Thursday, June 19, 2025

DIO NEWS AMRAVATI 19.06.2025

                                              अमरावती विभागात 'जिवंत सातबारा' मोहिमेला यश;

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

अमरावती, दि. 19 (जिमाका): महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या 'जिवंत सातबारा' मोहिमेला अमरावती विभागात चांगला प्रतिसाद मिळाला असून, यामुळे मृत खातेदारांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. वारसांची नोंद शेतजमिनीच्या कागदपत्रांमध्ये, विशेषतः सातबारा उताऱ्यावर, वेळेत न झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ही मोहीम अत्यंत प्रभावी ठरली आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे आभार मानले आहेत.

            मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या संदर्भात दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित मुदतीत अधिकार अभिलेखात न झाल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन श्री. बावनकुळे यांनी संपूर्ण राज्यात 'जिवंत सातबारा' मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

अमरावती विभागात '100 दिवस कृती आराखडा' कार्यक्रमांतर्गत ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आली. प्राप्त आकडेवारीनुसार, अमरावती विभागातील 56 तालुक्यांमध्ये एकूण 32 हजार 195 खातेदार मृत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी तब्बल 19 हजार 150 वारसांच्या नावे यशस्वीपणे नोंद घेण्यात आली आहे.

            अमरावती विभागातील 56 तालुक्यांमध्ये एकूण 32 हजार 195 मृत खातेदार आढळले. 20 हजार 502 वारस नोंदीसाठी अर्ज दाखल झाले, तर 20 हजार 301 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला. एकूण 20 हजार 192 फेरफार दाखल झाले, त्यापैकी 19,150 फेरफार मंजूर झाले, तर केवळ 143 फेरफार नामंजूर झाले आहेत.

            'जिवंत सातबारा' मोहिमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांबाबत समस्या दूर होण्यास मदत होत आहे.

00000

'स्टॉप डायरिया' अभियानाला अमरावतीत सुरुवात

अमरावती, दि. 19 (जिमाका): राज्यात 2 जून ते 31 जुलै 2025 या कालावधीत 'स्टॉप डायरिया' अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यातील नांदगावपेठ ग्रामपंचायतीमध्ये झाला. या मोहिमेचे अंतिम ध्येय अतिसारामुळे होणारे बालमृत्यू 'शून्यावर' आणणे हे आहे. 'अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेवूनी साथ' हे या अभियानाचे घोषवाक्य आहे.

 अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा राऊत, मंगला मोहोड, विस्तार अधिकारी श्रीमती लकडे ,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी वनिता शिंदे तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,पालकवर्ग, ग्रामसदस्य आणि आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा सेविकांनी ओआरएस (ORS) द्रावण कसे बनवायचे आणि हात कसे धुवायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले, ज्यामुळे उपस्थित लोकांना अतिसार प्रतिबंधाचे सोपे आणि प्रभावी उपाय समजले.

डॉ. प्रवीण पारिसे म्हणाले, 'स्टॉप डायरिया' अभियानात आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, पंचायत विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग यांसारखे विविध शासकीय विभाग सहभागी आहेत. ० ते 5 वयोगटातील बालकांच्या एकूण मृत्यूंपैकी 4.8 टक्के मृत्यू हे अतिसारामुळे होतात. अतिसाराची लक्षणे दिसताच, ओआरएस, झिंक गोळ्या किंवा घरगुती पेये वापरून आपण त्यावर सहज उपचार करू शकतो आणि बालमृत्यू रोखू शकतो. अभियानातंर्गत आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन अतिसाराने ग्रस्त असलेल्या बालकांना ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वाटप करतील. गरजेनुसार त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात संदर्भीत केले जाईल. तसेच, लोकांना ओआरएस बनवण्याची आणि हात धुण्याची योग्य पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे शिकविली जाईल.

'स्टॉप डायरिया' अभियान 2025 जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. टप्पा-1 मध्ये 2 ते 15 जून 2025 या दरम्यान मोहिमेचे नियोजन, विविध विभागांमध्ये समन्वय, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, जिल्हा व तालुका कृती दलाची स्थापना, आयईसी आराखडा निश्चित करणे आणि ओआरएस व झिंक गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करणे या बाबींचा समावेश आहे. टप्पा-2अंतर्गत  16 जून 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत निव्वळ स्तनपानास प्रोत्साहन, रोटा व्हायरस लसीकरण, हातांची स्वच्छता, सुरक्षित पाण्याची व्यवस्था, ओआरएस आणि झिंकचे वितरण, सर्व आरोग्य संस्था आणि अंगणवाड्यांमध्ये ओआरएस-झिंक कॉर्नरची स्थापना आणि अतिसारावरील उपचार यावर भर दिला जाईल.

0000

पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 96 सुशिक्षित बेरोजगार

उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

अमरावती, दि. 19 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने नुकताच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह 2) संपन्न झाला. या रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ऑनलाइन तसेच ऑफलाईन 190 उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 140 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या.  मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी 96 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. रिम्सचे प्रतिनिधी स्नेहा मुने, टाईम्स ग्रुपचे दिपंषु कोतांगले, एम. के किचन वेअरचे ललित डोले, प्लास्ती सर्जचे सयुजा काळे व जना फायनान्सचे अमोल भूजांडे, जाधव ग्रुप ऑफ कंपनीजचे चंद्रकांत वाघमारे उद्योजक म्हणून उपस्थित होते. मेळाव्यामध्ये सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या.

00000

दोन वर्षीय बालकाला पालकमंत्र्यांची मदत

*साडेतीन लाख रूपयांचे मशिन दिले

अमरावती, दि. 19 (जिमाका) : एकांश या दोन वर्षीय बालकाचे कानातील मशिन बसस्थानकावर अनावधानाने हरवले. त्यामुळे बालकाला ऐकण्याची समस्या झाली. परंतू घरची हालाखीची परिस्थिती असल्याने नवीन मशिन घेणेही शक्य नव्हते. मात्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदतीचा हात देऊन या बालकाला साडेतीन लाख रूपयांचे मशिन उपलब्ध करून दिले.

कर्णबधिर एकांशवर मोफत कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये झाली. गेल्या दोन महिन्यांपासून बाळाचा भाषा आणि वाचा विकास होण्यासाठी स्पीच थेरपी दिली जात आहे. स्पीच थेरपीसाठी 'साउंड प्रोसेसर' आवश्यक आहे. सदर साऊंड प्रोसेसर पालकांनी विकतही घेतले होते. मात्र उपचारासाठी अमरावती येथे आले असताना बसस्थानकावर मशिन अनावधानाने हरविले.

वडील स्वप्नील खडसे यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने साउंड प्रोसेसर खरेदी करणे शक्य नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मदती विनंती केली. स्पीच थेरणीसाठी साउंड प्रोसेसर अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी श्री. खडसे यांनी जिल्हा नियोजन निधीतूनही मदत करण्याची विनंती केली. मुलाचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि त्याला सर्वसामान्य जीवन जगता यावे, यासाठी साउंड प्रोसेसर लावणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी मदत करावी अशी विनंती केली.

बसस्थानकावर कानातील मशीन हरवल्यामुळे मागील सहा महिन्यापासून दोन वर्षीय बालक ऐकू, बोलू शकत नव्हता. त्यातच घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे नवीन यंत्रसुद्धा घेण्याची स्थिती नव्हती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत माहिती आल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत मुख्यमंत्री सहायता निधीला पत्र देऊन एकांतला त्वरीत साडेतीन लाख रूपयांची मशीन उपलब्ध करण्याची विनंती केली. मात्र ही मशीन राज्याच्या कोणत्याच योजनेत येत नसल्यामुळे विशेष बाब म्हणून प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. जिल्हा परिषद आणि पालकमंत्री कार्यालयाच्या पाठपुरावाने एकांशला कर्ण यंत्र मिळाले. त्यामुळे दोन वर्षीय बालकाला आता ऐकता आणि बोलता सुद्धा येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...