शेतात भरणा-या शाळेला आता मिळणार छत
वीटभट्टी मजूरांच्या मुलांच्या शाळेसाठी राज्यमंत्र्यांकडून 60 हजार रूपयांची मदत
शाळेसाठी जूनमध्ये ठोस उपाययोजना करणार
- जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 15 : शिक्षकांकडून अंजनगाव बारीजवळ वीटभट्टी मजुरांसाठी शेतात चालविल्या जाणा-या शाळेला जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी भेट दिली व ही शाळा तत्काळ स्थानिक परिसरातील पक्क्या इमारतीत हलविण्यासाठी साठ हजार रूपयांची मदत केली. याबाबत येत्या जूनमध्ये ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे शेतात भरणा-या या शाळेला हक्काचे छत मिळणार आहे.
अंजनगाव बारीनजिक एका शेतात वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून शाळा भरवली जात आहे. याबाबत माध्यमांतून माहिती मिळताच राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत: या शाळेला भेट दिली व तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेतात भरणा-या या शाळेला तत्काळ स्थानिक परिसरात पक्की इमारत मिळावी यासाठी त्यांनी साठ हजार रूपयांची मदत केली. त्याचप्रमाणे, येत्या जूनमध्ये याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबे रोजगारासाठी आपल्या मुलांबाळासह अंजनगाव बारी येथे येऊन त्याठिकाणी असलेल्या वीटभट्ट्यांवर काम करतात. साधारणत: दिवाळी ते होळी असा हा कालावधी असतो. मात्र, यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे अंजनगाव बारी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी दिलीप अडवाणी यांच्या शेतात वीटभट्टी शाळा सुरु केली. चिखलदरा तालुक्यातील 56 शाळाबाह्य मुलांना या शाळेतून शिक्षण मिळत आहे. अंगणवाडीतील 13 व पहिली ते आठवीपर्यंतच्या 43 मुलांचा यात समावेश आहे.
Comments
Post a Comment