उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार
-उद्योग मंत्री उदय सामंत
*मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार
अमरावती, दि. 8 : अमरावती येथील टेक्सटाईल पार्कमध्ये उद्योगांना चांगल्या सेवा पुरविण्यात येत आहे. आता याठिकाणी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कमध्ये उद्योग यावेत, यासाठी जमिनीचे दर एक वर्षासाठी 600 रूपये ठरविण्यात आला आहे. उद्योगांसाठी लवचिक धोरण राबविणार असल्याची माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री. सामंत यांनी उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. सामंत यांनी, पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये 5 उद्योजकांनी 1300 कोटी रूपयांचे करार केले. मात्र जमिनीच्या दराबाबत प्रश्न असल्याने उद्योग सुरू होण्यास अडचण झाली. यावर उपाययोजना म्हणून आता एक वर्षासाठी 600 रूपये दर ठरविण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी उद्योग सुरू होण्यास वेग येईल. त्यासोबतच सामाईक सोयीसुविधांचे दर 67 रूपयांवर आणण्यात आले आहे. यात अधिकच्या दराबाबतही 50 टक्के सवलत देऊन प्रलंबित रक्कम उद्योजकांकडून भरून घेतली जाणार आहे. या प्रकल्पामधून 10 ते 20 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
उद्योगांशी करार करण्यात आल्यानंतर 68 टक्के उद्योग सुरू करण्यात आले आहे. उद्योगांना सहकार्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मात्र उद्योगांसाठी जमिन घेऊन उद्योग सुरू केला नसल्यास जमिनी परत घेतल्या जातील. येत्या काळात अमरावतीमध्ये आयटी पार्क, लघू व मध्यम उद्योजक पार्क यासोबतच आमझरी हे मधाचे गाव म्हणून साकारण्यात येणार आहे. उद्योजकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी शासनाचा पुढाकार राहणार आहे.
गुरूकुंज मोझरी येथे राज्यातील चौथे पुस्तकाचे गाव निर्माण करण्यात येणार आहे. यात 35 कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. या कुटुंबांनी खानपानाचा परवाना काढल्यास पर्यटकांना चहा, नास्ता आणि जेवण, तसेच होमस्टेची सुविधा देऊ शकतील. याठिकाणी उत्कृष्ट आणि दुर्मिळ पुस्तके उपलब्ध राहणार आहे. त्यासोबतच येत्या सत्रापासून मराठी भाषा विद्यापिठात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
00000
आंबा-मिलेट महोत्सवातून ग्राहक, उत्पादकांना लाभ होणार
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
*आंबा मिलेटस् महोत्सवाचे आयोजन
अमरावती, दि. 8 : कृषी पणन मंडळातर्फे आंबा व मिलेटस् हा चांगला महोत्सव राबविण्यात येत आहे. यामुळे उत्पादकांना ग्राहक मिळण्यासोबतच ग्राहकांनाही उत्कृष्ट उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
महोत्सवाचे उद्घाटन प्रथम येणाऱ्या ग्राहकाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते. यावेळी सहकारी संस्था सहनिबंधक चैतन्य नसाणे, जिल्हा उपनिबंधक श्री. कुंभार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, कृषी पणन मंडळाचा उपक्रम स्तुत्य असून यामध्ये मध्यस्तांची संख्या कमी होऊन शेतकरी आणि प्रक्रियादार हे ग्राहकांच्या जवळ येतील. यामुळे ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या उत्पादनाची जाणीव शेतकऱ्यांना होईल. आंबा महोत्सवामुळे हापूस, केशर आणि गावरान आंब्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध होण्यासोबतच ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा आंबा उपलब्ध झाला आहे. मिलेटस आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध होतील. महोत्सवातून ग्राहक आणि शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याने महोत्सवाला सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनी प्रक्रियादार यांना मिलेट आणि हापूस, केशर, गावरान आंबा या फळांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य कृषी पणन मंडळातर्फे आंबा मिलेटस महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दि. 12 मेपर्यंत हा महोत्सव जाधव पॅलेस येथे सुरू राहणार आहे. यात 45 उत्पादक आणि कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिनेश डागा यांनी वीस वर्षापासून विविध महोत्सव आयोजित करून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या मिलेट धोरणानुसार ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी आदी मिलेटसला बाजारपेठ उपलब्ध व्हाव्यात यासाठी महोत्सव घेण्यात येते. महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment