मेळघाट हाट येथील खादी महोत्सव 25 जानेवारीपर्यंत
अमरावती, दि. 20 (जिमाका): प्रजासत्ताक दिनानिमित्त
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने
बस स्टॉड समोरील सायन्सकोर मैदान येथील मेळघाट हाट येथे खादी महोत्सवाला सुरवात झाली
असून 25 जानेवारी 2025 पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. अमरावतीकरांनी मोठ्या संख्याने
खादी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक
विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी
व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्ह्यात विकेंद्रीत सोलर चरखा समुह कार्यक्रम राबविण्यात
येत असून उद्योग विभागाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक समुह विकास कार्यक्रमातंर्गत
सोलर चरखा समुहासाठी सामुहिक सुविधा केंद्र अमरावती एम. आय. डी. सी. क्षेत्रात प्रस्थापित
करण्यात आले आहे.
या प्रकल्पातंर्गत खादी व सोलर चरख्यापासून अनेक
दर्जेदार उत्पादने तयार केले जात असून यामध्ये ग्रामीण भागातील 300 पेक्षा जास्त महिलांना
रोजगार प्राप्त झाला आहे. यामध्ये धारणी तालुक्यातील शंभर महिलांचा समावेश आहे.
या प्रकल्पातंर्गत उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध
व्हावी या हेतूने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. 20 ते 25 जानेवारी 2025
पर्यंत खादी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये विविध दर्जेदार खादी उत्पादने
सवलतीच्या दरात अमरावतीकरांना उपलब्ध होणार आहेत. तसेच मेळघाटातील महिला बचत गटांनी
तयार केलेली विविध दर्जेदार उत्पादने मेळघाट हाट येथे विक्रीस उपलब्ध आहेत.
00000
महिला
तक्रार निवारण समितीची स्थापना करण्याचे
महिला
व बाल विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 20 (जिमाका) : कामाच्या ठिकाणी
महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात इतर
खाजगी क्षेत्र, इंटरप्रायजेस, सहकारी संस्था, क्रीडा संकुल, प्रेक्षागृह, मॉल्स, अशासकीय
व संघटना, ट्रस्ट, रुग्णालय, शुश्रूषालय, क्रीडा संस्था, वाणिज्य, शैक्षणिक, औद्योगिक
कार्यालय, संस्था इत्यादीमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार निवारण
समिती गठीत करणे बंधनकारक केले आहे. अन्यथाा अंतर्गत समिती स्थापन न करणाऱ्या कार्यालयांचे
परवाना रद्द किंवा व्यवसाय पुढे
सुरु ठेवण्यास मज्जाव करण्यात येईल.
अंतर्गत तक्रार समितीमध्ये किमान 5 सदस्य असावेत,
समितीची अध्यक्षा महिलाच असावी, समितीमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त महिलांचा समावेश असावा व एका अशासकीय
सदस्याचा समावेश करण्यात यावा. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण
(प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम- 2013 मधील कलम-26 नुसार जर एखादया मालकाने (अ)
अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही (ब) कलम 13, 14 व 22 नुसार कारवाई केली नाही
(क) या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला
50 हजार रुपयापर्यंत दंड होईल तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास परवाना रद्द, दुप्पट
दंड अशी तरतुद आहे.
सदर अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व कार्यवाही
करण्यासाठी 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व शासकिय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापना यांनी आपल्या कार्यालयात
अंतर्गत तक्रार समिती दि. 27जानेवारी2025 पर्यंत गठित करून तसा फलक कार्यालयाचे दर्शनी
भागात लावावे. अन्यथा दंडात्मक
कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेले आहेत. तरी सर्व
कार्यालयांमध्ये तात्काळ अंतर्गत तक्रार समिती गठित करण्यात येवून तसा अहवाल जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी, अमरावती यांचेकडे dwcdoamravati@gmail.com
यावर करावा. तसेच संपर्क क्रमांक 0721-25775911
यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
00000
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यात प्रचालन कार्यशाळा
संपन्न
अमरावती, दि. 20 (जिमाका): महाराष्ट्र राज्यामध्ये
निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी
आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या
जिल्हा हे निर्यात केंद्र
या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी विकास आयुक्त उद्योग, उदयोग संचालनालय, मुंबई यांनी
निर्देश दिले आहेत. अमरावती जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे निर्यात प्रचलन कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांनी दीप प्रज्ज्वलन
करून केले. उद्योग सहसंचालक विभाग
निलेश निकम यांनी प्रस्ताविकामध्ये उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची
सविस्तर माहिती दिली तसेच अमरावती जिल्हा टेक्स्टाटाल, संत्री उत्पादनात अग्रेसर आहे.
उत्पादनाबरोबरच निर्यात होणेही महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
कार्यशाळेस उपस्थित विविध यंत्रणांचे अधिकारी ,प्रतिनिधी
यांनी मार्गदर्शन केले. श्रीमती स्नेहल ठोके, अक्षय शहा, प्रीतम लोणकर, श्यामकुमार
शर्मा, वाजीदा शेख, के. के. देव, यांनी उद्योजकांना निर्यातसंबंधी योजनाची माहिती देऊन
मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उपस्थित उद्योजक,
ओद्योगिक समुहाचे सदस्य, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातदार, नवउद्योजक
यांनी उपस्थित राहून कार्यशाळेची माहिती घेतल्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक
शोयब कादरी यांनी आभार मानले.
0000
No comments:
Post a Comment