Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Saturday, June 21, 2025
DIO NEWS AMRAVATI 21.06.2025
Friday, June 20, 2025
DIO NEWS AMRAVATI 20.06.2025
दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित
अमरावती, दि. 20 (जिमाका): सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून वर्ष 2025साठी दिव्यांगजनांच्या सशक्तीकरण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज आंमत्रित करण्यात आले आहेत. सदर पुरस्कारांकरीता अर्ज, नामांकन सादर करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल दि. 15 मे ते 15 जुलै 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.
अर्ज, नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल awards.gov.in वर भरण्यात यावे. नामांकनामध्ये पोर्टलवर उपलब्ध प्रारूपमध्ये निर्दिष्ट सर्व प्रासंगिक विवरण समाविष्ट असावेत, 1 उल्लेखनीय आणि प्रेरक कामगिरींना स्पष्टपणे समाविष्ठ करावेत. तसेच कामगिरींशी संबंधित सहायक दस्तऐवज अपलोड करावेत.
भौतिक स्वरूपात किंवा कोणत्याही अन्य स्वरूपात प्राप्त अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. पात्रता निकष आणि इतर विवरणाकरिता विभागाची वेबसाईट depwd.gov.in तसेच राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल awards.gov.in यावर उपलब्ध आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड यांनी केले आहे.
00000
Thursday, June 19, 2025
DIO NEWS AMRAVATI 19.06.2025
अमरावती विभागात 'जिवंत सातबारा' मोहिमेला यश;
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक
अमरावती, दि. 19 (जिमाका): महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या 'जिवंत सातबारा' मोहिमेला अमरावती विभागात चांगला प्रतिसाद मिळाला असून, यामुळे मृत खातेदारांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. वारसांची नोंद शेतजमिनीच्या कागदपत्रांमध्ये, विशेषतः सातबारा उताऱ्यावर, वेळेत न झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ही मोहीम अत्यंत प्रभावी ठरली आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे आभार मानले आहेत.
मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या संदर्भात दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित मुदतीत अधिकार अभिलेखात न झाल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन श्री. बावनकुळे यांनी संपूर्ण राज्यात 'जिवंत सातबारा' मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
अमरावती विभागात '100 दिवस कृती आराखडा' कार्यक्रमांतर्गत ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आली. प्राप्त आकडेवारीनुसार, अमरावती विभागातील 56 तालुक्यांमध्ये एकूण 32 हजार 195 खातेदार मृत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी तब्बल 19 हजार 150 वारसांच्या नावे यशस्वीपणे नोंद घेण्यात आली आहे.
अमरावती विभागातील 56 तालुक्यांमध्ये एकूण 32 हजार 195 मृत खातेदार आढळले. 20 हजार 502 वारस नोंदीसाठी अर्ज दाखल झाले, तर 20 हजार 301 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला. एकूण 20 हजार 192 फेरफार दाखल झाले, त्यापैकी 19,150 फेरफार मंजूर झाले, तर केवळ 143 फेरफार नामंजूर झाले आहेत.
'जिवंत सातबारा' मोहिमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांबाबत समस्या दूर होण्यास मदत होत आहे.
00000
'स्टॉप डायरिया' अभियानाला अमरावतीत सुरुवात
अमरावती, दि. 19 (जिमाका): राज्यात 2 जून ते 31 जुलै 2025 या कालावधीत 'स्टॉप डायरिया' अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यातील नांदगावपेठ ग्रामपंचायतीमध्ये झाला. या मोहिमेचे अंतिम ध्येय अतिसारामुळे होणारे बालमृत्यू 'शून्यावर' आणणे हे आहे. 'अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेवूनी साथ' हे या अभियानाचे घोषवाक्य आहे.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा राऊत, मंगला मोहोड, विस्तार अधिकारी श्रीमती लकडे ,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी वनिता शिंदे तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,पालकवर्ग, ग्रामसदस्य आणि आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा सेविकांनी ओआरएस (ORS) द्रावण कसे बनवायचे आणि हात कसे धुवायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले, ज्यामुळे उपस्थित लोकांना अतिसार प्रतिबंधाचे सोपे आणि प्रभावी उपाय समजले.
डॉ. प्रवीण पारिसे म्हणाले, 'स्टॉप डायरिया' अभियानात आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, पंचायत विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग यांसारखे विविध शासकीय विभाग सहभागी आहेत. ० ते 5 वयोगटातील बालकांच्या एकूण मृत्यूंपैकी 4.8 टक्के मृत्यू हे अतिसारामुळे होतात. अतिसाराची लक्षणे दिसताच, ओआरएस, झिंक गोळ्या किंवा घरगुती पेये वापरून आपण त्यावर सहज उपचार करू शकतो आणि बालमृत्यू रोखू शकतो. अभियानातंर्गत आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन अतिसाराने ग्रस्त असलेल्या बालकांना ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वाटप करतील. गरजेनुसार त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात संदर्भीत केले जाईल. तसेच, लोकांना ओआरएस बनवण्याची आणि हात धुण्याची योग्य पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे शिकविली जाईल.
'स्टॉप डायरिया' अभियान 2025 जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. टप्पा-1 मध्ये 2 ते 15 जून 2025 या दरम्यान मोहिमेचे नियोजन, विविध विभागांमध्ये समन्वय, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, जिल्हा व तालुका कृती दलाची स्थापना, आयईसी आराखडा निश्चित करणे आणि ओआरएस व झिंक गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करणे या बाबींचा समावेश आहे. टप्पा-2अंतर्गत 16 जून 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत निव्वळ स्तनपानास प्रोत्साहन, रोटा व्हायरस लसीकरण, हातांची स्वच्छता, सुरक्षित पाण्याची व्यवस्था, ओआरएस आणि झिंकचे वितरण, सर्व आरोग्य संस्था आणि अंगणवाड्यांमध्ये ओआरएस-झिंक कॉर्नरची स्थापना आणि अतिसारावरील उपचार यावर भर दिला जाईल.
0000
पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 96 सुशिक्षित बेरोजगार
उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड
अमरावती, दि. 19 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने नुकताच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह 2) संपन्न झाला. या रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ऑनलाइन तसेच ऑफलाईन 190 उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 140 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी 96 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. रिम्सचे प्रतिनिधी स्नेहा मुने, टाईम्स ग्रुपचे दिपंषु कोतांगले, एम. के किचन वेअरचे ललित डोले, प्लास्ती सर्जचे सयुजा काळे व जना फायनान्सचे अमोल भूजांडे, जाधव ग्रुप ऑफ कंपनीजचे चंद्रकांत वाघमारे उद्योजक म्हणून उपस्थित होते. मेळाव्यामध्ये सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या.
00000
दोन वर्षीय बालकाला पालकमंत्र्यांची मदत
*साडेतीन लाख रूपयांचे मशिन दिले
अमरावती, दि. 19 (जिमाका) : एकांश या दोन वर्षीय बालकाचे कानातील मशिन बसस्थानकावर अनावधानाने हरवले. त्यामुळे बालकाला ऐकण्याची समस्या झाली. परंतू घरची हालाखीची परिस्थिती असल्याने नवीन मशिन घेणेही शक्य नव्हते. मात्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदतीचा हात देऊन या बालकाला साडेतीन लाख रूपयांचे मशिन उपलब्ध करून दिले.
कर्णबधिर एकांशवर मोफत कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये झाली. गेल्या दोन महिन्यांपासून बाळाचा भाषा आणि वाचा विकास होण्यासाठी स्पीच थेरपी दिली जात आहे. स्पीच थेरपीसाठी 'साउंड प्रोसेसर' आवश्यक आहे. सदर साऊंड प्रोसेसर पालकांनी विकतही घेतले होते. मात्र उपचारासाठी अमरावती येथे आले असताना बसस्थानकावर मशिन अनावधानाने हरविले.
वडील स्वप्नील खडसे यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने साउंड प्रोसेसर खरेदी करणे शक्य नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मदती विनंती केली. स्पीच थेरणीसाठी साउंड प्रोसेसर अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी श्री. खडसे यांनी जिल्हा नियोजन निधीतूनही मदत करण्याची विनंती केली. मुलाचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि त्याला सर्वसामान्य जीवन जगता यावे, यासाठी साउंड प्रोसेसर लावणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी मदत करावी अशी विनंती केली.
बसस्थानकावर कानातील मशीन हरवल्यामुळे मागील सहा महिन्यापासून दोन वर्षीय बालक ऐकू, बोलू शकत नव्हता. त्यातच घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे नवीन यंत्रसुद्धा घेण्याची स्थिती नव्हती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत माहिती आल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत मुख्यमंत्री सहायता निधीला पत्र देऊन एकांतला त्वरीत साडेतीन लाख रूपयांची मशीन उपलब्ध करण्याची विनंती केली. मात्र ही मशीन राज्याच्या कोणत्याच योजनेत येत नसल्यामुळे विशेष बाब म्हणून प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. जिल्हा परिषद आणि पालकमंत्री कार्यालयाच्या पाठपुरावाने एकांशला कर्ण यंत्र मिळाले. त्यामुळे दोन वर्षीय बालकाला आता ऐकता आणि बोलता सुद्धा येणार आहे.
00000
Wednesday, June 18, 2025
DIO NEWS AMRAVATI 18.06.2025
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी घेतला मोर्शी तहसील
कार्यालयातील विविध कामकाजाचा आढावा
अमरावती, दि. 18 (जिमाका): गटविकास अधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल अद्यावत फोटोसह टॉपिंग याद्या तहसील कार्यालयात त्वरित सादर कराव्यात. तसेच तहसीलदार यांनी घरकुल लाभार्थ्यांना रेती वाढू वाटप करणे बाबत तातडीने रॉयल्टी देऊन त्यांना एक ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करून द्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मोर्शी तहसील कार्यालय येथे नुकतेच दिले.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी घेतला मोर्शी तहसील कार्यालयातील विविध कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
घरकुलसाठी रेती रॉयल्टी वाहतूक पास दिल्यानंतर त्यांच्या नोंदी घेणे व रेती उचल केल्यानंतर या पास लाभार्थ्यांकडून परत घेण्यात याव्यात. घरकुल रॉयल्टी कोणत्याही परिस्थितीत गैरवापर होणार नाही याची ग्राम महसूल अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत सर्व ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांनी पथक निहाय कारवाई करावी.
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची महाखनिज ॲप्सद्वारे तपासणी करावी, अवैध वाहतूक आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी ॲग्रीस्टॅगचा गावनिहाय आढावा घेतला. तसेच गावनिहाय पी एम किसान लाभार्थी यांची नोंदणीबाबत माहिती घेतली. यामध्ये गावनिहाय नियोजन करून तीन कॅडरमध्ये विभागणी करण्याबाबत सूचना दिल्या. तहसीलदार ,गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी नियोजन करून कृषी सेवक, ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून काम पूर्ण करून घ्यावे. ही कामे 30 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
संजय गांधी श्रावण बाळ योजनेबाबत डीबीटी पोर्टलवरील कामे 30 जूनपर्यंत पूर्ण करावे. नैसर्गिक आपत्तीविषयक घरपडझडीचे अनुदान तातडीने वाटप करावे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करावे व यादी तयार करावी. तसेच सामायिक शेतीबाबत संमती पत्र तिथेच घेण्याबाबत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना निर्देश देण्यात आले.
अनुदान वाटप करताना पेन्डिग इ-केवायसीचे काम तातडीने पूर्ण करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.
मोर्शी येथील पर्यटन केद्रांला श्री. येरेकर यांनी भेट दिली. तेथे त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषद अंतर्गत डंपिंग डेपो येथील कचरा व्यवस्थापन केंद्राला भेट देवून पाहण केली.
000000
तालुका पालक अधिकाऱ्यांकडून आज पहिला आढावा
अमरावती, दि. 18(जिमाका) : तालुकास्तरावरील समस्या आणि यंत्रणांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सात तालुका पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या सात अधिकाऱ्यांनी आज पहिला तालुका दौरा आपल्या क्षेत्रात केला.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी स्वत: मोर्शी आणि वरूड तालुक्यात दौरा केला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर हे मोर्शी, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे दर्यापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे नांदगाव खंडेश्वर, रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर ज्ञार चिखलदरा, महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव अचलपूर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रध्दा उदावंत तिवसा, विशेष भुसंपादन अधिकारी प्रसन्नजित चव्हाण धामणगाव रेल्वे तालुक्यांना आज भेटी दिल्या.
जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजात गती आणण्यासाठी, स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुका पालक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका पालक अधिकारी यांनी आज ॲग्रीस्टॅक नोंदणी, संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजजेतील लाभ देण्यात येणाऱ्या अडचणीमध्ये ई-केवायसी करणे, नैसर्गिक आपत्तीचा पंचनामे, पीएम आवास, घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती वाटपाबाबत सविस्तर सुचना दिल्या. तसेच पीएम किसानचा लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात यावी. नोंदणी केली नसलेल्या शेतकऱ्यांची यादी शासनास सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याच्या सूचना तालुका पालक अधिकारी यांनी दिल्या.
00000
निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे
* जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन
अमरावती, दि. 18(जिमाका) : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ देण्यात येत आहे. मात्र आधार प्रमाणीकरण झालेले नसल्याने पेमेंट फेल होत असल्याने लाभ देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 32 हजार 276 लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात 32 हजार 276 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही आणि ज्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांनी अद्ययावत आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकच्या प्रतीसह संजय गांधी योजना विभाग, तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे. जिल्ह्यात संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे वितरण करण्यात येते. शासनाने डिसेंबर 2024 पासून डीबीटीद्वारे अनुदानाचे वितरण सुरू केले आहे. जून 2025 चे अनुदान देखील वितरित करण्यात आले आहे. डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी आणि अनुदान वितरणामध्ये जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
जिल्ह्यात संजय गांधी योजनेंतर्गत एकूण 91,972 लाभार्थी आहेत. त्यापैकी 88,955 लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी झाली आहे. यापैकी 79,275 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. अद्यापही 9,680 लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. जून 2025मध्ये 71,661 लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तर 5,395 लाभार्थ्यांचे पेमेंट अयशस्वी झाले आहे. असे यात एकूण 77,056 लाभार्थी आहेत.
श्रावणबाळ योजनेत जिल्ह्यात एकूण 1,74,290 लाभार्थी आहेत. यापैकी 1,63,545 लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी झाली आहे. यात 1,40,949 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. अद्याप 22,598 लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. जून 2025 मध्ये 1,28,751 लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे, तर 9,106 लाभार्थ्यांचे पेमेंट अयशस्वी झाले आहे. यात एकूण 1,37,857 लाभार्थी आहे.
डीबीटी पोर्टलवर पेमेंट अयशस्वी होण्यामध्ये मुख्य कारण आधार कार्ड बँक खाते क्रमांकाशी आणि एनसीपीआयशी लिंक नसणे किंवा आधार क्रमांक मॅप नसणे, आधार आयआयएनशी मॅप नसणे, लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खाते क्रमांक बरोबर लिंक नसणे यामुळे पेमेंट अयशस्वी होत आहे. यामुळे लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आपले आधार कार्ड एनपीसीआय आणि बँक खात्याशी लिंक करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
00000
जिल्ह्यात 'धरती आबा जनभागीदारी अभियान'
सुरु: आदिवासींच्या विकासासाठी विशेष शिबिर
अमरावती, दि. 18 (जिमाका): आदिवासी आणि आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA)' आणि 'प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN)' अंतर्गत जिल्ह्यात विशेष 'धरती आबा जनभागीदारी अभियान' सुरू करण्यात आले आहे. आजपासून या अभियानाला सुरवात झाली असून हे अभियान 30 जून 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जनजागृती आणि लाभ वितरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नागरिकांना मोठ्या संख्येने शिबिरांना उपस्थित राहून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या अभियानात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि अन्य तालुकास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत 9 तालुक्यातील 321 गावांमध्ये प्रत्येक गावात प्रभावीपणे जनजागृती करून लाभ वितरणाचे कॅम्प आयोजित करण्याचे आणि अभियान उत्तमपणे राबवण्याचे निर्देश श्री. येरेकर यांनी दिले.
या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये आधारकार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, किसान सन्मान निधी इत्यादींचे वितरण करण्यात येणार आहे. कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खात्री स्थानिक प्रशासनामार्फत केली जाईल. यासाठी विविध विभागांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल ठोंबरे हे या अभियानाचे कामकाज पाहत आहेत.
000000
त्वरित पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
अमरावती, दि. 18 (जिमाका): जिल्ह्याचे सर्व साधारण क्षेत्र 12.21 लाख असून लागवडी लायक क्षेत्र 7.81 लाख हे. आहे. खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6.91 लाख हे. व रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र 1.47 लाख हे. आहे. जिल्ह्यातील खरीपाची मुख्य पिके सोयाबिन, कापूस, तूर असून रब्बीतील मुख्य पिके हरबरा व गहू आहेत. जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या 14, एकूण गावांची संख्या 2016 असून 2021 च्या कृषि गणनेनुसार एकूण शेतकरी संख्या 4 लाख 56 हजार 360 आहे. त्या पैकी 1 हे. पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 36 टक्के, 1 ते 2 हे. क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 43 टक्के, 2 हे. पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 21 टक्के आहे. जिल्ह्यातील सरासरी जमिन धारणा 1.64 हे. आहे.
जिल्ह्याचे माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 145.7 मि.मी असून दि. 16 जून 2025 पर्यंत प्रत्यक्षात 44.4 मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची टक्केवारी 30.5 टक्के आहे.
जिल्ह्यात माहे एप्रिल 2025 व मे 2025 या कालावधित नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती, फळ पिकांच्या नुकसानीसाठी 47.05 कोटी रुपये शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे.
माहे जून महिण्यात दि. 1 जून ते दि. 15 जून 2025 या कालावधीत वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील 94 गावातील 933.43 हेक्टर क्षेत्रावर शेती पिके, फ़ळपिकाचे नुकसानीबाबत तालुका कृषि अधिकारी अंजनगाव, धारणी, चांदूरबाजार, चिखलदरा, मोर्शी व दर्यापूर यांनी प्राथमिक अहवाल सादर केलेला असून या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु आहेत. बाधित क्षेत्राचे त्वरित पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आहे.
00000
धरती आबा जनभागीदारी अभियानात सलोना येथे जनजागृती, लाभ वितरण
अमरावती, दि. 18 (जिमाका) : केंद्र सरकारच्या 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' आणि 'प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान' अंतर्गत आदिवासी व आदिम जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. योजनांच्या माहितीसाठी महिती, शिक्षण आणि संवाद मोहिम राबविण्यात येत आहे. यानुसार सलोना, ता. चिखलदरा येथे जनजागृती आणि लाभ वितरण शिबीर आज पार पडले.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानात 30 जून पर्यंत 'धरती आबा जनभागीदारी अभियान' विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत, आज सलोना, ता. चिखलदरा येथील अनुदानित आश्रमशाळेत जनजागृती शिबिर पार पडले. शिबीराचे उद्घाटन आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात महसूल, कृषी, आदिवासी विकास, आरोग्य, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदेच्या विभागांचे स्टॉल लावण्यात आले. तसेच विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. सलोना आणि परिसरातील नागरिक या शिबीराला उपस्थित होते.
लाभार्थ्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, किसान सन्मान निधी आणि मतदान ओळखपत्र यांचे लाभ देण्यात आले. तसेच, लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, सिकलसेल तपासणी करण्यात आली. तसेच विविध विभागांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
00000
सिंचनासाठी अनुदान;
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी संधी
अमरावती, दि. 18 (जिमाका): राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठिंबक व तुषार संचाची खरेदी करण्यासाठी अनुदान दिल्या जाते. या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना 55 टक्के, इतर शेतक-यांना 45 टक्के अनुदान दिल्या जाते. याच घटकासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 25 टक्के व इतर लाभार्थ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिल्या जाते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिल्या जाते. या घटकासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 25 टक्के व इतर लाभार्थ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिल्या जाते. या घटकासाठी जिल्हा परिषद मार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेमधून अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 10 टक्के पुरक अनुदान व इतर लाभार्थ्यांना 15 टक्के पुरक अनुदान असे एकूण 90 टक्के अनुदान दिल्या जाते.
या योजनेंतर्गत ठिंबक व तुषार सिंचन संचाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांकडे मालकी हक्काचा 7/12 व 8 अ असणे आवश्यक आहे. तसेच ओलीताची सोय असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांने महाडीबीटी mahadbt.maharashtra.gov.in वर अर्ज करणे आवश्यक आहे. तरी सदर योजनेचा जास्तीत-जास्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
00000
क्रीडा प्रबोधिनीमध्ये खेळाडूंना प्रवेशाची संधी
अमरावती, दि. 18 (जिमाका): महाराष्ट्रातून जास्तीत -जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन 2025-26 या वर्षासाठी 19 वर्षांखालील खेळाडूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र खेळाडूंना अमरावतीसह नागपूर, अकोला, गडचिरोली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि पुणे येथील क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.
हॅण्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो आणि जिम्नॅस्टिक्स या सहा खेळांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंची सरळ प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड केली जाईल. तर, इतर खेळाडूंची खेळनिहाय कौशल्य चाचणी घेऊन निवड केली जाईल. निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करून शारीरिकदृष्ट्या सुदृढ खेळाडू अंतिम केले जातील.
अर्जदार खेळाडू 19 वर्षांपेक्षा कमी वयाचा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. अर्ज करताना राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाची प्रमाणपत्रे, आधारकार्ड आणि जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे 24जून 2025 पूर्वी सादर करावेत. विभागस्तरीय चाचण्या 26 व 27जून2025रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
000000
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशाची संधी
अमरावती, दि. 18 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अमरावती येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली आहे.
या वसतिगृहात इयत्ता अकरावी ते पदवी (डिग्री), डिप्लोमा आणि आयटीआयच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी अर्ज करण्यास पात्र आहेत.
वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे. यात मोफत निवास आणि भोजन व्यवस्था याव्यतिरिक्त, विद्यार्थिनींना स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहल आणि प्रोजेक्टसाठी मदतही दिली जाईल.
प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींकडे उत्पन्नाचा दाखला,मागील वर्षाच्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत, जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी, विद्यार्थिनींनी सामाजिक न्याय विभागाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुख यांनी सर्व पात्र विद्यार्थिनींना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
00000
Tuesday, June 17, 2025
DIO NEWS AMRAVATI 17.06.2025
ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन अपिल सुनावणी
अमरावती, दि. 17 : आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमानुसार दाखल करण्यात आलेल्या अपिलाची सुनावणी ऑनलाईन करण्यात आली. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या वकीलांना आहे त्याच ठिकाणाहून अपिल सुनावणीला उपस्थित राहता आले. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अपिल सुनावणीसाठी येण्याचा त्रास वाचला आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमाच्या कलम 16 नुसार उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाविरूद्ध दोन अपिल करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या वकीलांच्या सोयीसाठी सदर अपिल सुनावणी ऑनलाईन घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. याबाबत अर्जदार आणि त्यांच्या वकीलांना कळविण्यात आले. दरम्यान आज महसूल भवनात गुगल मिटच्या सहाय्याने ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार प्रशांत पडघन यांच्यासह वकील आणि अर्जदार ऑनलाईन उपस्थित होते.
आज झालेल्या सुनावणीत हरिदास वर्धे विरूद्ध नाना वर्धे आणि हर्षल यावले विरूद्ध वच्छलाबाई यावले या दोन अपिल सुनावणीमध्ये बक्षीसपत्र करून देण्याबाबत वाद सुनावणीसाठी घेण्यात आले. यात दोन्ही पक्षांना ऑनलाईन म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून पुढील आठवड्यात अंतिम सुनावणी ठेवण्याची सुचना केली. तसेच वकीलांना प्रत्यक्षात कागदपत्रे सदर करण्यासाठी निर्देशित करण्यात आले.
आजच्या सुनावणीमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून बक्षीसपत्र करून घेण्यात आले. मात्र बक्षीसपत्रात नमूद अटी शर्तीचे पालन होत नसल्याने याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिनियमानुसार अर्ज सादर करण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरूद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल अर्ज सादर करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे वय अधिक असल्याने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अपिल सुनावणी ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही पक्ष आणि वकीलांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार आज विनाव्यत्यय अपिल सुनावणी घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या ऑनलाईन सुनावणीच्या निर्णयाचे दोन्ही पक्ष आणि वकीलांना स्वागत केले.
00000
ग्रंथालय योजनांविषयी दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात
अमरावती दि. 17 : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी बदल अहवाल वेळोवळी न्यास नोंदणी कार्यालयास सादर करावे. एकूण 22 प्रकारचे बदल अहवाल सादर करता येतात. बदल अहवाल रितसर वेळीच सादर केल्यास बदल अहवाल तातडीने मंजूर होईल, असे प्रतिपादन सहाय्यक धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि शासकीय विभागीय ग्रंथालयातर्फे राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या सहाय्याने ग्रंथालयाच्या विविध योजनांविषयी दोन दिवसीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी अधिकृत लेखा परीक्षक नंदकुमार इंगळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, आणि डॉ. सुरज मडावी उपस्थित होते.
अंकेक्षण अहवाल तयार करताना ग्रंथालयांनी घ्यावयाची काळजी याविषयी श्री. इंगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेला उपस्थित ग्रंथालय चालकांच्या शंका व अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रानंतर कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रंथालयांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र व प्रतिष्ठानच्या योजनाविषयीच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. गजानन कुरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश पाटील यांनी आभार मानले.
00000
शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज 20 जुलैपर्यंत दाखल करावेत
*लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आवाहन
अमरावती, दि. 17 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाज आणि तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यासाठी 20 जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे, अशा विद्यार्थ्यांना गुण क्रमांकानुसार निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन छायाचित्र, आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रांसह दि. 20 जुलै 2025 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्त कार्यालयामागे, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.
00000
जात प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी 26 जूनपासून विशेष मोहिम
अमरावती, दि. 17 (जिमाका) : राजर्श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जात प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम दि. 26 जूनपासून राबविण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
समिती स्तरावर त्रृटी पूर्तता करण्यासाठी शिबीराचे आयोजन दि. 23 जून, दि. 25 जून, दि. 2 जुलै, दि. 4 जुलै 2025 यादिवशी करण्यात आले आहे. तसेच वेबीनार. दि. 27 जून आणि दि. 3 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
राजश्री शाहू महाराज जयंती पर्वनिमित्त दि. 26 जुन ते दि. 4 जुलै 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थी, सीईटीमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणारे, तसेच डिप्लोमा तृतीय वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर विशेष मोहिम शिबिराचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी परिपुर्ण ऑनलाईन अर्ज समिती कार्यालयात सादर करावेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी समितीमध्ये अर्ज सादर केला परंतु अद्यापपर्यंत वैधता प्रमाणपत्रे मिळाली नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी त्रृटी पूर्ततेच्या शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
00000
परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू
अमरावती दि. 17 (जिमाका) : परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी सोमवार, दि. 23 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनधारकांनी पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह परिवहन कार्यालयात अर्ज विहित कागदपत्रांसह जमा करावेत. लिलावासाठी उपस्थित राहणाऱ्या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह उपस्थित रहावे. एकाच क्रमांकासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्ज आल्यास अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल. उर्वरित कमी रकमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय येथे प्रशिक्षणाची संधी; 3 सप्टेंबरला मेळाव्याचे आयोजन ...
-
निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातंर्गत 'संपुर्णता अभियानाचे' चिखलदरा येथून सुरुवात; विकासाच्या विविध योजना राबविणार ...
-
'तपोवन'चा अमृतमहोत्सव : पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती दाजीसाहेबांचे मानवसेवेचे व्रत समर्थपणे व एकजुटी...