जिल्हा नियोजनचा निधी प्राधान्याने खर्च करावा
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 2 : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजनच्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यावर्षी शिक्षण, आरोग्य आणि जलसंधारणाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी जिल्हा नियोजनचा निधी प्राधान्याने खर्च करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजन व विकास निधीच्या विनियोगाबाबत बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, उपवनसंरक्षक सुमंत सोळंखे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री यांनी निधीचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. यावर्षी जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी निधी दिल जाणार आहे. यातून जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांसाठी वर्ग खोल्या आणि इतर सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. त्यासोबतच अंगणवाडीचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठीच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रूग्णालयातील यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असणार असल्याने तातडीने प्रशासकीय मान्यता घेऊन कामांना सुरवात करावी.
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षानिमित्त जलसंधारणाची कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी जुने जलसंधारणाची कामे शोधून त्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. किरकोळ दुरूस्ती करून यात पाणी साठवण करण्यात येणार आहे. तसेच विंधन विहिरी घेऊन जलपूर्भरणाची कामे केली जातील. शेतकऱ्यांना शेतीसाठी वहिवाटीचा रस्ता व्हावा, यासाठी पांदण रस्ते तयार केले जातील. नाला खोलीकरणांतर्गत घेण्यात आलेल्या कामांमधून काढण्यात आलेली माती या रस्त्यांच्या कामांसाठी उपयोगात आणली जाणार आहे. तसेच 5 जूनपासून एक पेड माँ के नाम उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रशासनाच्या कामात सुधारणा करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यातून नागरिकांना घरपोच सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीत पशूसंवर्धन, वन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, शिक्षण, आरोग्य, कृषी आदी विभागांचा आढावा घेतला.
000000
येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करणार
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 2 : जिल्ह्यातील पशूधनाची अचूक माहिती व्हावी, यासाठी येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. तसेच प्राण्यांचे टॅगींग करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
आज जिल्हाधिकाीर कार्यालयात प्राणीक्लेश समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा अधिक्षक पोलिस अधिकारी विशाल आनंद, पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील पशू गणनेची माहिती घेतली. पशूधन वाढविण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात यावे. तसेच येत्या पावसाळ्याच्या कालावधीत जनावरांना आजाराची लागण होऊ नये, यासाठी लसीकरण तसेच खबरदारी घेण्यात यावी. येत्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची तस्करी होऊ नये, यासाठी जिल्ह्यात आठ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहे. गोवंशाची वाहतूक होऊ नये, यासाठी परिवहन विभागानेही दक्ष राहावे. तसेच गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस विभागातर्फे योग्य कार्यवाही करण्यात येईल.
बकरी ईदला गोवंशाचा बळी टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. बकरी ईदला प्राण्यांचा बळी देण्यात येतात. मात्र यावर्षी बकरी ईदला गोवंशाचा बळी देण्याचे टाळावे. गोवंशाचा बळी देणे कायद्याने गुन्हा असून असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. गोवंशाचा बळी देऊ नये, यासाठी जनजागृती करावी, तसेच कायद्याची माहिती नागरिकांना द्यावी. येत्या काळात जनावरांची खरेदी विक्री होत असलेल्या ठिकाणी लक्ष ठेऊन ही विक्री नियमाप्रमाणेच होण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
000000
मान्सून कालावधीत यंत्रणांनी सज्ज राहावे
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
*कृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी
अमरावती, दि. 2 : येत्या मान्सून कालावधीत एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये, यासाठी क्षेत्रिय स्तरावरील यंत्रणांनी सज्ज राहावे, तसेच राज्य शासनाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सूनपूर्व आढावा आणि कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी मिन्नू पी. एम., प्रियंवदा म्हाडदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण यांच्यासह क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, येत्या मान्सूनच्या कालावधीत सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. पूर परिस्थिती उद्भवू शकणाऱ्या गावांमध्ये बाधीत होणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था करावी. बाधीतांना आताच नोटीस देण्यात यावी. पूर परिस्थितीनंतर साथरोग उद्भवत असल्याने आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहून तातडीने कार्यवाही करावी. तसेच बचाव पथकांच्या बोटी सुस्थितीत आणि वापरात असल्याची खातरजमा करण्यात यावी. पथकांना पुरविण्यात आलेल्या साहित्याची तपासणी करावी. मान्सून कालावधीत जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष 24 तास सुरू राहील. यावर येणाऱ्या दूरध्वनीची नोंद ठेवण्यात यावी.
शासनाच्या कृती कार्यक्रमात प्रामुख्याने नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी लक्ष द्यावे. प्रामुख्याने पोर्टलवर दाखल तक्रारीची तातडीने दखल घेण्यात यावी. या तक्रारीची गांभीर्याने निपटारा करावा. तसेच कार्यालयात भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या भेटी घ्याव्यात. कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा. यामुळे अचूक आणि आदर्श आदेश मिळण्यास मदत होणार आहे. शासनाने घरपोच सुविधा देण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे क्षेत्रिय स्तरावर फिरते सेतू केंद्र उभारण्याबाबत कार्यवाही करावी. यासोबतच जलसंधारण, वृक्षारोपण आणि सेवा हमी कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा राबविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
000000
गाव पातळीवर विकसित कृषी संकल्प अभियान
अमरावती दि, २ (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने दि . २९ मे पासून देशभरात एकाच वेळी विकसित कृषी संकल्प अभियान केंद्र शासनातर्फे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत नुकतेच वरुड तालुक्यातील लोणी, बेनोडा व जरुड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मृदा सर्वेक्षण विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यातर्फे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. ओ. शिराळे तसेच कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉ. प्रताप जायले, डॉ. महेश आखूड, राहुल घोगरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शेतकऱ्यांना जैविक शेतीचे महत्त्व, माती परीक्षण, बीज प्रक्रिया, जैविक खते व कीडनाशकांचा संतुलित वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, पशुसंवर्धन कृषी तंत्रज्ञान, ड्रोन प्रात्यक्षिक, बियाणे क्षमता प्रात्यक्षिक आदी अनेक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
माहिती देताना डॉ. शिराळे यांनी मातीचा जिवंतपणा कसा टिकून ठेवावा, माती परीक्षण करणे का गरजेचे आहे, मातीचा नमुना कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. जायले यांनी रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, जैविक खतांची गरज यावर माहिती दिली.
कार्यक्रम सहायक राहुल घोगरे यांनी शेतकऱ्यांनी अन्न प्रक्रिया व मूल्यवर्धन या बाबींकडे वळणे गरजेचे असल्याचे सांगितले.
पशुसंवर्धन विभागाचे डॉ. आखूड यांनी शेती करताना जोड व्यवसाय करणे ही आज काळाची गरज असल्याचे सांगून पशुपालन करताना शासनाच्या विविध योजना याविषयी त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतापराव जायले यांनी केले. सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत श्रीराव यांनी तर कृषी सहायक स्नेहा म्हैसणे यांनी आभार मानले.
**
No comments:
Post a Comment