शासकीय योजनाच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक फार्मर
आय डी अनिवार्य
अंतिम मुदत 31 मे पर्यंत
अमरावती, दि. 26 (जिमाका): केंद्र सरकारने
देशातील प्रत्येक शेतजमीनधारक शेतऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक शेतकरी आयडी घेणे अनिवार्य
केले आहे. या आयडीशिवाय कोणताही शेतकरी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही शासकीय
योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही. यामध्ये पी. एम. किसान सन्मान निधी योजना, पीक कर्ज,
वीज बिल सवलत, पीक विमा, महाडीबीटी पोर्टल वरील सर्व शासकीय योजना, नैसर्गिक
आपत्ती अनुदान व पोकरा योजनेचा समावेश आहे.
कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने यांनी विशेष जनजागृती मोहीम राबविली असून, शेतकऱ्यांना
वेळेत शेतकरी आयडी मिळण्याचे आवाहन केले आहे. असून, जर शेतकऱ्याकडे वैध शेतकरी
आयडी नसेल तर त्यांना कोणताही शासकीय लाभ मिळणार नाही. ॲग्रिस्टॅक हा केंद्र
सरकारचा एक डिजीटल प्लॅटफार्म आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची एकात्मिक
माहिती एका डिजीटल आयडीमध्ये संकलित केली जाते. यात शेतकऱ्यांची जमीन, पीक पध्दती,
सिंचन पध्दती, शासनाकडून घेतलेले लाभ, पीक विमा यासारख्या अनेक बाबींचा समावेश
असतो. यामुळे योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट आणि पारदर्शक पध्दतीने
पोहोचविता येते. पी.एम. किसान सन्मान निधी वार्षिक रूपये सहा हजार, पिक कर्ज
योजना, फळबाग लागवड योजना, मोफत व सवलतीचा दरात वीज पुरवठा, प्रधानमंत्री फसल विमा
योजना, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, पोकरा योजना, महाडीबीटी पोर्टलवरील सर्व
शासकीय योजनांसाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
शेतकरी आपल्या गावातील सीएससी सेवा केद्रांत
जाऊन नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एक युनिक फार्मर आयडी
मिळेल. जो भविष्यातील सर्व योजनांमध्ये वापरण्यात येईल. शेतकरी आयडीसाठी आवश्यक
कागदपत्रे- शेकऱ्यांचे आधारकार्ड, सातबारा व आठ-अ (सध्याचा व वैध), मोबाईल क्रमांक
ओटीपीसाठी आवश्यक आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी 31 मे पूर्वी फार्मर आयडी काढावा, असे
आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.
000000
विकसित कृषी संकल्प अभियानाला 29 मे पासून
सुरवात
अमरावती,
दि. 26 (जिमाका): भारत सरकार तर्फे दि. 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत ‘विकसित
कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त
आणि महत्त्वाचे आहे. या अभियानादरम्यान कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरमार्फत
प्रत्येक दिवशी विविध गावांना भेटी देऊन त्या ठिकाणी भारतीय कृषी विज्ञान अनुसंधान
परिषदेचे शास्त्रज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक,
शास्त्रज्ञ, संशोधक, कृषी विज्ञान केंद्राचे
कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभाग व आत्माचे अधिकारी एफ. पी. ओ. चे प्रतिनिधी असे विविध
तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे
वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment