उद्योग केंद्रातर्फे ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ कार्यशाळेला मोठा प्रतिसाद
व्यवसाय सुलभतेचा उद्योजकांनी लाभ घ्यावा
- तज्ज्ञ सल्लागार किर्ती अग्रवाल
अमरावती, दि. 3 : शासकीय कामकाजात विविध स्तरावर सुधारणांच्या दृष्टीने उद्योग संचालनालयातर्फे व्यवसाय सुलभता निर्माण करण्यात आली असून उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई येथील तज्ज्ञ सल्लागार किर्ती अग्रवाल यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या सीए भवन येथे इज ऑफ डुइंग बिझनेस कार्यशाळा झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, मुंबईचे तज्ज्ञ सल्लागार कुणाल शहा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय बांगर, संस्थेचे अध्यक्ष डी.डी. खंडेलवाल आदी यावेळी उपस्थित होते.
या कार्यशाळेत व्यवसाय सुलभता व मैत्री कक्षाबाबत तज्ज्ञ व्याख्यात्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. श्रीमती अग्रवाल म्हणाल्या की, व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने जागतिक बँकेच्या परिमाणानुसार अनेकविध सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उद्योगासाठी परवानग्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. वीज, पाणी आदी मिळण्याबाबत प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे देशाची जागतिक क्रमवारीतील क्रम सुधारला असून आता तो 63 वर आहे. महाराष्ट्र शासनाकडून भरीव प्रयत्न करण्यात आले असून ते गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम स्थान बनले आहे. या परिवर्तनाचा लाभ उद्योजकांनी घ्यावा.
मैत्री हे एक खिडकी योजना असलेले सुलभ परवानगी प्रक्रियेसाठीचे पोर्टल आहे. त्याचा लाभ उद्योजकांनी घेण्याचे आवाहन श्री. शहा यांनी केले.
00000
Comments
Post a Comment