पालकमंत्र्यांकडून एमआयडीसी परिसराची पाहणी
दूषित पाण्याचा उपद्रव तत्काळ रोखा
अमरावती, दि. १५ : येथील एसएमएस कंपनीकडून नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीच्या परिसरात दूषित पाणी सोडले जात असल्याने आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार होत आहे. याबाबत तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.
कंपनीकडून दूषित पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी काल नांदगावपेठ एमआयडीसीला भेट दिली व पाहणी केली, तसेच यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.
कंपनीकडून दूषित पाणी नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सोडले जात असल्याने पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती तसेच या भागातील विहिरीमध्ये सुद्धा या पाण्याचा निचरा होऊन विहिरींचे पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांना प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने लवकरात लवकर याबाबतीत उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
औद्योगिक वसाहतीतील इतर विषयांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. एमआयडीसीचे अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment