Thursday, February 27, 2020

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विभागीय ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथप्रदर्शन








अमरावती, दि. 27 : विभागीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथील विभागीय ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याला विद्यार्थी, अभ्यासक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.  
ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते झाला. विभागीय माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी, सहायक संचालक राजेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला डॉ. व्यवहारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ग्रंथप्रदर्शनात 1960 व तत्पूर्वीच्या अनेक साहित्यकृतींचा समावेश करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या कवितासंग्रहांसह इतर वाङमयप्रकारातील साहित्यकृती मांडण्यात आल्या होत्या. अनेक प्रसिद्ध पुस्तकांच्या सुरुवातीच्या आवृत्ती प्रदर्शनात रसिकांना पाहता आल्या. ज्ञानेश्वरीच्या हिंदी अनुवादाची प्रत, लीळाचरित्रावरील ग्रंथ, विश्वकोशाचे खंड, विविध कोश यांचाही प्रदर्शनात समावेश होता.  
दुर्मिळ पुस्तके हा संस्कृतीचा ठेवा आहे. त्यांचे जतन योग्य पद्धतीने व्हावे, आवश्यक त्या पुस्तकांचे डिजीटायझेशन आदी करता येते किंवा कसे, या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी सूचना डॉ. व्यवहारे यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी, विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
                                  000 

Tuesday, February 25, 2020

जनगणनेबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण





जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना
नागरिकांनी व्यवस्थित माहिती द्यावी
                                                                                                                                                  -डॉ. नितीन व्यवहारे

*जनसहभागातून ….जनकल्याण…. ब्रीद वाक्य

*1 मे ते 15 जून दरम्यान जनगणना

अमरावती, दि. 25 :  संपूर्ण भारत देशात 2021 वर्षच्या जनगणनेला 1 मे पासून शुभारंभ होणार आहे. दि. 1 मे ते 15 जून दरम्यान राज्यातील प्रत्येक घरांची गणना होणार असून दि. 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान प्रत्यक्ष व्यक्ती गणना (शीर गणती) करुन माहितीचे सत्यापण होणार आहे. जनगणनेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या लोकसंख्येच्या माहितीच्या आधारे देशात कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व ध्येय धोरणे ठरविण्यासाठी सहाय्य होते, त्यामुळे नागरिकांनी जनगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना व्यवस्थित व खरी माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी कार्यशाळेत दिली.
जनसहभागातून…जनकल्याण… हे या जनगणनेचे ब्रीद वाक्य आहे. म्हणजे तुमच्याच(नागरिकांच्या) सहभागातून तुमचेच (नागरिकांचे) कल्याण होणार. या जनगणनेत नागरिकांची माहिती जनगणना संचालनालयाच्या सीएमएमएस पोर्टलवर ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने नोंदविली जाणार असल्याने माहितीचे निरंतर साठवणूक होऊन डिजीटलायझेजन होणार आहे, त्यामुळे ही  जनगणना पूर्वीच्या जनगणनेपेक्षा महत्वपूर्ण ठरणार आहे.
 जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय प्रबोधिनी येथे चार्ज जनगणना अधिकारी (ग्रामीण व शहरी) तसेच रेग्युलर असिस्टंट (जनगणना लिपीक) यांचे 24 व 25 फेब्रुवारी या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. व्यवहारे बोलत होते.
प्रशिक्षण सत्राला सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, महानगरपालिका उपायुक्त, सर्व तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सर्व संबधीत जनगनणना लिपीक, तसेच जनगणना संचालनालयाचे उपसंचालक डॉ. रघु अनुमोलू, प्रशिक्षक प्रवीण भगत, रामनाथ पथवे, संदीप कुलकर्णी, अमरावती जिल्हा समन्वयक वसंत शेंडे, आदी यावेळी उपस्थित होते.
दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे सोमवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. आज रोजी प्रशिक्षणाचा दुसरा दिवस होता. या जनगणनेमध्ये घरांची यादी, व्यक्ती गणना, घरगणनेसह राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे.
या जनगणनेच्या प्रक्रियेत जिल्हाधिकारी हे प्रधान जनगणना अधिकारी म्हणून जिल्ह्यासाठी जबाबदारी पार पाडणार आहे. तर महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा आयुक्त हे प्रधान जनगणना अधिकारी असणार. निवासी उपजिल्हाधिकारी हे अतिरिक्त जनगणना अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्यावतीने संपूर्ण कामकाज पाहतील. चौदा तालुक्यातील तहसीलदार तसेच चौदा नगरपालिकांचे मुख्याधिकारी हे चार्ज जनगणना अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. याव्यतिरिक्त महापालिका क्षेत्रात पाच चार्ज जनगणना अधिकारी असणार. असे एकूण 34 चार्ज जनगणना अधिकाऱ्यांची जनगणना संचालनालयाव्दारे नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक चार्ज जनगणना अधिकाऱ्यांसाठी दोन तांत्रिक सहायक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
चार्ज जनगणना अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी चार मास्टर ट्रेनर नियुक्त करण्यात आले असून यांच्याव्दारे 95 फिल्ड ट्रेनर यांना प्रशिक्षण दिल्या जाणार. या  95 फिल्ड ट्रेनरमार्फत 5 हजार 340 प्रगणकांना जनगणने संदर्भात तांत्रिक व महत्वपूर्ण बाबी याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती मास्टर ट्रेनर तथा तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दिली.
00000

Saturday, February 22, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांना अभिवादन




अमरावती, दि. 19- संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी ही संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000

अचलपूर दूध संकलन-विक्री केंद्र



                                          
प्रकल्प निर्मितीसाठी निधीचे नियोजन करावे
                                                  - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 23 : अचलपूर येथे निर्माण होणाऱ्या दूध संकलन केंद्रासाठी प्रकल्प निर्मितीच्या अनुषंगाने निधीचे नियोजन करताना केंद्र सरकार, राज्य शासन व टाटा ट्रस्ट आदींकडून निधीची तरतूद करुन प्रकल्प पूर्णत्वास आणावा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज बैठकीत दिले.
येथील सिंचन भवन विश्रामगृहात पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय वाढ संदर्भात आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे यांच्यासह यांच्यासह दुग्ध विकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन द्यायावयाचे असल्यास दूध उत्पादन वाढविणे व त्यावरील खर्च कमी होणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीक्षेत्र व अपुरे सिंचन यामुळे चारा निर्मितीसाठी मर्यादा येते. अशा स्थितीत कमी पाण्यात अधिक चारा निर्मिती पर्याय शोधून शेतकऱ्यांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे. कमी लागवडीमध्ये पशुखाद्य निर्मितीचे उत्तम नियोजन करावे. शासनाच्या ई क्लास जमीनीवर चारा निर्मितीसाठी जमीनी ताब्यात घेऊन त्यावर चारा निर्मिती करावी. गायीचा वार्षिक खर्च किती होतो. तसेच गायीपासून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी येणारा खर्च याचे शास्त्रशुध्द तक्ता तयार करण्यात यावा.
दुधाळ जनावरांना पुरेसे पशुखाद्य उपलब्ध होईल यासाठी बारा महिन्याचे पशुखाद्य व औषधीचे वेळेनुसार नियोजित आराखडा तयार करावा. सर्व ऋतूंमध्ये पशुसाठी चारा उपलब्ध होईल यादृष्टीने वैरण व्यवस्था भक्कम झाली पाहिजे. पशु खाद्याचे मासिक विवरणपत्र तयार करुन त्यानुसार चारानिर्मितीचे नियोजन करावे. दुधाळ पशुंना कुठल्या महिन्यात रोग अधिक बळवतात व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कसा करावा, याची माहिती गोळा करावी. शेतकरी आत्महत्या रोखण्यामध्ये दुग्ध उत्पादनांची वाढ प्रभावी उपाय ठरु शकते, असेही श्री. कडू यावेळी सांगितले.
सुरुवातीला चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यात दूध संकलन व विक्री केंद्र हा पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रकल्प राबवावा. दूध संकलन व विक्री केंद्राच्या उभारणीनंतर येणाऱ्या कमतरता, अडचणी तसेच फायदे-तोटे जाणून घेतल्यावर हा प्रयोग राज्यभरात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दूध विक्री तसेच प्रक्रिया उद्योग व दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांवर नफा किती मिळतो याची आकडेवारी घ्यावी. त्यानुसार शेतकऱ्यांना केंद्रात दूध विक्रीचे फायदे व तोटे आदी संदर्भात मार्गदर्शन करावे, असेही श्री. कडू यांनी सांगितले.
                                                   000

Thursday, February 20, 2020

खनिज प्रतिष्ठान अंतर्गत येणारी प्रस्तावित विकास कामे गतीने पूर्ण करा - पालकमंत्री यशोमती ठाकूर




अमरावती, दि. 20 : जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून 43 विकास कामे करण्यासाठी 13 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मंजूर निधीतून जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
 विभागीय आयुक्त कार्यालयात आज जिल्हा खनिज प्रतिष्ठाण अंतर्गत प्राप्त व वितरीत निधी संदर्भात आढावा पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत 13 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 43 कामाकरीता रुपये 6 कोटी 65 लक्ष निधी विकास कामे पूर्ण करण्यासाठी संबंधीत शासकीय यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. राज्य शासन राबवित असलेल्या पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास आदी योजनेतून निधीची उपलब्धता झाल्याने लोककल्याणकारी कामे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे. प्राप्त निधीच्या अनुषंगाने चांदूरबाजार, भातकुली, अमरावती, तिवसा, मोर्शी, वरुड, दर्यापूर तसेच अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहे. मंजूर आराखडा व निधीची उपलब्धतेनुसार अपूर्ण कामे संबंधीत यंत्रणांनी गतीने पूर्ण करावी. मार्च 2020 अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होईल यादृष्टीने प्रयत्न व्हावेत.
            त्या पुढे म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम विभागाला विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तत्काळ मागणी नोंदवावी. मुरमाळ जमीन व इतर क्षेत्रात पांदण रस्त्याची कामे गतीने पूर्ण करावी. तिवसा तालुक्यातील क्रीडा संकुलाचा रस्ता बांधकाम व टाकरखेडा येथील पुल बांधकाम आदी कामे प्राधान्याने पूर्ण करावी. जी कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होऊ शकत नाही, अशा कामांचा निधी तत्काळ नियोजन विभागाला वर्ग करण्यात यावा. तसेच ज्या कामांना अधिक निधीची आवश्यकता असल्यास त्यासंदर्भात प्रस्तावानुरुप निधीची मागणी करावी.
            खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा पायाभूत सुविधा निर्मितीवरच खर्च होणे अपेक्षीत आहे. लोकहितकारी विकास कामे करतांना ती कायमस्वरुपी व गुणवत्तापूर्ण होईल यासाठी प्रत्येक शासकीय यत्रणांनी जबाबदारीपूर्वक काम करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
           बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
00000

पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांबाबत आढावा








                    अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
                   आवश्यक कामांसाठी निधी मिळवून देऊ
-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 20 : जिल्ह्यात विविध विकास आराखड्यातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. आवश्यक व नव्या कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून अतिरिक्त निधी मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. 
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या स्थळांचा विकास विविध प्रकल्पांच्या उभारणीतून होत आहे. आराखड्यानुसार  आधी अपूर्ण कामे पूर्णत्वास न्यावीत. नव्या कामांसाठी अतिरिक्त निधी शासन स्तरावर पाठपुरावा करून मिळवून देण्यात येईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी विकास आराखडा एकूण 150 कोटी 83 लाख रुपयांचा आहे. सुमारे 142 कोटी निधी वितरित करण्यात आला असून, विविध विकास कामे होत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  वास्तव्याने पुनित वास्तूंचे जतन व संवर्धन करताना परिसरात नव्या सुविधांची निर्मिती  आराखड्यात अंतर्भूत आहे. त्यानुसार भक्तनिवास, बहुउद्देशीय सभागृह, तलाव सौंदर्यीकरण, काँक्रीट रस्ते, हायमास्ट पोल, ग्रामविकास प्रबोधिनी आदी कामांचा समावेश आहे. तिवसा क्रीडा संकुल, क्लब हाऊस, स्विमिंग पूल आदी कामांना गती द्यावी. आवश्यक कामांसाठी आमदार फंडातूनही काही निधी देण्यात येईल. 
तिवसा येथे उपजिल्हा रुग्णालयाबाबत प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यात ३७.८६ कोटी निधीतून  विविध कामे होत आहेत. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर विकास आराखड्यात रिंगण सोहळा, काँक्रिट छत्री, नदी घाटाचे बांधकामे आदी कामे पूर्णत्वास जात असून, पर्यटक निवास, प्रसाधनगृह, उपाहारगृह आदी कामे तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. उपलब्ध निधीतून अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
            बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग,सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Wednesday, February 19, 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांनापालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून अभिवादन


अमरावती, दि. 19- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी आमदार सुलभाताई खोडके, किशोर बोरकर, हरीभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनसामान्यांचे स्वराज्य स्थापन करत लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण केली. ते आदर्श प्रशासक होते.  त्यांचे जीवन व कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन




अमरावती, दि. 19- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000

Monday, February 17, 2020

विभागीय प्रदर्शनी व विक्री ‘वैदर्भी’ चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन








महिलांनी धैर्याने संकटांचा सामना करावा
                                                            -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
* उत्कृष्ठ बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार
अमरावती, दि. 17 : महिलांमध्ये समाजाला पुढे नेण्याची मोठी ताकद आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक उन्नती करण्यासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उमेद अभियान उपयुक्त आहे. महिलांनी सक्षमीकरणासाठी स्वत:चे निर्णय स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपून कणखर होणे व कुठल्याही परिस्थितीत संकटाला डगमगून न जाता धैर्याने सामना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
            येथील सांयन्सकोअर मैदानावर विभागीय आयुक्त व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय प्रदर्शनी व विक्री ‘ वैदर्भी ’ चे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, विभागीय आयुक्त पियूष सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उप आयुक्त (विकास) सुहास वेदमुख, प्रकल्प संचालक विनय ठमके, सहायक आयुक्त विलास जाधव, जि. प. पदाधिकारी यांच्यासह पाचही जिल्ह्यातील स्वयं सहायता बचतगटाचा महिला यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी विशेष कामगिरी केलेल्या महिला बचतगटांचा मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार व इतर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रोख रक्कमेचा धनादेश व प्रमाणपत्र असे पुरस्कारचे स्वरुप आहे.  तीन महिला बचतगटांना दोन लक्ष रुपये कर्जाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, उमेद अभियानाव्दारे ग्रामीण भागातील महिलांचे सर्वांगिण विकास करण्यात येते. या अभियानांतर्गत गरीब, गरजू कुटुंबांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी क्षमता बांधणी करुन विविध व्यवसाय व रोजगाराच्या संधी महिलांना उपलब्ध करुन दिल्या जाते. महिलांचे स्वयं सहाय्यता समूह स्थापन करुन बँकाव्दारे कर्जाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिल्या जाते. महिला बचतगटाव्दारे निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर प्रदर्शनी व विक्रीचे दालन उभारण्यात येते. ईथे आयोजित प्रदर्शनीच्या माध्यमातून महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्तम बाजारपेठ मिळणार तसेच या माध्यमातून आर्थिक सुबत्ता मिळेल.
महिलांव्दारे एकजूटीने निर्माण करण्यात आलेल्या बचतगटाचे विविध उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे. महिला सक्षमीकरणाला पुरस्कृत करणारे राज्य शासन असल्यामुळे महिलांना सुध्दा प्रोत्साहन मिळत आहे. महिलांनी कुठल्याही संकटांना न घाबरता निर्भयपणे धैर्याने संकटांचा सामना करावा. महिलामध्ये समाजात सुधार घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांनी काही न बोलता अन्याय सहन केले तर अन्यायग्रस्त समाजाची निर्मिती होते, तर संकटांना समोर जावून पूर्ण ताकदनिशी सामना केला तर सक्षम समाजाची निर्मिती होते. महिलांनी न बोलण्यामुळे अनेक विदारक घटना राज्यात घटत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पहिल्याचवेळी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. तुमच्यातील आतला आवाज दाबू नका, घाबरु नका, बोलते व्हा, स्वत:साठी बोला, कुटूंबातील सदस्यांना सर्व गोष्टी शेअर करा. कोणत्याही संकटांचा धैयाने सामना करा. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उध्दारी या उक्तीप्रमाणे जगाच्या कल्याणासाठी समाजाच्या हितासाठी प्रत्येक संकटांचा धैर्याने सामना करा. घरात किंवा बाहेर इतरत्र घडत असलेल्या वाईट गोष्टींना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घ्या, वेळीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करा, असे भावनिक आवाहन श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.
            महिला स्वयं सहाय्यता समूहाव्दारे उत्पादीत वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा स्तरावर मॉल उपलब्ध करण्याचे आमदार सुलभाताई खोडके यांनी निर्देशित केले. याप्रसंगी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी आश्वासीत केले.
श्री. सिंह म्हणाले की, उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटाव्दारे निर्मित उत्पादनांना विभागस्तराव तसेच जिल्हास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते. अभियानच्या माध्यमातून विभागात सुमारे 33 हजार महिला बचतगटांची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी 7 हजार 957 समूहांना 14 कोटी 42 लक्ष खेळते भांडवल वितरीत करण्यात आले आहे. विभागातील विविध महिला बचतगटांना बँकाव्दारे सुमारे 144 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यांच्याव्दारे कर्ज परतफेडीचे 98 टक्के प्रमाण आहे, तर एनपीए प्रमाण अतिशय नगण्य आहे. या बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. त्यांच्याव्दारे विविध लोकहितकारी उपक्रम सुध्दा राबविण्यात येतात. सात दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळणार असून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी होणार आहे.
श्री. येडगे म्हणाले की, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विभागातील पाचही जिल्ह्यांचे बचतगटांचे सात दिवस प्रदर्शनीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. विविध बचतगटांचे जवळपास 187 स्टॉल्स या प्रदशर्नीत उभारण्यात आले आहे. त्यापैकी 30 स्टॉल्स खाद्यान पदार्थचे आहे. बचतगटाव्दारे तयार करण्यात आलेल्या वस्तुंचे प्रदर्शन याठिकाणी भरविण्यात आले आहे. बचतगटांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे दशसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण कला संस्कृतीच दर्शन यावेळच्या प्रदर्शनीची थीम आहे. यासोबतच स्वच्छ भारत अभियान, प्लॉस्टीक मुक्त भारत संकल्पना राबविण्यासाठी दोन स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे. मुंबईच्या महालक्ष्मी सरस च्या धर्तीवर येथील वैदर्भी प्रदर्शनी यशस्वी व दिमाखदार ठरणार आहे. जिल्ह्यात 32 हजार 957 महिला स्वयं सहायता बचतगट कार्यरत असून त्यांच्याव्दारे निर्मित उत्पादनांना बाजारपेठ मध्ये चांगली मागणी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुरस्कार्थी महिला बचतगट :
अमरावती जिल्हा
प्रथम पुरस्कार - यशोधरा महिला स्वयं सहायता समूह, चांदूर बाजार-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- गणेश महिला स्वयं सहाय्यता समूह, मोर्शी- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- संजीवनी महिला स्वयं सहाय्यता समूह, मोर्शी- 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
यवतमाळ जिल्हा-
प्रथम पुरस्कार - जगदंबा महिला स्वयं सहायता समूह, पांढरकवडा -10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- भीमज्योती महिला स्वयं सहाय्यता समूह, बाभूळगाव - 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- जयलक्ष्मी महिला स्वयं सहाय्यता समूह, कळंब -- 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
अकोला जिल्हा
प्रथम पुरस्कार – संत गजानन महिला स्वयं सहायता समूह, अकोट-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- नवोदय महिला स्वयं सहाय्यता समूह, अकोला- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- एकता महिला स्वयं सहाय्यता समूह, मुर्तीजापूर - 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
बुलडाणा जिल्हा
प्रथम पुरस्कार – आदर्श महिला स्वयं सहायता समूह, जळगावं जामोद-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- भारतीय महिला स्वयं सहाय्यता समूह, सिंदखेड राजा- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- एकता महिला स्वयं सहाय्यता समूह, जळगाव जा.- 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र

वाशिम जिल्हा
प्रथम पुरस्कार -शामकीमाता गजानन महिला स्वयं सहायता समूह,मानोरा-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- प्रगती महिला स्वयं सहाय्यता समूह, मानोरा- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार-सुजाता महिला स्वयं सहाय्यता समूह, वाशिम - 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र

000000

Saturday, February 15, 2020

शेतात भरणा-या शाळेला आता मिळणार छत


                          

वीटभट्टी मजूरांच्या मुलांच्या शाळेसाठी राज्यमंत्र्यांकडून 60 हजार रूपयांची मदत

                    शाळेसाठी जूनमध्ये ठोस उपाययोजना करणार

-          जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 15 :  शिक्षकांकडून अंजनगाव बारीजवळ वीटभट्टी मजुरांसाठी शेतात चालविल्या जाणा-या शाळेला जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी भेट दिली व ही शाळा तत्काळ स्थानिक परिसरातील पक्क्या इमारतीत हलविण्यासाठी साठ हजार रूपयांची मदत केली. याबाबत येत्या जूनमध्ये ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे शेतात भरणा-या या शाळेला हक्काचे छत मिळणार आहे.   

अंजनगाव बारीनजिक एका शेतात वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून शाळा भरवली जात आहे. याबाबत माध्यमांतून माहिती मिळताच राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत: या शाळेला भेट दिली व तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेतात भरणा-या या शाळेला तत्काळ स्थानिक परिसरात पक्की इमारत मिळावी यासाठी त्यांनी साठ हजार रूपयांची मदत केली. त्याचप्रमाणे, येत्या जूनमध्ये याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबे रोजगारासाठी आपल्या मुलांबाळासह अंजनगाव बारी येथे येऊन त्याठिकाणी असलेल्या वीटभट्ट्यांवर काम करतात. साधारणत: दिवाळी ते होळी असा हा कालावधी असतो. मात्र, यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे अंजनगाव बारी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी दिलीप अडवाणी यांच्या शेतात वीटभट्टी शाळा सुरु केली. चिखलदरा तालुक्यातील 56 शाळाबाह्य मुलांना या शाळेतून शिक्षण मिळत आहे. अंगणवाडीतील 13 व पहिली ते आठवीपर्यंतच्या 43 मुलांचा यात समावेश आहे.

                            

चमक येथे राहुटी उपक्रमाचा शेकडो नागरिकांना लाभ

 

                                      राहुटी उपक्रमात सातत्य राखणार

-जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. १5 : राहुटी उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळून त्यांच्या अनेक अडचणींचा निपटारा होत आहे. या उपक्रमात यापुढेही सातत्य राखण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चमक येथे सांगितले. 

जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज अचलपूर तालुक्यातील चमक येथे राहुटी उपक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

परिसरातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी शिधापत्रिका, आधारकार्ड, वयाचा दाखला यासह विविध कागदपत्रांसाठीच्या अर्जांचा, तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा निपटारा  करण्यात आला. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व अधिका-यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

            उपक्रमात येणा-या प्रत्येक नागरिकाच्या अडचणी, मागणी याबाबत तत्काळ कार्यवाहीसाठी सर्व विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना अर्ज लिहिण्यापासून आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी सहाय्य करण्यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकही हजर होते. अर्ज वाटप व लेखन कक्षासह तलाठी कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, दिव्यांग कक्ष, पाणी पुरवठा विभाग, विद्युत कक्ष, सामाजिक न्याय विभाग, कामगार कल्याण, सिंचन, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, महिला व बालविकास कक्ष आदी कक्षांचा समावेश होता.  

 

अर्ज निवेदनांवरील तत्काळ कार्यवाहीप्रमाणेच प्रधानमंत्री मातृवंदन योजना, पोषण अभियान, दिव्यांगासाठी योजना यासह विविध महत्वपूर्ण योजनांबाबत विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. परिसरातील दिव्यांग नागरिक, महिला, वृद्ध नागरिक, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. 

                                    000

पालकमंत्र्यांकडून एमआयडीसी परिसराची पाहणी





दूषित पाण्याचा उपद्रव तत्काळ रोखा
                                         - पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अमरावती, दि. १५ : येथील एसएमएस कंपनीकडून नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीच्या परिसरात दूषित पाणी सोडले जात असल्याने आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार होत आहे.  याबाबत तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे दिले. 
कंपनीकडून दूषित पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी काल नांदगावपेठ एमआयडीसीला भेट दिली व पाहणी केली, तसेच यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. 
            कंपनीकडून दूषित पाणी नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सोडले जात असल्याने पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन  पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती तसेच या भागातील विहिरीमध्ये सुद्धा या पाण्याचा निचरा होऊन विहिरींचे पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांना प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने लवकरात लवकर याबाबतीत उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
औद्योगिक वसाहतीतील इतर विषयांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. एमआयडीसीचे अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 
00000

Friday, February 14, 2020

राहुटी उपक्रमाद्वारे नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू









अमरावती, दि. १४ : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. अचलपूर तालुक्यात आज आयोजित राहुटी उपक्रमाचा आज शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी स्वत: यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
आज सकाळी अचलपूर तालुक्यातील कविठा बु. ग्राम पंचायतीत, त्यानंतर मेघनाथपूर बसस्टॉप येथे राहुटी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शिधापत्रिका, आधारकार्ड यासह विविध कागदपत्रांसाठीच्या अर्जांचा, तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा निपटारा राहुटी उपक्रमातून होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून विविध गावांत हा उपक्रम सुरू असून, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. सर्व कार्यालयांचा राहुटी उपक्रमात सहभाग असून, विविध विभागांबाबतच्या तक्रारींचे निवारण एकाच छताखाली होत आहे.
मेघनाथपूर येथे आयोजित राहुटीत वासणी प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने अर्ज भरुन घेण्यात आले.

राहुटी उपक्रमात नागरिकांना अर्ज उपलब्ध करून देणे, लेखन साहाय्य करण्यासाठी अर्ज वाटप व लेखन  कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. तलाठी कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, दिव्यांग कक्ष, पाणी पुरवठा विभाग, विद्युत कक्ष, सामाजिक न्याय विभाग, कामगार कल्याण, सिंचन, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, महिला व बालविकास कक्ष आदी कक्षांचा उपक्रमात समावेश आहे.  या दालनांतून समस्यांच्या निराकरणासह विविध योजनांची माहितीही नागरिकांना दिली जात आहे. उपक्रमामुळे वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण आदी सर्वसामान्य नागरिकांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागत आहेत.
00000

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...