विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन ग्रामीण भागात विविध सुविधांची निर्मिती - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
ग्रामीण भागात विविध सुविधांची निर्मिती
- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
-
अमरावती, दि. 21 : ग्रामीण भागात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक कामांना गती देण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने ही कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व पाहणी आज पालकमंत्र्यांनी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बोरखेडे, पल्लवीताई मानकर, पद्माताई डोळस यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सुमारे 60 लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. राजूरवाडी येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत विहीर आणि जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे, पांदण रस्ते योजनेअंतर्गत कोंडवडा ते बरडा या गावांदरम्यान अंदाजे 18 लक्ष निधीतून होणारे पांदण रस्त्याच्या खडीकरणच्या प्रस्तावित कामाचा शुभारंभ झाला. भांबोरा ते तुळजापूर, तसेच मौजे कवठा ते नेर पिंगळाईपर्यंतच्या पांदण रस्त्याचे भूमिपूजनही यावेळी झाले. राजुरवाडी येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, तसेच इतर अध्ययनासाठी वाचनालय व अभ्यासिकेसाठी ग्रामपंचायतीकडून 25 हजार रुपये देण्यात आले. त्याचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
पांदणरस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत
ग्रामविकासात पांदणरस्त्यांचा विकास ही महत्वाची बाब आहे. शेतकरी बांधवांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी व शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी पांदणरस्ते चांगले असणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊनच अमरावती जिल्ह्यात पांदणरस्ते विकासासाठी विशेष मॉडेल राबविण्यात येत आहे. त्यामुळे ही कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावीत. त्याचप्रमाणे, ती विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
00000
Comments
Post a Comment