Friday, June 13, 2025

DIO NEWS AMRAVATI 13.06.2025







 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची मोझरी येथे उपोषणाला भेट

अमरावती, दि. 13 (जिमाका) : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोझरी येथे बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला भेट दिली. तसेच मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

मंत्री श्री. राठोड यांनी आज उपोषण मंडपाच्या ठिकाणी बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांनी श्री. कडू यांच्या मागण्या शासनाकडे मांडल्या आहेत. याबाबत बैठकाही घेतल्या आहे. मागण्यांबाबत सभागृह आणि शासन दरबारी लक्ष वेधले आहे. तसेच येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येही मागण्या मांडण्यात येतील. प्रत्येक मुद्यांवर चर्चा करून पाठपुरावा करण्यात येईल. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रत्येक प्रश्नाबाबत शासन सकारात्मक पाऊल उचलणार आहे. सध्या मशागत आणि पेरणीची कामे असल्याने आणि श्री. कडू यांची प्रकृती लक्षात घेता उपोषण मागे घेण्यात यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान सकाळी श्री. राठोड यांनी तिवसा येथील विश्रामगृहात प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच गुरूकुंज मोझरी येथील तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

000000

मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा

अमरावती, दि. 13 (जिमाका) : पर्यावरण व वातावरणीय बदल, पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या शनिवार, दि. 14 जून आणि रविवार, दि. 15 जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

दौऱ्यानुसार, शनिवार, दि. 14 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता त्यांचे अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर त्या विविध कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

रविवार, दि. 15 जून रोजी सकाळी 9.20 वाजता अंबादेवीचे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी 11.10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पशूसंवर्धन विभागाचा आढावा घेतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता पर्यावरण विभागाचा आढावा घेतील. दुपारी 1 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

000000

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी 28 जुनपर्यंत अर्ज करावेत

अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्हास्तरीय सुब्रोता फुटबॉल कप, सबज्युनियर मुले, ज्युनियर मुले, मुली क्रीडा स्पर्धा दि. 3 ते 5 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा विविध वयोगटात घेण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, संघांनी दि. 28 जूनपर्यंत ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी मार्फत 2025-26 या वर्षासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी सबज्युनियर 15 वर्षा आतील मुले क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू दि. 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनियर 17 मुले, मुली दि. 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in संकेतस्थळावर खेळाडू आणि संघांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी दि. 28 जुनपर्यंत करणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडूकडे जन्माचा दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, छायाचित्र मुळ प्रतीत असणे आवश्यक आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

000000

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या भरतीमध्ये मध्यस्थांपासून सावध राहण्याचे आवाहन

अमरावती, दि. 13 (जिमाका): नोंदणी व मुद्रांक विभागात गट ड संवर्गात भरती करण्यात येत आहे. यासाठी आयबीपीएसची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी बतावणी करणारे आणि मध्यस्थांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड संवर्गात 284 पदे भरतीसाठी दि. 22 एप्रिल 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यासाठी, तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यासाठी इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन कंपनीस नियुक्त केले आहे. त्यानुसार दि. 22 एप्रिल ते दि. 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून देण्यात आले आहेत.

आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दि. 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र, हॉलतिकिट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे.

            सदर परिक्षेसाठी विभागाकडून कोणत्याही एजन्सी आणि मध्यस्थाची नेमणूक करण्यात आली नाही. याबाबत कोणतीही व्यक्ती, संस्था, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थेपासून उमेदवारांनी सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

                                कांदाचाळ, लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 13 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृहासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सडून नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्यगुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असल्याने कांदाचाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये कमी खर्चाचे कांदाचाळ, लसूण साठवणूकगृह या घटकाच्या मापदंडात सुधारणा करण्यात आली आहे. 5 ते 25 मेट्रीक टन 25 ते 500 मेट्री टन आणि 500 ते 1 हजार मेट्रीक टन क्षमतेच्या कांदाचाळी, लसूण साठवणूकगृह उभारणीसाठी क्षमतेनुसार अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. सदर घटकाचा प्रकल्प खर्च 30 लाख रूपयांपेक्षा जास्त झाल्यास बँककर्ज अनिवार्य आहे. अर्थसहाय्य हे बँककर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात देय राहणार आहे.

अनुदान मर्यादा ही कमी खर्चाचे कांदाचाळ, लसूण साठवणूक गृह, खर्च मर्यादा सात हजार रूपये प्रति मेट्रीक टन, अनुदान मर्यादा ही सर्वसाधारण व अनुसूचित क्षेत्राकरिता 5 ते 1 हजार मेट्रीक टन क्षमतेसाठी यथाप्रमाणाआधारे ग्राह्य भांडवली खर्चाचा 50 टक्के तपशीलाप्रमाणे 5 ते 25 मेट्रीक टनाला दहा हजार रूपये प्रति मेट्रीक टन, 25 ते 500 मेट्रीक टनाला आठ हजार रूपये प्रति मेट्रीक टन, 500 ते 1 हजार मेट्रीक टनाला सहा हजार रूपये प्रति मेट्रीक टन आहे.

लाभार्थी पात्रता निकषात शेतकऱ्‍याने योजनेंतर्गत अर्ज करताना त्याच्या स्वतःच्या मालकीची जमिन असणे आवश्यक आहे. सात बारा उतारावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडे कांदा पिक असणे बंधनकारक आहे. सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्याचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्‍यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.

इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, कांदाचाळ, लसूण साठवणूक गृह या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी mahadbt.maharashtra.gov.in  पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000


शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि 13 (जिमाका) : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या शिफारशीच्या अहवालावर कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

गुरुकुंज मोझरी येथे आज श्री. बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली. यावेळी आमदार प्रताप अडसड, चंदू यावलकर, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपविभागीय अधिकारी मिन्नू पीएम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होणे गरजेचे आहे. याबाबत उच्च स्तरावर बैठकही घेण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेताना शेवटच्या घटकातील एकही शेतकरी सुटू नये, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या बैठकांना बच्चू कडू यांना निमंत्रित करण्यात येईल. त्यांच्या सर्व सूचना आणि प्रस्तावांचा आग्रहपूर्वक समावेश केला जाईल. या समितीचा अहवाल सर्वांसाठी खुला राहील. त्यासोबतच येत्या खरीप हंगामासाठी कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज मिळणे गरजेचे आहे. या शेतकऱ्यांनाही नव्याने कर्ज मिळावे यासाठीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येतील.

आंदोलनात दिव्यांगांना देण्यात येणारे अनुदान वाढवावे, अशी महत्त्वाची मागणी आहे. याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर करून निर्णय घेण्यात येईल. शासनाकडून कोणत्याही योजनेत निधी देताना त्याची अर्थसंकल्पात तरतूद असणे गरजेचे आहे. यामुळे अपंगांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांच्या संदर्भात असलेल्या पशुसंवर्धन, जलसंधारण, महसूल, पणन आदी मंत्र्यांशी चर्चा झाली असून याबाबत पुढील आठवड्यात बैठका घेऊन निर्णय घेण्यात येईल. आंदोलनाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. त्यामुळे उपोषण सोडावे, असे आवाहन श्री. बावनकुळे यांनी यावेळी केले.

पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार आंदोलन मागे घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर केले. यानंतर श्री. बावनकुळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...