स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण जनतेत बळकटी येईल
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
*प्रधानमंत्र्यांचा लाभार्थ्यांशी संवाद
*जमिनीच्या सनदीचे वितरण
अमरावती, दि. 18 : स्वामित्व योजनेतून गावठानाच्या जमिनी मुळ मालकाच्या नावावर होणार आहे. यासाठी भूमी अभिलेख विभागाने मेहनत घेतली आहे. या योजनेतून ग्रामीण जनजीवनाला बळकटी मिळेल, असे मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले.
जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय स्वामित्व योजनेतून सनद वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार प्रतापदादा अडसड, भूमी अभिलेखचे उपसंचालक डॉ. लालसिंग मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी महेश शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, स्वामीत्व योजनेमुळे एक चांगले काम झाले आहे. इंग्रजकाळात जमिनीचा सातबारा अस्तित्वात आला. त्यानंतर आता स्वामित्व योजनेमुळे गावठाणाची जमीन मालकी हक्काने मिळणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. यामुळे जमीनवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे जमीन विषयक तंटे कमी होण्यास मदत मिळेल. नागरिकांच्या नावे जमीन असल्यामुळे त्यांना घर बांधणीसाठी बँकांचे कर्ज सहज उपलब्ध होतील. यापुढील टप्प्यात नागरी भागात ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात केलेल्या चांगल्या कामाप्रमाणे शहरी भागातही भूमी अभिलेखने कामे करावीत, असे आवाहन केले.
आमदार श्री. अडसड यांनी योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावरील जनतेला होणार आहे. जमीन नावावर होणे ही अतिशय चांगली बाब आहे. नागरिकांच्या दृष्टीकोनातून महत्वाचे काम होत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे. या योजनेत ग्रामीण भागातील अर्थकारण बदलविण्याची क्षमता असल्याने योजना राबविताना आलेल्या अडचणी सोडविण्यात याव्यात. यात आलेल्या त्रृटी प्राधान्याने दुरूस्त कराव्यात, असे सांगितले.
श्री. शिंदे यांनी प्रास्ताविकातून योजनेची माहिती तसेच होणाऱ्या लाभाबाबत माहिती दिली. श्री. बयास यांनी मनोगत व्यक्त केले. सुरवातीला योजनेबाबत चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी संजय धर्माळे, विद्या माहुरे, नंदू ठाकरे, प्रल्हाद चव्हाण, त्र्यंबक हांडे, गोविंद धवने, मनिष भटकर, लक्ष्मण शिरसाठ यांना प्रातिनिधीक स्वरूपात सनदीचे वितरण करण्यात आले.
प्रधानमंत्र्यांचा संवाद
यानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजनेच्या लाभार्थ्यांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रातील एकमेव नागपूर येथून रोशन पाटील यांच्याशी त्यांनी सुरवातीला मराठीतून संवाद साधला. त्यांनी श्री. पाटील यांच्याकडून स्वामित्व योजनेच्या लाभासह इतर योजनांचा लाभ घेतला असल्याबाबत विचारणा केली. श्री. पाटील यांनी स्वामित्व योजनेमुळे कर्जाचा प्रश्न मार्गी लागला. मिळालेल्या कर्जातून घर बांधणी आणि शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था केल्याचे सांगितले. यामुळे तीन पिके घेण्यात येत असून उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगितले. तसेच उज्ज्वला योजना, किसान सन्मान निधी आदी योजनांचा लाभ घेतला असल्याचे सांगितले.
दरम्यान आज देशभरातील 65 लाख मालमत्ता सनदीचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेत गावठाणाची जमीन मूळ मालकाच्या नावावर होणार आहे. याची सनदही देण्यात येणार आहे. यामुळे जमीनीचा मालकी हक्काबाबत पारदर्शकता येणार आहे. परिणामी जमीनसंबंधी होणारे दाव्यात लक्षणीय घट होणार आहे. यासोबतच जमीनीवर बँकेचे कर्जही सहज मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला पुन्हा एकदा वैभव प्राप्त होणार आहे, अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
000000
सार्वजनिक कामातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न
-मंत्री संजय राठोड
* बोडना येथील समाज मंदिराचे लोकार्पण
अमरावती, दि. 18 : गावापासून देशापर्यंतच्या विकासात समाज मोठे योगदान देते. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी जेही शक्य आहे, त्या सर्व बाबी प्राधान्याने करण्यात येतील. यात सार्वजनिक कामातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
बोडना येथील चापालाल महाराज पुण्यतिथी, समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा व जाहिर सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बाबूसिंग महाराज, सुनील राणा, आशिष धर्माळे, श्याम देशमुख, दिलीपराव ठाकरे, देवानंद चव्हाण आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. राठोड यांनी, राज्य आणि देशभरात बंजारा समाज विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. समाजाला योग्य दिशा मिळवून देण्यासाठी शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून कार्य करीत आहे. समाजाच्या लहान घटकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. आज चापालाल महाराज पुण्यतिथी अणि समाज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने गावपातळीवरील कार्यक्रमात सहभागी होता आले.
आजच्या कार्यक्रमात समाज मंदिराच्या निमित्ताने विकासकामाला गावात सुरवात झाली आहे. समाजासाठी जेही शक्य आहे, ती मदत करण्यात येईल. तसेच समाजाचे तांडे आणि गाव याठिकाणाहून निमंत्रण आल्यास त्याठिकाणी प्राधान्याने उपस्थित राहण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामाध्यमातून समाजाची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी मंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर श्री. राठोड यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला. पुष्पवृटीत श्री. राठोड यांचे स्वागत करण्यात आले. पारंपारिक बंजारा वेशभूषेत महिलांनी औक्षण केले.
000000
No comments:
Post a Comment