Wednesday, June 18, 2025

DIO NEWS AMRAVATI 18.06.2025






जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी  घेतला मोर्शी तहसील

कार्यालयातील  विविध कामकाजाचा आढावा

             अमरावती, दि. 18 (जिमाका): गटविकास अधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल अद्यावत फोटोसह टॉपिंग याद्या तहसील कार्यालयात त्वरित सादर कराव्यात. तसेच तहसीलदार यांनी घरकुल लाभार्थ्यांना रेती वाढू वाटप करणे बाबत तातडीने रॉयल्टी देऊन त्यांना एक ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करून द्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी  मोर्शी तहसील कार्यालय येथे नुकतेच दिले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी  घेतला मोर्शी तहसील कार्यालयातील  विविध कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

             घरकुलसाठी रेती रॉयल्टी वाहतूक पास दिल्यानंतर त्यांच्या नोंदी घेणे व रेती उचल केल्यानंतर या पास लाभार्थ्यांकडून परत घेण्यात याव्यात. घरकुल रॉयल्टी कोणत्याही परिस्थितीत गैरवापर होणार नाही याची ग्राम महसूल अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत सर्व ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांनी पथक निहाय कारवाई करावी.

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची महाखनिज ॲप्सद्वारे तपासणी करावी, अवैध वाहतूक आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी ॲग्रीस्टॅगचा गावनिहाय आढावा घेतला. तसेच गावनिहाय पी एम किसान लाभार्थी यांची नोंदणीबाबत माहिती घेतली. यामध्ये गावनिहाय नियोजन करून तीन कॅडरमध्ये विभागणी करण्याबाबत सूचना दिल्या. तहसीलदार ,गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी नियोजन करून कृषी सेवक, ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांनी  शेतकऱ्यांपर्यंत पोहचून काम पूर्ण करून घ्यावे. ही कामे 30 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचना  देण्यात आल्या.

 संजय गांधी श्रावण बाळ योजनेबाबत डीबीटी पोर्टलवरील  कामे  30 जूनपर्यंत पूर्ण करावे. नैसर्गिक आपत्तीविषयक घरपडझडीचे अनुदान तातडीने वाटप करावे.

  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करावे व यादी तयार करावी. तसेच  सामायिक शेतीबाबत संमती पत्र तिथेच घेण्याबाबत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना निर्देश देण्यात आले.

अनुदान वाटप करताना पेन्डिग इ-केवायसीचे काम तातडीने पूर्ण करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. येरेकर  यांनी सांगितले.

  मोर्शी येथील पर्यटन केद्रांला श्री. येरेकर यांनी भेट दिली. तेथे त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषद अंतर्गत डंपिंग डेपो येथील कचरा व्यवस्थापन केंद्राला भेट देवून पाहण केली.

000000








तालुका पालक अधिकाऱ्यांकडून आज पहिला आढावा

अमरावती, दि. 18(जिमाका) : तालुकास्तरावरील समस्या आणि यंत्रणांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सात तालुका पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या सात अधिकाऱ्यांनी आज पहिला तालुका दौरा आपल्या क्षेत्रात केला.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी स्वत: मोर्शी आणि वरूड तालुक्यात दौरा केला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर हे मोर्शी, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे दर्यापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे नांदगाव खंडेश्वर, रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर ज्ञार चिखलदरा, महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव अचलपूर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रध्दा उदावंत तिवसा, विशेष भुसंपादन अधिकारी प्रसन्नजित चव्हाण धामणगाव रेल्वे तालुक्यांना आज भेटी दिल्या.

जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजात गती आणण्यासाठी, स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुका पालक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका पालक अधिकारी यांनी आज ॲग्रीस्टॅक नोंदणी, संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजजेतील लाभ देण्यात येणाऱ्या अडचणीमध्ये ई-केवायसी करणे, नैसर्गिक आपत्तीचा पंचनामे, पीएम आवास, घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती वाटपाबाबत सविस्तर सुचना दिल्या. तसेच पीएम किसानचा लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात यावी. नोंदणी केली नसलेल्या शेतकऱ्यांची यादी शासनास सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याच्या सूचना तालुका पालक अधिकारी यांनी दिल्या.

00000


निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे

* जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन

अमरावती, दि. 18(जिमाका) : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ देण्यात येत आहे. मात्र आधार प्रमाणीकरण झालेले नसल्याने पेमेंट फेल होत असल्याने लाभ देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 32 हजार 276 लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात 32 हजार 276 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही.  ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही आणि ज्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांनी अद्ययावत आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकच्या प्रतीसह संजय गांधी योजना विभाग, तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे. जिल्ह्यात संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे वितरण करण्यात येते. शासनाने डिसेंबर 2024 पासून डीबीटीद्वारे अनुदानाचे वितरण सुरू केले आहे. जून 2025 चे अनुदान देखील वितरित करण्यात आले आहे. डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी आणि अनुदान वितरणामध्ये जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात संजय गांधी योजनेंतर्गत एकूण 91,972 लाभार्थी आहेत. त्यापैकी 88,955 लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी झाली आहे. यापैकी 79,275 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. अद्यापही 9,680 लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. जून 2025मध्ये 71,661 लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तर 5,395 लाभार्थ्यांचे पेमेंट अयशस्वी झाले आहे. असे यात एकूण 77,056 लाभार्थी आहेत.

श्रावणबाळ योजनेत जिल्ह्यात एकूण 1,74,290 लाभार्थी आहेत. यापैकी 1,63,545 लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी झाली आहे. यात 1,40,949 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. अद्याप 22,598 लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. जून 2025 मध्ये 1,28,751 लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे, तर 9,106 लाभार्थ्यांचे पेमेंट अयशस्वी झाले आहे. यात एकूण 1,37,857 लाभार्थी आहे.

डीबीटी पोर्टलवर पेमेंट अयशस्वी होण्यामध्ये मुख्य कारण आधार कार्ड बँक खाते क्रमांकाशी आणि एनसीपीआयशी लिंक नसणे किंवा आधार क्रमांक मॅप नसणे, आधार आयआयएनशी मॅप नसणे, लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खाते क्रमांक बरोबर लिंक नसणे यामुळे पेमेंट अयशस्वी होत आहे. यामुळे लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आपले आधार कार्ड एनपीसीआय आणि बँक खात्याशी लिंक करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

00000

 


जिल्ह्यात 'धरती आबा जनभागीदारी अभियान'

सुरु: आदिवासींच्या विकासासाठी विशेष शिबिर

अमरावती, दि. 18 (जिमाका): आदिवासी आणि आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA)' आणि 'प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN)' अंतर्गत जिल्ह्यात विशेष 'धरती आबा जनभागीदारी अभियान' सुरू करण्यात आले आहे. आजपासून या अभियानाला सुरवात झाली असून हे अभियान 30 जून 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत  जनजागृती आणि लाभ वितरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

            नागरिकांना मोठ्या संख्येने शिबिरांना उपस्थित राहून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

 

   जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या अभियानात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील सर्व  तालुक्यांतील तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि अन्य तालुकास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत 9 तालुक्यातील 321 गावांमध्ये प्रत्येक गावात प्रभावीपणे जनजागृती करून लाभ वितरणाचे कॅम्प आयोजित करण्याचे आणि अभियान उत्तमपणे राबवण्याचे निर्देश श्री. येरेकर यांनी दिले.

या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये आधारकार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, किसान सन्मान निधी इत्यादींचे वितरण करण्यात येणार आहे. कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खात्री स्थानिक प्रशासनामार्फत केली जाईल. यासाठी विविध विभागांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल ठोंबरे हे या अभियानाचे कामकाज पाहत आहेत.

000000

त्वरित पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

अमरावती, दि. 18 (जिमाका): जिल्ह्याचे सर्व साधारण क्षेत्र 12.21 लाख असून लागवडी लायक क्षेत्र 7.81 लाख हे. आहे. खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6.91 लाख हे. व रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र 1.47 लाख हे. आहे. जिल्ह्यातील खरीपाची मुख्य पिके सोयाबिन, कापूस, तूर असून रब्बीतील मुख्य पिके हरबरा व गहू आहेत. जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या 14, एकूण गावांची संख्या 2016 असून 2021 च्या कृषि गणनेनुसार एकूण शेतकरी संख्या 4 लाख 56 हजार 360 आहे. त्या पैकी 1 हे. पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 36 टक्के, 1 ते 2 हे. क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 43 टक्के, 2 हे. पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 21 टक्के आहे. जिल्ह्यातील सरासरी जमिन धारणा 1.64 हे. आहे.

            जिल्ह्याचे माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 145.7 मि.मी असून दि. 16 जून 2025 पर्यंत प्रत्यक्षात 44.4 मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची टक्केवारी 30.5 टक्के आहे.

 जिल्ह्यात माहे एप्रिल 2025 व मे 2025 या कालावधित नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती, फळ पिकांच्या नुकसानीसाठी 47.05 कोटी रुपये शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे.

 माहे जून महिण्यात दि. 1 जून  ते दि. 15 जून 2025 या कालावधीत वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील 94 गावातील 933.43 हेक्टर क्षेत्रावर शेती पिके, फ़ळपिकाचे नुकसानीबाबत तालुका कृषि अधिकारी अंजनगाव, धारणी, चांदूरबाजार, चिखलदरा, मोर्शी व दर्यापूर यांनी प्राथमिक अहवाल सादर केलेला असून या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु आहेत. बाधित क्षेत्राचे त्वरित पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आहे.

 

00000


धरती आबा जनभागीदारी अभियानात सलोना येथे जनजागृती, लाभ वितरण

अमरावती, दि. 18 (जिमाका) : केंद्र सरकारच्या 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' आणि 'प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान' अंतर्गत आदिवासी व आदिम जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. योजनांच्या माहितीसाठी महिती, शिक्षण आणि संवाद मोहिम राबविण्यात येत आहे. यानुसार सलोना, ता. चिखलदरा येथे जनजागृती आणि लाभ वितरण शिबीर आज पार पडले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानात 30 जून पर्यंत 'धरती आबा जनभागीदारी अभियान' विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत, आज सलोना, ता. चिखलदरा येथील अनुदानित आश्रमशाळेत जनजागृती शिबिर पार पडले. शिबीराचे उद्घाटन आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात महसूल, कृषी, आदिवासी विकास, आरोग्य, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदेच्या विभागांचे स्टॉल लावण्यात आले. तसेच विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. सलोना आणि परिसरातील नागरिक या शिबीराला उपस्थित होते.

लाभार्थ्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, किसान सन्मान निधी आणि मतदान ओळखपत्र यांचे लाभ देण्यात आले. तसेच, लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, सिकलसेल तपासणी करण्यात आली. तसेच विविध विभागांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

00000


सिंचनासाठी अनुदान;

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी संधी

अमरावती, दि. 18 (जिमाका): राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठिंबक व तुषार संचाची खरेदी करण्यासाठी अनुदान दिल्या जाते. या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना 55 टक्के, इतर शेतक-यांना 45 टक्के अनुदान दिल्या जाते. याच घटकासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 25 टक्के व इतर लाभार्थ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिल्या जाते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिल्या जाते. या घटकासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 25 टक्के व इतर लाभार्थ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिल्या जाते. या घटकासाठी जिल्हा परिषद मार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेमधून अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 10 टक्के पुरक अनुदान व इतर लाभार्थ्यांना 15 टक्के पुरक अनुदान असे एकूण 90 टक्के अनुदान दिल्या जाते.
या योजनेंतर्गत ठिंबक व तुषार सिंचन संचाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांकडे मालकी हक्काचा 7/12 व 8 अ असणे आवश्यक आहे. तसेच ओलीताची सोय असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांने महाडीबीटी mahadbt.maharashtra.gov.in वर अर्ज करणे आवश्यक आहे. तरी सदर योजनेचा जास्तीत-जास्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

क्रीडा प्रबोधिनीमध्ये खेळाडूंना प्रवेशाची संधी

अमरावती, दि. 18 (जिमाका): महाराष्ट्रातून जास्तीत -जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन 2025-26 या वर्षासाठी 19 वर्षांखालील खेळाडूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र खेळाडूंना अमरावतीसह नागपूर, अकोला, गडचिरोली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि पुणे येथील क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.

हॅण्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो आणि जिम्नॅस्टिक्स या सहा खेळांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंची सरळ प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड केली जाईल. तर, इतर खेळाडूंची खेळनिहाय कौशल्य चाचणी घेऊन निवड केली जाईल. निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करून शारीरिकदृष्ट्या सुदृढ खेळाडू अंतिम केले जातील.

अर्जदार खेळाडू 19 वर्षांपेक्षा कमी वयाचा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. अर्ज करताना राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाची प्रमाणपत्रे, आधारकार्ड आणि जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे 24जून 2025 पूर्वी सादर करावेत. विभागस्तरीय चाचण्या 26 व 27जून2025रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

000000

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशाची संधी

अमरावती, दि. 18 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अमरावती येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली आहे.

या वसतिगृहात इयत्ता अकरावी ते पदवी (डिग्री), डिप्लोमा आणि आयटीआयच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे. यात मोफत निवास आणि भोजन व्यवस्था याव्यतिरिक्त, विद्यार्थिनींना स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहल आणि प्रोजेक्टसाठी मदतही दिली जाईल.

प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींकडे उत्पन्नाचा दाखला,मागील वर्षाच्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत, जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी, विद्यार्थिनींनी सामाजिक न्याय विभागाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुख यांनी सर्व पात्र विद्यार्थिनींना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...