Thursday, May 29, 2025

DIO NEWS AMRAVATI 29-05-2025

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

अमरावती दि. 29 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधिक्षक निलेश खटके, तहसिलदार विजय लोखंडे, प्रशांत पडघन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000

रविवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणे वाटप शिबीर

अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यातील तीन पंचायत समितीमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी रविवार, दि. 31 मे रोजी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 60 वर्षांवरील वयोवृद्ध नारिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भातकुली, तिवसा, अमरावती पंचायत समितीने निवड केलेल्या लाभार्थ्यांना उपयुक्त कृत्रिम अवयव साधनांचे वाटप डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय, जेल क्वॉर्टरजवळ, कॅम्प, अमरावती येथे होणार आहे.

00000

बडनेरा पोलिस स्टेशनमध्ये कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम

अमरावती, दि. 29 (जिमाका) : बडनेरा पोलिस स्टेशन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सोमवार, दि. 26 मे 2025 रोजी एलजीबीटीक्यूआयए समुदाय सदस्यांच्या संबंधात विशेष कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रफुल गीते अध्यक्षस्थानी होते. यावेळी एपीआय सोनाली मेश्राम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्य अधिवक्ता अॅड. अमित सहारकर यांनी तृतीयपंथीसाठी असणारे कायदे आणि तरतुदीविषयी मार्गदर्शन केले. श्री. गीते यांनी प्रास्ताविक केले. विधी स्वयंसेवक निकिता चौहान यांनी सूत्रसंचालन केले, विधी स्वयंसेवक साक्षी महल्ले यांनी आभार मानले.

00000

Wednesday, May 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28-05-2025-2

उत्तम समन्वय, सहकार्याने जिल्ह्याच्या विकास घडविला -जिल्हाधिकारी सौरभ कटियार अमरावती, दि. 28(जिमाका) : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून काम करीत असताना विविध विभागातील उत्तम समन्वय आणि अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागला असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केली. जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री. कटियार यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी पद्मश्री शंकरबाबा पापळकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते. श्री. कटियार म्हणाले, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने जिल्हा अतिशय चांगला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने मेळघाट हा अतिशय महत्वाचा भाग आहे. या भागाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना नेहमीच चांगले काम करण्याचा दृष्टीकोन ठेवला. प्रत्येक कार्य करताना प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले. आदिवासी आणि जंगलाचा भाग असलेल्या जिल्ह्यात आरोग्य आणि ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित येऊन कार्य केले. त्यामुळे राबविलेल्या प्रत्येक उपक्रमाला यश मिळाले. जिल्हा प्रशासनात ई-ऑफीस आणि इतर महत्वपूर्ण उपक्रम राबवून लोकाभिमुख प्रशासन करण्यावर भर दिला. समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यावरील उपाययोजना देऊन आश्वस्त केले. त्यामुळे सामाजिक संघटनांची प्रशासनाला चांगली साथ मिळाली. गेल्या वर्षातील दोन निवडणूकांमध्ये सर्व घटकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ झाली. समन्वय आणि सहकार्य मिळाल्याने प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली. पीएम मित्रा, मेळघाट आणि अमरावती विमानतळावरून प्रवाशी सेवेचा शुभारंभ ही कार्यकाळातील महत्वाच्या नोंदी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पद्मश्री शंकरबाबा पापळकर, मुख्य कार्यकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, तहसिलदार विजय लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, डॉ. विकास खंडारे, राजेश चौरपगार, विजेश वरतानी, कमल राठी, विवेक पिढेकर यांनी मनोगत व्यक्त करून श्री. कटियार यांच्या कार्यकाळातील कार्याला उजाळा दिला. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. 00000

DIO NEWS AMRAVATI 28-05-2025


 

                         जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

अमरावती दि. 28 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख, अधिक्षक निलेश खटके, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

अमरावती, दि. 28 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 16 जून ते 29 ऑगस्ट, 2025 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात आला आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

            अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती  येथे दि. 5 जून, 2025 मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येते वेळी  Department of Sainik Welfare, Pune (DSW) या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील सीडीएस-65 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

            केंद्रामध्ये सी.डी.एस. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेऊन यावेत.

अ) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. आ) उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी. डी. एस. (CDS) या परीक्षेसाठी ऑनलाईन व्दारे अर्ज केलेला असावा.   

             अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी- training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्ॲप क्र. 9156073306 प्रवेशपत्र मिळण्यासाठी असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.

 

00000

अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तात्पुरत्या नियुक्तीची संधी

अमरावती, दि. 28 (जिमाका): अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तात्पुरत्या नियुक्तीची संधी प्राप्त होणार आहे. तरी इच्छुक पात्र माजी सैनिक,  वीर पत्नी तसेच नागरिकांनी मुलाखत व इतर परीक्षेसाठी  सोमवार, दि. 2 जून 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे प्रत्यक्ष हजर राहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात येथे ऑनलाईन ई ऑफिस बाबत कार्यवाही, महाडीबीटी पोर्टलमध्ये माहिती भरणे तसेच इतर कार्यालयीन कामकाजासाठी  निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी तत्वावर एकूण 2 (माजी सैनिक, वीर पत्नी, इतर नागरिक या प्रवर्गातून) उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण इयत्ता 12 वी पास तसेच संगणकाचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक असून वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0721-2661126 येथे संपर्क साधावा.

00000

 दहावी आणि बारावीच्या वि‌द्यार्थ्यांसाठी मनोवैज्ञानिक कसोट्या आणि करिअर मार्गदर्शन

अमरावती, दि. 28 (जिमाका): दहावी आणि बारावीच्या वि‌द्यार्थ्यांना मनोवैज्ञानिक कसोट्या आणि करिअर मार्गदर्शन नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, टोपे नगर येथे मानसशास्त्रीय कसोट्या  आणि करिअर मार्गदर्शन सुविधा उपलब्ध असून जिल्ह्यातील 27 वि‌द्यार्थ्यांनी आतापर्यंत याचा लाभ घेतलेला आहे. या कसोट्‌यांचा उद्देश वि‌द्यार्थ्यांच्या बौ‌द्धिक क्षमता, अभिरुची, व्यक्तिमत्त्व आणि करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन करणे हा आहे. सर्व वि‌द्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. ही सेवा नि:शुल्क असून वि‌द्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

 अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सस्थाचे अधिव्याख्याता डॉ. विकास गावंडे टोपे नगर, मालटेकडी रोड, अमरावती मोबाईल न. 9421675540,  ईमेल-dietamravati@gmail.com  अधिकृत संकेतस्थळ www.dietamravati.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांनी केले आहे.

00000

हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय केला आहे. मुख्यमंत्री

 


हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय केला आहे. मुख्यमंत्री

, उपमुख्यमंत्रीद्वय , परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. संबंधित यंत्रणांना २४ तास अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Tuesday, May 27, 2025

DIO NEWS AMRAVATI 27-05-2025

 

अमरावती आय टी आय येथे आज रोजगार मेळावा

अमरावती, दि. 27 (जिमाका) : स्थानिक संत गाडगेबाबा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण, संस्था, मोर्शी रोड, अमरावती येथे उदया बुधवार, दि. 28 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात  विदर्भातील नामांकित कंपनी जाधव गिअर्स लिमिटेड, एम.आय.डी. सी., अमरावती व जाधव लेलँड प्रायव्हेट लिमिटेड व अन्य कंपन्या सहभागी होणार आहेत.

या मेळाव्यामध्ये वेल्डर, फिटर टर्नर, मशीनिस्ट या व्यवसायात आयटीआय उत्तीर्ण व यावर्षी परीक्षेला बसलेले प्रशिक्षणार्थी यांना  संधी मिळणार आहे. सुमारे 300 जागांसाठी  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत उमेदवाराची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यात, नुकतेच पास झालेले आयटीआय उत्तीर्ण, एक वर्ष किंवा दोन वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अनुक्रमे दरमहा रु.9 हजार 500 रुपये ते 12 हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील गरजू उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका श्रीमती ठोंबरे तसेच उपप्राचार्य संजय बोरकर यांनी केले आहे.

000000

Monday, May 26, 2025

DIO NEWS AMRAVATI 26-05-2025

 

शासकीय योजनाच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी अनिवार्य

अंतिम मुदत 31 मे पर्यंत

अमरावती, दि. 26 (जिमाका): केंद्र सरकारने देशातील प्रत्येक शेतजमीनधारक शेतऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक शेतकरी आयडी घेणे अनिवार्य केले आहे. या आयडीशिवाय कोणताही शेतकरी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही. यामध्ये पी. एम. किसान सन्मान निधी योजना, पीक कर्ज, वीज बिल सवलत, पीक विमा, महाडीबीटी पोर्टल वरील सर्व शासकीय योजना, नैसर्गिक आपत्ती अनुदान व पोकरा योजनेचा समावेश आहे.

कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने यांनी विशेष  जनजागृती मोहीम राबविली असून, शेतकऱ्यांना वेळेत शेतकरी आयडी मिळण्याचे आवाहन केले आहे. असून, जर शेतकऱ्याकडे वैध शेतकरी आयडी नसेल तर त्यांना कोणताही शासकीय लाभ मिळणार नाही. ॲग्रिस्टॅक हा केंद्र सरकारचा एक डिजीटल प्लॅटफार्म आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची एकात्मिक माहिती एका डिजीटल आयडीमध्ये संकलित केली जाते. यात शेतकऱ्यांची जमीन, पीक पध्दती, सिंचन पध्दती, शासनाकडून घेतलेले लाभ, पीक विमा यासारख्या अनेक बाबींचा समावेश असतो. यामुळे योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट आणि पारदर्शक पध्दतीने पोहोचविता येते. पी.एम. किसान सन्मान निधी वार्षिक रूपये सहा हजार, पिक कर्ज योजना, फळबाग लागवड योजना, मोफत व सवलतीचा दरात वीज पुरवठा, प्रधानमंत्री फसल विमा योजना, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, पोकरा योजना, महाडीबीटी पोर्टलवरील सर्व शासकीय योजनांसाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 शेतकरी आपल्या गावातील सीएससी सेवा केद्रांत जाऊन नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एक युनिक फार्मर आयडी मिळेल. जो भविष्यातील सर्व योजनांमध्ये वापरण्यात येईल. शेतकरी आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे- शेकऱ्यांचे आधारकार्ड, सातबारा व आठ-अ (सध्याचा व वैध), मोबाईल क्रमांक ओटीपीसाठी आवश्यक आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी 31 मे पूर्वी फार्मर आयडी काढावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.

000000

 

विकसित कृषी संकल्प अभियानाला 29 मे पासून सुरवात

 

अमरावती, दि. 26 (जिमाका): भारत सरकार तर्फे दि. 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे आहे. या अभियानादरम्यान कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरमार्फत प्रत्येक दिवशी विविध गावांना भेटी देऊन त्या ठिकाणी भारतीय कृषी विज्ञान अनुसंधान परिषदेचे शास्त्रज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, कृषी विज्ञान  केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभाग व आत्माचे अधिकारी एफ. पी. ओ. चे प्रतिनिधी असे विविध तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह यांनी दिली आहे.

00000

 

Thursday, May 22, 2025

DIO NEWS AMRAVATI 22-05-2025

 

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 22 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शुक्रवार, दि. 23 मे  रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, शुक्रवार, दि. 23 मे  रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाव्दारे ‘पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या: कारणे आणि उपाय’ या संशोधन प्रकल्पाच्या सभेस तज्ज्ञ अभ्यासक म्हणून उपस्थित राहतील.

000000

 

मधाचे गाव आमझरी येथे मधपाळ मेळावा संपन्न

अमरावती, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व गामोद्योग मंडळातर्फे 20 मे 2025 जागतिक मधमाशा दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील ‘मधाचे गाव’ आमझरी येथे मधपाळांचा मेळावा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आमझरी येथील पर्यटन संकुलात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदिप चेचरे, सरपंच  सारिका भास्कर, उपसरपंच वासु हेकडे, मंडळ कृषी अधिकारी किरण मुळे, स्फूर्ती क्लस्टरचे सुनिल भालेराव, मधमाशा तज्ज्ञ प्राध्यापक विद्यानंद अहिरे आदिवासी विभागाच्या श्रीमती नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष रामू शेवलेकर, राजेश पटवर्धन, पोलीस पाटील श्रीमती दहिकर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मंगेश बेलनकर, मंगेश वानखेडे, नंदकुमार सहारे, प्रकाश आसोलकार तसेच वनविभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा गांधीजीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री.चेचरे यांनी मधपाळांना मानवी जीवनातील मधमाशाचे महत्त्व विषद करुन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधाचे गाव आमझरी येथे पुढील काळात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. शासनाने आमझरी मधाचे गाव म्हणून घोषित केले असून या ठिकाणी लवकरच लाभार्थ्यांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण व संबंधित उपक्रम सुरु होणार आहेत. त्यामध्ये स्थानिक मधपाळ व ग्रामस्थांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

मंडळ कृषी अधिकारी किरण मुळे यांनी कृषी विभागाच्या योजनांची यावेळी माहिती दिली. स्फूर्ती क्लस्टरचे सुनिल भालेराव यांनी मार्गदर्शन केले.  राजेश पटवर्धन यांनी बचतगटाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. उपसरपंच वासुदेव हेगडे यांनी मधाचे गाव योजना यशस्वीरित्या राबविण्याचे ग्रामस्थाच्या वतीने आश्वासन दिले. तसेच विद्यानंद अहिरे यांनी मधमाशा पालनाबाबत माहिती दिली.

 

 

मधुसखीची निवड

या कार्यक्रमात प्रमिला कंदिलवार व सुमन कास्देकर यांची मंडळामार्फत ‘मधुसखी’ म्हणून नेमणूक करण्यात आली. मधुसखींवर चिखलदरा तालुक्यात मधमाशांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करणे तसेच निर्सगातील मधमाशांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी राहणार आहे. कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे उद्योग पर्यवेक्षक मंगेश वानखेडे यांनी तर आभार निरीक्षक प्रकाश आसोलकार यांनी मानले. या कार्यक्रमाला आमझरी, टेटु, खडकली, भेलोरी या गावातील मधपाळ व महिला बहुसंख्यने हजर होत्या.

000000

 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा: 107 सुशिक्षित बेरोजगारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 22 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नुकताच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) उत्साहात पार पडला. या रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फू़र्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा एकूण 210 उमेदवारांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 156 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी 107 जणांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, राठी असोसिएटच्या संचिता राठी, भारत फायनान्सचे शुभम काकडे, कोअर प्रोजेक्टचे सचिन निचळे, स्पंदन फायनान्सच्या केयुरी देशमुख, जना फायनान्सचे अमोल भुजांडे, जाधव ग्रुप ऑफ कंपनीजचे चंद्रकांत वाघमारे आणि टेक्नोक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे किरण काळे आदी उद्योजक उपस्थित होते.

या मेळाव्यात सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील पंकज कचरे, कृपा अर्गुलेवर, प्रवीण बंबोळे तसेच अधिकारी,  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000

'जागतिक तंबाखू नकार दिवस' आणि 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' निमित्त

आरोग्य विभागाचे जनजागृतीपर आवाहन

अमरावती, दि. 22 (जिमाका): 'जागतिक तंबाखू नकार दिवस' 31 मे आणि 17 मे रोजी 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आरोग्य विभागाने तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत आणि असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

तरुणाईमध्ये वाढते तंबाखूचे व्यसन चिंताजनक आहे. 'ग्लोबल युथ टोबॅको सर्वे 2019' नुसार, भारतात 13 ते 15 वयोगटातील जवळपास 8.5 टक्के विद्यार्थी तंबाखूचे सेवन करतात. तंबाखूची सहज उपलब्धता, सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, मित्रांचा दबाव, मोठ्यांचे अनुकरण, आवडत्या नटांची नक्कल आणि ताणतणाव यांसारख्या कारणांमुळे तरुणाईमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 1987 पासून 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू नकार दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. यामागे तंबाखूचा वापर थांबवणे आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा प्रमुख उद्देश आहे.

तंबाखूमुळे होणारे गंभीर आजार आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या आकडेवारीनुसार, 80-90 टक्के तोंडाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण तंबाखू हे आहे. भारतात दरवर्षी सुमारे 13.50 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. तंबाखूमुळे तोंडाचा, अन्ननलिकेचा, श्वासनलिकेचा, फुफ्फुसाचा कॅन्सर, दातांचे व हिरड्यांचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयासंबंधित आजार, लकवा, पुरुषांमध्ये नपुंसकता, स्त्रियांमध्ये गर्भपात, मृत बाळ जन्माला येणे, तसेच नवजात शिशुमध्ये क्लेफ्ट लीप (फाटलेला ओठ) आणि क्लब फूट यांसारखी व्यंगे निर्माण होतात.

भारताचा तंबाखू उत्पादन आणि सेवनात दुसरा क्रमांक असला तरी, तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. एकूण मृत्यूंपैकी 63 टक्के मृत्यू हे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (तोंडाचा, स्तनांचा, गर्भाशय मुखाचा), पक्षाघात आणि फुफ्फुसाचे आजार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे होतात. यामागे असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, मद्याचे अतिसेवन, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आणि ताणतणाव हे प्रमुख घटक कारणीभूत आहेत. या घटकांवर नियंत्रण ठेवल्यास, या आजारांमुळे होणारे 70-80 टक्के मृत्यू टाळता येऊ शकतात. शासनाच्या जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तुम्ही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असाल तर दर महिन्याला स्वतःच्या तोंडाची तपासणी करावी. जिभेवर, गालाच्या आतील भागावर, हिरड्यांवर किंवा घशामध्ये लाल चट्टा, पांढरा चट्टा, तोंड उघडता न येणे किंवा 15 दिवसांपेक्षा जास्त काळ न भरलेली जखम अशी कर्करोगपूर्व लक्षणे आढळल्यास, त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात दंत शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. असे रुग्ण पुढील तपासणी व उपचारासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे संदर्भित केले जातील.

कोटपा 2003 कलम 4 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे हा गुन्हा असून 200 रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच, कलम 6 ब नुसार शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या भुरळ घालणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका. तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

000000

 

 

Wednesday, May 21, 2025

DIO NEWS AMRAVATI 21-05-2025

 

जिल्ह्याला 'मनरेगा'चा 15 कोटी 28 लाखांचा निधी

*पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मजुरांना दिलासा

अमरावती, दि. 21 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जिल्ह्याला 15 कोटी 28 लाख रुपयांचा निधी दोन टप्प्यात प्राप्त झाला आहे. सदर निधी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला आहे. कामांची मजुरी थकीत असल्याने याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे सुमारे 63 हजार मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात सध्या 4 हजार 843 कामांवर 62 हजार 983 मजूर कार्यरत आहे. निधीच्या कमतरतेमुळे मजुरांना अडचणींचा सामना करावा लागला. मनरेगाची अनेक कामे थांबली होती. आता हा निधी उपलब्ध झाल्याने कामे पुन्हा सुरू होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

उपलब्ध निधीपैकी अचलपूर 57 लाख 43 हजार, अमरावती 83 लाख 57 हजार, अंजनगाव सुर्जी 42 लाख 68 हजार, भातकुली 61 लाख 11 हजार, चांदूर रेल्वे 67 लाख 25 हजार, चांदूर बाजार 1 कोटी 23 लाख 22 हजार, दर्यापूर 69 लाख 33 हजार, धामणगाव 91 लाख, धारणी 24 लाख 93 हजार, मोर्शी 6 कोटी 21 लाख 71 हजार, नांदगाव खंडेश्वर 89 लाख 49 हजार, तिवसा 90 लाख 77 हजार, वरुड 1 कोटी 6 लाख 88 हजार रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. चिखलदरा तालुक्याला याआधीच निधी वितरीत करण्यात आला आहे.  

मनरेगाचा निधी मिळालेला नसल्याने मजूरांअभावी असंख्य कामांना विलंब होत होता. तसेच मजुरांची अडचणी होत होती. तीन ते चार महिन्यांपासून मजुरी प्रलंबित असल्याने मजुरी मिळण्यासाठी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या निर्देशाने जिल्हाधिकारी यांनी शासनाला थकीत निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला. निधी मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केल्याने जिल्ह्याला 15 कोटी 28 लाख रूपयांचा निधी 8 मे आणि 19 मे रोजी प्राप्त झाला आहे. सदर रक्कम मजुरांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. जिल्ह्याने आतापर्यंत एकूण 28 कोटी 62 लाख रूपयांची मागणी केली आहे. उर्वरीत 13 कोटी 34 लाख रूपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी कळविले आहे.

00000





जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद, हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

अमरावती, दि. 21 (जिमाका) : दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांनी शपथ घेतली.

निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त शपथ दिली. यावेळी तहसिलदार विजय लोखंडे, निलेश खटके, तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 21 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक व अवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. परंतु 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना hmas.mahait.org  वर उपलब्ध आहे.

वरिल संकेतस्थळावरून काही विद्यार्थ्यांनी अर्ज डाऊनलोड करून अर्जासोबत जोडलेल्या आवश्यक कागदपत्राच्या यादीसह सहायक आयुक्त समाज कल्याण अमरावती कार्यालयामध्ये जमा केलेले नाही. एकुण        1 हजार 476 विद्यार्थ्यांनी अपूर्ण अर्ज सादर केल्यामुळे त्यांचे अर्ज पोर्टलवर प्रलंबित असून याबाबत विद्यार्थ्यांना पोर्टवर सेंट बॅक करून ऑनलाईन पोर्टवर अर्जामध्ये नमूद भ्रमणध्वनी तसेच ईमेलव्दारे कळविण्यात आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जातील त्रुटी पुर्तता केलेली नाही, त्यांनी त्रुटीची पुर्तता बातमी प्रसिध्द झाल्यापासून दोन दिवसाच्या आत करण्यात यावी.  याबाबत विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थ्यांनी त्रुटीची पुर्तता करून आवश्यक कागदपत्र कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.

अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती चांदुर रेल्वे रोड, सी. पी. ऑफीसच्या मागे अमरावती  तसेच speldswo_amtrediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

000000

पारधी समाजासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 26 जून

अमरावती, दि. 21 (जिमाका) : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी कार्यक्षेत्रांतर्गत पारधी पॅकेज  योजना सन 2024-25 अंतर्गत  मंजूर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून योजनेचे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 26 जून 2025 आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज धारणी, चिखलदर, अंजनगाव व अचलपूर, तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय, धारणी जि. अमरावती या ठिकाणी व नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती येथे तसेच मोर्शी, वरूड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत उप कार्यालय मोर्शी  येथे विहित नमुन्यात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 07226-224217 या क्रमांकावर संपर्क साधावा. योजनेचा अर्ज भरतांना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती अर्जाच्या नमुन्यावर नोंदविण्यात आली आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना

          पारधी विकास कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे. यामध्ये पारधी समाजाच्या बचत गटांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, लाभार्थ्यांना शेळी गट खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, लाभार्थ्यांना ऑटो रिक्षा पुरविणे या योजनांचा समावेश आहे.

          वरील योजनेसाठी शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणकीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून पात्र व अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करताना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, वीरपत्नी, परितक्ता, निराधार, महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी दिली आहे.

0000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...