण गृह, निरीक्षण गृह, अमरावती  येथे बाल कल्याण समिती येथे दाखल करण्यात आले. व तेथून पुढील संगोपन व पुर्नवसनासाठी दि.20 ऑक्टोबर 2015 रोजी तिला सदाशांती बालगृह येथे बाल कल्याण समितीच्या आदेशाने दाखल करण्यात आले. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रवेशितेचे जन्मदाते किंवा कोणतेही नातेवाईक यांचा शोध लागलेला नाही किंवा तिला भेटण्यास आले नाहीत.     

वरील पाचही मुलींचे पालक तसेच नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, एक महिन्याच्या आत सदाशांती बालगृह, वृंदावन कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे मो. क्र. 9823896913 या  क्रमांकावर अथवा तसेच बाल कल्याण समिती, अमरावती किंवा बाल संरक्षण कक्ष, गाडगेनगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे यांनी केले आहे.  

 

00000 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 23.06.2025

                                                                        शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत *जिल्हा परिषदेच्या...