Saturday, February 15, 2020

चमक येथे राहुटी उपक्रमाचा शेकडो नागरिकांना लाभ

 

                                      राहुटी उपक्रमात सातत्य राखणार

-जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. १5 : राहुटी उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळून त्यांच्या अनेक अडचणींचा निपटारा होत आहे. या उपक्रमात यापुढेही सातत्य राखण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चमक येथे सांगितले. 

जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज अचलपूर तालुक्यातील चमक येथे राहुटी उपक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

परिसरातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी शिधापत्रिका, आधारकार्ड, वयाचा दाखला यासह विविध कागदपत्रांसाठीच्या अर्जांचा, तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा निपटारा  करण्यात आला. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व अधिका-यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

            उपक्रमात येणा-या प्रत्येक नागरिकाच्या अडचणी, मागणी याबाबत तत्काळ कार्यवाहीसाठी सर्व विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना अर्ज लिहिण्यापासून आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी सहाय्य करण्यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकही हजर होते. अर्ज वाटप व लेखन कक्षासह तलाठी कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, दिव्यांग कक्ष, पाणी पुरवठा विभाग, विद्युत कक्ष, सामाजिक न्याय विभाग, कामगार कल्याण, सिंचन, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, महिला व बालविकास कक्ष आदी कक्षांचा समावेश होता.  

 

अर्ज निवेदनांवरील तत्काळ कार्यवाहीप्रमाणेच प्रधानमंत्री मातृवंदन योजना, पोषण अभियान, दिव्यांगासाठी योजना यासह विविध महत्वपूर्ण योजनांबाबत विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. परिसरातील दिव्यांग नागरिक, महिला, वृद्ध नागरिक, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. 

                                    000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 23.06.2025

                                                                        शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत *जिल्हा परिषदेच्या...