बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 'निसर्ग अनुभव'
अमरावती,
दि. 15 (जिमाका): मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात 'निसर्ग
अनुभव' कार्यक्रम उत्साहात पार पडला. निसर्गप्रेमींनी 24 तास घनदाट वनातील 197 मचाणींवर
बसून वन्य प्राण्यांच्या हालचाली आणि दर्शनाचा रोमांचक अनुभव घेतला.
सदर उपक्रमात
सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना जेवण, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, मचाणीवर सोडणे
आणि आणण्याची व्यवस्था करण्यात आली. मचाणीवर बसण्यापूर्वी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी
आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले. त्यानंतर निसर्गप्रेमींनी पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांचे
निरीक्षण केले.
मेळघाट
व्याघ्र प्रकल्पातील 3 वन्यजीव विभागात 9 वाघ, 8 बिबट, 59 अस्वल, 272 रानगवा, 409 सांबर,
125 नीलगाय प्राणी प्रत्यक्ष बघायला मिळाले. तसेच, पांढरकवडा वन्यजीव विभागात 6 वाघ,
18 अस्वल, 211 नीलगाय आणि अकोला वन्यजीव विभागात 8 बिबट, 19 अस्वल, 4 तडस व 43 नीलगाय
या वन्यजीवांचे दर्शन झाले.
पूर्वी
'प्राणीगणना' उपक्रम आता वन्य प्राण्यांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या पद्धतींचा अवलंब
केल्यामुळे 'निसर्ग अनुभव' हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. मेळघाट व्याघ्र
प्रकल्पातील अकोट, गुगामल, मेळघाट वन्यजीव, तसेच अकोला व पांढरकवडा या सर्व वन्यजीव
विभागांमध्ये निसर्गप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी करून मचाण आरक्षित केले. या उपक्रमात मुंबई,
पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, परभणी, वाशीम, बुलढाणा, अकोला, नांदेड व अमरावती तसेच
मध्यप्रदेशातील निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 'निसर्ग अनुभव' कार्यक्रमात
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल सहभागी निसर्गप्रेमींनी
समाधान व्यक्त केले.
मेळघाट
व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक जयकुमारन, सुमंत
सोलंखे, विभागीय वन अधिकारी यशवंत बहाळे, उत्तम फड, श्री. निमजे, मनोजकुमार खैरनार,
स्वप्नील बांगडे, अतुल तिखे आणि आनंद विपट यांनी 'निसर्ग अनुभव'साठी पुढाकार घेतला.
00000
आदिवासींसाठी महाअभियान ठरले लाभदायक
*धरती आबा, प्रधानमंत्री महाअभियान गावांसाठी संजिवनी
अमरावती,
दि. 15 (जिमाका): आदिवासी समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केंद्र शासनाने
'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' आणि 'प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय
महाअभियान' सुरू केले आहे. हे अभियान जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी
अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लाभदायक ठरत आहेत.
या
अभियानांतर्गत आदिवासी बहुल भागातील पक्की घरे, रस्ते, पाणी, वीज, सौरऊर्जा, मोबाईल
नेटवर्क, गॅस जोडणी, वसतिगृह, पोषण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष मोहिमेद्वारे
लक्ष केंद्रित केले जात आहे. सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी कुटुंबांना याचा
लाभ मिळत आहे.
प्रधानमंत्री
जनजातीय आदिवासी न्याय महाअभियानात धामणगाव रेल्वे तालुक्यातील तीन गावाचा समावेश आहे.
यात 334 आदिम जमातीची लोकसंख्या आहे. या अभियानातून उसळगव्हाण येथील 17 आणि बोरगाव
धांडे येथील चार अशा 21 लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी झाले. यातील 20 घरकुलांचे
काम पुर्ण झाले आहे. सन 2025-26 या वर्षात नायगाव ता. धामणगाव रेल्वे येथील 20 लाभार्थ्यांना
घरकुल मंजुर करण्यात येणार आहे. या गावामध्ये आदिम जमार्तीचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र,
राशन कार्ड, किसान सन्मान निधी व इतर आवश्यक कागदपत्रांची कार्यवाही अभियानातून करण्यात
आली आहे.
धरती
आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात अमरावती, अचलपूर, भातकुली, चांदुरबाजार, चिखलदरा,
दर्यापुर, धारणी, मोर्शी, वरुड या 9 तालुक्यामधीत 321 आदिवासी बहुल गावाचा समावेश आहे.
अभियानातून धारणी प्रकल्पांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत दोन मुलांचे आणि चार मुलींचे असे सहा वसतिगृह मंजूर
झाली आहे. तसेच या अभियानातून आदिवासींना लाभ देण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची
पुर्तता करून लाभ देण्यात येत आहे. तसेच मेळघाटमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार
निर्मितीसाठी लाभार्थ्यांना विविध लाभ देऊन बाजारपेठेचा विकास करण्याची कार्यवाही करण्यात
येत आहे. या अभियानांमुळे अमरावती जिल्ह्यातील आदिवासी समाजात सकारात्मक बदल दिसून
येत असून त्यांच्या जीवनात सुधारणा होत आहे.
जिल्हाधिकारी
सौरभ कटियार यांनी, प्रशासनातर्फे अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. धरती
आबा आणि प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागात शाश्वत
विकासाची पायाभरणी होत आहे. यातून मुलभूत सुविधा गावापर्यंत पोहोचत आहे. यातून आदिवासींच्या
जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले.
धारणी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी, योजनांच्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. स्थानिक गरजा आणि
भौतिक सुविधांमधील कमतरता ओळखून योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यातून
आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याचे सांगितले.
00000
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणाची संधी
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे पर्यंत
अमरावती, दि. 15 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या
माध्यमातून विजाभज, इमाव आणि विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च
शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या विभागामार्फत परदेश शिष्यवृत्ती योजना राबविण्यात
येत असून, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अर्ज मागविण्यात आले आहेत अर्ज करण्याची
अंतिम तारीख 17 मे 2025 पर्यंत आहे.
या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, ज्या विद्यार्थ्यांनी
पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी क्यूएस मानांकनानुसार
जगातील पहिल्या 200 विद्यापीठांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे, ते विद्यार्थी अर्ज
करण्यास पात्र असतील. या योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
प्रदान केली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी विविध अभ्यासक्रम आणि शाखानिहाय जागांची उपलब्धता
आहे.
इच्छुक
आणि पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज www.obcbahujankalyan.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankalyan.maharahstra.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करावा.
पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह येत्या 17 मे 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत
समक्ष अथवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला
एम.एच. बी कॉलनी, म्हाडा कमशिऱ्यल कॉम्पलेक्स, समता नगर, येरवडा पुणे 411006 येथे दोन
प्रतींमध्ये सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन इतर
मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी केले आहे.
0000
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ
अमरावती, दि.
15 (जिमाका): देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या अर्ज
भरण्याची अंतिम तारीख आता 20 मे 2025
पर्यंत वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया पुर्ण न झाल्यामुळे
हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याअ
संकेतस्थळावरुन अर्ज डाउनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रांसह 20 मे रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष
अथवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्चरोड, पुणे-411001 येथे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण
सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment