भारतीय स्वातंत्र्याचा 78वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
अमरावती, दि. 15 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोहळा अत्यंत उत्साहात झाला. प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, श्रद्धा उदावंत, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा सूचना अधिकारी मनीषकुमार, तहसीलदार विजय लोखंडे, निलेश खटके, प्रशांत पडघन, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
00000
शाळांच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
अमरावती, दि. 15 (जिमाका) : महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही एक चांगली पटसंख्या आहे. गरजू लोकांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे, यासाठी शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ. यातून इमारती, स्वच्छतागृहे आणि पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
महापालिकेच्या जेवडनगर येथील शाळेत सामूहिक कवायतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे, मनपा आयुक्त सोम्या शर्मा, शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी शिस्तबद्ध कवायतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम, नेतृत्वगुण विकसित होतील. कवायतीला देशभक्तीपर गाण्याची जोड दिली आहे, त्यामुळे लहान मुलांनी शिस्तबद्ध कवायत केली आहे.
शिक्षकांच्या सकारात्मक विचारांमुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. अशा प्रयोगशील शाळांना नक्कीच मदत करण्यात येईल. यासोबतच पालकांनीही विद्यार्थी शाळेत येतील याची काळजी घ्यावी. मुलं शिकल्याने कुटुंब, गाव आणि पर्यायाने देशाची प्रगती होऊ शकेल. त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाबद्दल जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. मुलांशी संवाद साधावा. मोबाईलचा वापर मर्यादित करून मुलांचे ज्ञान वाढेल यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांचे ज्ञान, गुणवत्ता, क्रीडा, कलागुण आदींना वाव देण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
आमदार श्री. राणा यांनी शाळा दिवसेंदिवस प्रगती करीत असून या शाळेला कायम मदत करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी मंत्री श्री. भुसे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कवायतीचे शिस्तबद्ध सादरीकरण शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. सुरुवातीला लेझीम पथकाने मंत्री श्री. भुसे यांचे स्वागत केले, तसेच तिरंगा रॅली काढण्यात आली. शाळेतील मुलांनी तयार केलेल्या हस्तकला दालनाचे उद्घाटन श्री. भुसे यांनी केले. समर्पण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
00000
भारतीय स्वातंत्र्याचा 78वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात
शेती, शेतकरी केंद्रबिंदू मानून शासनाची प्रगतीकडे वाटचाल
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
अमरावती, दि. 15 (जिमाका) : स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यात येत आहे. यासोबतच समाजातील प्रत्येक घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. लोकाभिमूख योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्यात येत आहे. सर्वंकष प्रयत्नांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. समाजातील वंचित घटक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आदीसोबतच शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून सर्वसमावेशक विकास करून राज्य प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा 78व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील, राज्य माहिती आयुक्त रविंद्र ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद, कमलताई गवई आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर विकासाच्या बाबतीत देशाने मोठा पल्ला गाठला आहे. देशाच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्व असल्याने राज्याने कृषी क्षेत्राला प्राथमिकता दिली आहे. शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते वेळेत उपलब्ध करून दिले आहे. तसेच पिककर्ज उपलब्ध होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यावर्षी बँकांनी 88 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 250 कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यासोबतच 85 हजार शेतकऱ्यांच्या 1 लाख 32 हजार हेक्टर शेतीपिकांना विमा संरक्षण मिळाले आहे. शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 4 लाख शेतकऱ्यांना 642 कोटींच्या निधी वाटपासाठी मान्यता दिली आहे. शेतीशी निगडीत विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ई -केवायसी आणि आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावे, तसेच येत्या खरीप हंगामासाठी ई-पिक पाहणी महत्त्वपूर्ण असून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 100 टक्के ई-पिक पाहणी करावी, असे आवाहन केले.
राज्यातील गोरगरीब, गरजू रुग्णांना अडचणीच्या वेळेस मदत मिळावी, यासाठी राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’कक्षामार्फत 1 जानेवारी ते 31 जुलै 2025 दरम्यान 231 रुग्णांना 2 कोटी 20 लाखांची मदत देण्यात आली आहे. कक्षामार्फत विविध आरोग्य विषयक योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. विस्थापित सिंधी समाजाला पट्टे वाटपाचा पहिला कार्यक्रम जिल्ह्यात पार पडला. सिंधी बांधवांना दिलेल्या जमिनीचा मालकीहक्क मिळाले आहे. येत्या काळात राज्यभरात हा उपक्रम राबवून सुमारे 5 लाख कुटुंबांना पट्टेवाटपाचा लाभ होणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वार्षिक 290 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून 245 कोटी रुपयांचे पुरस्कार वाटप करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर शिकविणे, सीबीएसई माध्यमातून मराठी अनिवार्य केली आहे. ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमात 2 कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संजय अंबाडेकर, संजय पाटील, राजेश कोचे, प्रणिता निस्ताने, निलेश शिरभाते, दीप्ती अग्रवा, दिलीप मेश्राम, अलका बाबील, रत्नमाला खराटे, बद्रूनिसा सिकंदर, लक्ष्मीबाई देवगन, मोहन राठोड, डॉ. सुरेंद्रकुमार ढोले, चंदा खोडके यांचाही सत्कार करण्यात आला. अनुकंपा धोरणांतर्गत कोतवाल पदावर अमरावती तहसील कार्यालयाने ज्योती अमोल चव्हाण यांना प्रथम नियुक्ती दिल्याबद्दल मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
00000
No comments:
Post a Comment