Sunday, January 31, 2021

पालकमंत्र्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

 







पालकमंत्र्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

पाणी पुरवठा योजनेतून प्रत्येक गावांना पिण्याचे पाणी

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

जिल्ह्याचे उद्दिष्ट विहित मुदतीत पूर्ण करा

1588 गावांसाठी 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी

 

               अमरावती, दि. 31 : केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई प्रति दिन किमान 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 1 हजार 588 गावांसाठी एकूण 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरळीत नियोजन करुन पाणी पुरवठा योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावाला नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन पाणी टंचाईचा प्रश्न सोडविता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

           जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन अंतर्गत गावांत राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. कोपूलवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. सावळकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

         श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून केंद्र शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे राज्यांना कळविले आहे. राज्य शासनानेही हे मिशन राबविण्यासाठी मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई प्रति दिन किमान 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 1 हजार 588 गावांसाठी एकूण 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 10 हजार 656 कार्यात्मक नळजोडणी झालेल्या आहेत. उर्वरित 1 लाख 45 हजार 968 कार्यात्मक नळजोडणी करणे अपेक्षीत असून त्यासाठी सुनियोजित उपाययोजना आखून पाणी पुरवठा योजना निहाय सदर गावांना नियमितपणे पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जल जीवन मिशन हा कालबध्द कार्यक्रम असल्याने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांन्वये व त्याअनुषंगाने निर्गमित शासन निर्णयानुसार राज्यात जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाव्दारे गावांना पाणी पुरवठा होण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ठ विहित मुदतीत साध्य करण्यासाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात यावा. मेळघाटसह इतर तालुक्यातील गावांना सुरळीत पाणी पुरवठा होईल यासाठी अचूक नियोजन करुन कामे पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिल्यावर योजना पूर्ण करण्यास अनुक्रमे जास्तीत जास्त 18 महिने 36 महिन्यांचा कालावधी दिला आहे. मिशन अंतर्गत ब यादीमधील समाविष्ट ज्या नवीन योजना पूर्ण करण्यास तीन वर्षाचा अवधी लागतो अशा योजनांचा कार्यारंभ आदेश कोणत्याही परिस्थितीत मार्च 2021 पूर्वी देण्यात यावा. तर क यादीत समाविष्ट ज्या नवीन योजना पूर्ण करण्यास दोन वर्षाचा कालावधी लागतो अशांचा कार्यारंभ आदेश मार्च 2022 पूर्वी देण्यात यावेत. मार्च 2022 नंतर कार्यारंभ आदेश देता येणार नाही. जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात 19 गाव पाणी पुरवठा योजना, अचलपूर व चांदूरबाजरसाठी 24 गाव, चांदूरबाजार, अमरावती, भातकुली, अचलपूर 105 गाव, अमरावती नांदगाव पेठसाठी 33 गाव, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर साठी 144 गाव, चिखलदरा तालुक्यात गौरखेडा बाजार 35गाव, शहापूर 3 गाव, मोर्शी तालुक्यात 70 गाव पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण केल्या जाणार आहे, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. सावळकर यांनी बैठकीत सांगितले.

 

यावेळी बैठकीत टाकरखेडा शंभू येथील वीज पडून व पुरात वाहून मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह निधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी अपघाती निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची आस्थेवाईपणे विचारपूस केली.

 

 

निधी अखर्चित राहिल्यास जबाबदारी विभागप्रमुखावर 14 फेब्रुवारीपूर्वी परिपूर्ण नियोजन सादर करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे यंत्रणांना निर्देश

 











जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा

निधी अखर्चित राहिल्यास जबाबदारी विभागप्रमुखावर               

14 फेब्रुवारीपूर्वी परिपूर्ण नियोजन सादर करा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे यंत्रणांना निर्देश

 

- आमझरी होणार मँगो व्हिलेज

- प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण

- ‘माझी वसुंधरामध्ये सौर ऊर्जा यंत्रणा

 

अमरावती, दि. 31 : जिल्हा नियोजनात नमूद कामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पूर्वनियोजनात काही बदल आवश्यक असेल तर 14 फेब्रुवारीपूर्वी निधीसाठीचे परिपूर्ण नियोजन सादर करावे. त्यानंतर मात्र प्राप्त निधीतून सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. निधी अखर्चित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली,  त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार रामदास तडस, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार सर्वश्री प्रताप अडसड, बळवंतराव वानखडे, राजकुमार पटेल, देवेंद्र भुयार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, अपर आदिवासी विकास आयुक्त विनोद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला निधीत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. मात्र, ‘मिशन बिगेन अगेननंतर ती वाढविण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार यंदा 219 कोटी 18 लाख रूपये प्रस्तावित नियतव्यय आहे. आदिवासी क्षेत्रातील उपयोजनांसाठी 78 कोटी व सामाजिक न्याय योजनांसाठी 101 कोटी रुपयांची तरतूद आहे. गतवर्षी 271 कोटी 40 लाख रूपये निधी मंजूर होता. त्याप्रमाणे सर्व विभागांकडून विहित वेळेत पूर्ण होणा-या आवश्यक कामांचे  प्रस्ताव प्राप्त करून घेऊन निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र, निधी अखर्चित राहिल्यास ती संबंधित विभागप्रमुखाची जबाबदारी असेल. त्यामुळे सर्व विभागांनी परिपूर्ण नियोजन 14 फेब्रुवारीपूर्वी देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात

        जिल्ह्यात नियमित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून कामे केली पाहिजेत. वीजवहन यंत्रणा वारंवार बंद पडून पुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन तत्काळ कार्यवाही व्हावी. जिल्ह्यात ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरबाबत 15 मार्चपूर्वी आवश्यक दुरुस्ती किंवा नवी यंत्रणा कार्यान्वित करणे ही कार्यवाही व्हावी. सुरळीत वीजेसाठी 250 ते 300 ट्रान्सफॉर्मर नवे लागणार आहेत. त्यासाठी निधी देण्यात येईल. ट्रान्सफॉर्मर ऑन व्हीलही संकल्पना राबवून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तत्काळ बदलून पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. कृषी पंपासाठी शासनाने हितकारी धोरण अंमलात आणले आहे. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण

कोरोना महामारी लक्षात घेता विविध ठिकाणी यंत्रणा उभी राहिली. जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध सुविधांसाठी 22 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणावर भर असेल, असेही त्यांनी सांगितले.

पांदणरस्त्यांसाठी विशेष मॉडेल

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, चांगले पांदणरस्ते नसले तर शेतकरी बांधवांना त्रास होतो. हे लक्षात घेऊन पांदणरस्ते योजनेचे अमरावती जिल्ह्यासाठी विशेष मॉडेल अंमलात आणले जाईल. कन्व्हर्जनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजन, मनरेगा, जिल्हा परिषद, आमदार निधीतूनही कामे राबविण्यात येतील.  चिखलदरा येथील सिडको प्रकल्पाचे काम मार्गी लागण्यासाठी सतत पाठपुरावा होत आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: तिथे भेट देऊन आढावा घेणार आहेत.

माझी वसुंधरामध्ये सौर ऊर्जा यंत्रणा

        माझी वसुंधरा उपक्रमात सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यात पंचायत समित्या, पालिका या ठिकाणी इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवून त्यांना ऊर्जावापराबाबत स्वयंपूर्ण करण्यात येईल. 

आमझरी होणार मँगो व्हिलेज

जिल्ह्यातील आमझरी हे मँगो व्हिलेजम्हणून विकसित करण्यात येईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय उभारण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेकडून विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 

            जिल्ह्यातील जलप्रकल्प व तेथील नैसर्गिक संपदा लक्षात घेता इनलँड वॉटर टुरिझमवर भर देण्यात येईल. जिल्ह्यात गारमेंट हब निर्माण करण्याचेही नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक निधी देऊ, असेही त्यांनी सांगितले.

            लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांचा नियोजनात समावेश व्हावा. विहित वेळेत सर्व यंत्रणांनी कामे करावीत व विभागांच्या नियोजनाचे अंतिम प्रारूप सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.

00000

 

जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 











जिल्ह्यात  पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सुदृढ आरोग्यासाठी लसीकरणाबरोबरच उत्तम आहार महत्वाचा

- महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

            अमरावती, दि. 31 : नियमित लसीकरणासह प्रसुतीआधी व बालकांच्या जन्मानंतर माता व बालकांना उत्तम आहारही मिळणे आवश्यक असते. त्यासाठी शासनातर्फे पोषण आहार योजनेसह मार्गदर्शन, जनजागृतीही करण्यात येते. माता व बालकांच्या कुटुंबियांनीही याचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या आहारात नैसर्गिक भाज्या, डाळी आदी प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या बाबींचा समावेश असेल याची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हा रुग्णालयात आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते रायन फर्नांडिस, सौरवी शिरीष किंडे, अभिषेक सोनू उईके, सागर पंकज राजनकर या बालकांना लस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.मोहिमेत शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे.  लसीकरणापासून एकही बालक वंचित राहता कामा नये. त्यासाठी गृहभेटीही देण्यात येत आहेत.महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे, असे निर्देश पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

बालक व मातांच्या सुदृढ आरोग्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रसूतीपूर्व व नंतरच्या काळातील एक हजार दिवसांत घ्यावयाच्या आहाराबाबत आरोग्य विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे आहार असावा. तसा आहार व दक्षता ही जीवनशैली व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

लसीकरणाचे सर्व साहित्य वितरीत करण्यात आले आहे.सर्व बुथवर विहित वेळेत लसीकरण सुरू झाले. एकही बालक सुटू नये म्हणून गृहभेटी व आवश्यक तिथे प्रत्यक्ष जाऊन लसीकरण करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सांगितले.

00000

Saturday, January 30, 2021

जिल्ह्यात 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

 




जिल्ह्यात 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

शून्य ते पाच  वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस देण्याचे आवाहन

 

            अमरावती, दि. 30:  जिल्ह्यात येत्या 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे.  

           मोहिमेत बुथ ॲक्टिविटीद्वारे ग्रामीण भागात 1 लाख 35 हजार 352 व नागरी भागात 37 हजार 78 अशा 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागात 1 हजार 763 व नागरी भागात 200 असे 1963 बुथ असतील. त्यासाठी जिल्ह्यात 4 हजार 830 स्वयंसेवकांचे मनुष्यबळ असेल. 

           सर्व बालकांना 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे.  महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे. त्यासाठी मोबाईल पथकांनी सर्वदूर पोहोचून मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

           जिल्ह्यात विविध सार्वजनिक उपक्रम राबवून लसीकरण मोहिम यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गावांमधील प्रत्येक नवजात शिशूची माहिती गोळा करण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यात 14 हजार 548 लसकुपी, 1423 लस कॅरिअर, 5 हजार 588 आईसपॅक, नोंदीसाठी आवश्यक मार्कर पेन आदी सर्व साहित्य उपलब्ध झाले असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.

मान्यवरांकडून आवाहन

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये म्हणून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर यांनी केले आहे.

नागरिकांनी आपल्या बालकांना पोलिओचा डोस न चुकता जवळच्या अंगणवाडी, शाळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, टोलनाके, सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे याठिकाणी जाऊन द्यावा. डोस नुकतेच बाळ जन्मलेले असेल, यापूर्वी डोस दिला असेल तरीही द्यावा. बाळ आजारी असेल तर वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने डोस द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 







तिवसा पंचायत समितीचे लोकार्पण

जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार

अमरावती, दि. ३० : तिवसा पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी येथून व्हावी. जिल्ह्यात इतर ठिकाणी सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामेही गतीने पूर्ण होतील. जनसामान्यांच्या  प्रगतीतूनच विकासाची नवी शिखरे गाठणे शक्य होत असते. हे लक्षात घेऊन प्रशासनाने काम करावे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे केले.

तिवसा पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जि.प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, माजी आमदार वीरेंद्र जगताप,

पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखडे, पूजा आमले, शंकर गावंडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, गटविकास अधिकारी चेतन जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री यांनी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण केले, तसेच

हुतात्मा दिनानिमित्त हुतात्मा स्तंभाला अभिवादन आणि पुष्पांजली वाहिली.

 

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, उदघाटनाचा हा क्षण संस्मरणीय आहे.अद्ययावत आणि सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. प्रशासनाकडून जनसामान्यांची कामे आता गतीने पूर्ण व्हावीत.  विकासात कधीही राजकारण अडसर बनू नये याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.

सामान्यांच्या  प्रगतीतूनच विकासाची नवी शिखरे गाठणे शक्य होत असते. याची जाणीव प्रशासनाने ठेवावी. लोकप्रतिनिधी आणि  प्रशासन यांनी एकमेकांशी  ताळमेळ  ठेवत काम केले तर निश्चितच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व गतीने काम होते. गुरुकुंज मोझरी विकास आराखडा , संत गाडगेबाबा निर्वाणभूमी विकास आराखडा अशी अनेक कामे आपण पाठपुराव्याने केली.

महिला भगिनींच्या हाताला बळ देणारी योजना लवकरच हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.श्री. वानखेडे म्हणाले,  पंचायत समिती स्तरावरून बचतगटाची चळवळ गतिमान व्हावी. महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणाऱ्या योजनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

जि. प. अध्यक्ष श्री. देशमुख म्हणाले, यापूर्वी अनेक विकासकामे निधीअभावी थांबली होती. मात्र पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अथक प्रयत्नामुळे जिल्ह्यात विकासकामांसाठी मोठा निधी प्राप्त होत आहे. अनेक कामे पूर्णत्वास जात असल्याने विकासाचा प्रवाह गतिमान झाला आहे.

श्री. जगताप म्हणाले, इमारत तयार होणे ही मूलभूत सुविधा आहे ,पण सामान्यांच्या समस्या सोडविणे ही विकासाची गरज आहे. घरकुलची समस्या प्राधान्याने सोडविण्यात याव्या, असे त्यांनी सांगितले.

श्री. येडगे म्हणाले, गावावरून राष्ट्र ओळखावे. गावाच्या  विकासावरून  राष्ट्राचे भविष्य ओळखता येते,असे  राष्ट्रसंत म्हणतात.  ही सुसज्ज इमारत म्हणजे  विकासाच्या दिशेने चालणारे पाऊल आहे.   प्रशासकीय कामे  सुलभतेने करता यावी यासाठी पंचायत समितीची  सुसज्ज इमारत असणे आवश्यक होते. विकास  योजना आता अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल.

 नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते यावेळी झाला.सत्तार मुल्ला इसाक मुल्ला,निलेश खुळे, रोशनी  पुनसे, कल्पना दिवे आदी उपस्थित होते.ग्रामपंचायत  नवनिर्वाचित सदस्यांना  झाडाचे  रोपटे देऊन त्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते  करणार आला.आपल्या परिश्रमातून या रोपट्याला विकासाची फळे येऊ द्या, सर्वसामान्यांच्या विकासाला गती द्या  अश्या शुभेच्छा  नवनिर्वाचित सदस्यांना देण्यात आल्या.

यावेळी पालकमंत्री यांनी महिला बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन गट सदस्यांशी संवाद साधला.सभापती शिल्पा हांडे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन अजय अडिकणे आणि कलावंत दीपाली बाभुळकर यांनी केले

 

00000

नेत्रदान चळवळ सर्वदूर पोहोचावी - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 










लोकनेते स्व.भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबिर

नेत्रदान चळवळ सर्वदूर पोहोचावी

 - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावतीदि. 30 :  नेत्रदान चळवळीत अमरावती जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. ही चळवळ राज्यात सर्वदूर पोहोचावीअसे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे सांगितले.

तिवसा येथे लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होतेत्याचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुखआमदार बळवंतराव वानखडेमाजी आमदार वीरेंद्र जगतापतिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे

जि. प. सभापती बाळासाहेब हिंगणीकरमहिला व बालकल्याण सभापती पूजा आमलेवैद्यकीय अधिकारी पावन मालूसुरे,दिलीपभाऊ काळबांडेमुकुंदराव देशमुखयोगेश वानखडेअंकुश देशमुखसागर राऊतदिवाकर भुरभुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळपासून शिबिरात तपासणीला येणाऱ्याचा ओघ सुरू झाला.असंख्य रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. नेत्र तपासणी नंतर गरजूंना नेत्र आरोग्य राखण्यासाठी संबंधित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

आदित्य ज्योत  फाउंडेशन आणि स्व. भैय्यासाहेब ठाकूर समितीच्या  वतीने  गरजुसाठी  नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोतीबिंदू,मधुमेह आजार असलेल्या रुग्णांची तपासणी विशेष कक्षात करण्यात येत होती. नेत्र तपासणीनंतर चष्म्याचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

ज्ञानसंस्कृती संवर्धन व विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी वाचनालय व अभ्यासिका उपयुक्त - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 






तिवसा पोलीस ठाण्यात अभ्यासिका शुभारंभ

ज्ञानसंस्कृती संवर्धन व विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी वाचनालय व अभ्यासिका उपयुक्त

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

       

अमरावती, दि. 30 :  ज्ञानसंस्कृती वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्याना अध्ययन साधने व अभ्यासासाठी हक्काचे ठिकाण मिळवून देणे यासाठी वाचनालय व अभ्यासिकेची आवश्यकता असते. तिवसा येथे अभ्यासिका सुरू होत आहे. त्याचा विनियोग करत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास  व परिश्रमाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे केले.

तिवसा पोलीस ठाण्याच्या परिसरात सर एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय सभागृह व वाचन अभ्यासिकेचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. यावेळी तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखेडे, पंचायत समिती सभापती श्रीमती पूजा आमले, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन.,अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव, तिवसा तहसीलदार वैभव फरतारे,तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके, सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती,राजेश पांडे, शैलेश म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणी येतात. येथे वाचनालय व अभ्यासिकेच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यासाठी मोठी सुविधा झाली आहे. अभ्यास ही एक साधना आहे.या साधनेतून व्यक्तिमत्व विकास  होतो. त्यातून आपण  एका अर्थाने देश सेवेसाठी तयार होत असतो.भावी पिढीने या संधीचे सोने करून यश प्राप्त करावे, असे सांगून त्यांनी  उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

पोलीस ठाणे परिसरात अभ्यासिका असल्याने विद्यार्थी  सुरक्षित वातावरणात अभ्यास करतील. त्यामुळे त्यांनी एकाग्रतेने अभ्यास करून यश प्राप्त करावे,असे श्री. बालाजी यांनी सांगितले. श्रीमती उईके यांनी प्रास्ताविक तर गौरव तिवस्कर यांनी सूत्रसंचालन केले.

00000

Friday, January 29, 2021

चांदूर बाजार येथे शासकीय तूर खरेदीचा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शुभारंभ



चांदूर बाजार येथे शासकीय तूर खरेदीचा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

यांच्या हस्ते शुभारंभ

 

             अमरावती, दि. २९: चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज शासकीय तूर खरेदीचा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. खरेदी विक्री केंद्राचे अध्यक्ष शिवाजीराव बंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. भारंबे, दि विदर्भ को ऑप मार्केटिंग फेडरेशन ली. चे पणन व्यवस्थापक उमेश देशपांडे, खरेदी विक्री केंद्राचे व्य वस्थापक अशोक सीनकर यांचेसह शेतकरी बांधव आदी यावेळी उपस्थित होते.

         ६ हजार रुपये शासकीय तूर खरेदीचा हमी भाव तूर विक्रीसाठी आणनाऱ्या शेतकऱ्यासाठी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती चांदुर बाजार खरेदी विक्री केंद्राचे व्यवस्थापक यांनी दिली.

कोरोनाकाळात शेती क्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत महाविकास आघाडी शासनाने शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. गत १० वर्षात झाली नाही एवढी विक्रमी कापूस खरेदी झाली. तूर खरेदीलाही आरंभ झाला आहे. अधिकाधिक तूर खरेदी उत्पादक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत समावेश व्हावा व कुणीही वंचित राहू नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करण्याचे निर्देश राज्यमंत्री  श्री कडू 

कृषीपंप वीज धोरणाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन

 










कृषीपंप वीज धोरणाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

                     - बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन

तालुकास्तरीय क्रिडा संकुलात सर्व सुविधा निर्माण करा

 

अमरावती, दि. 29 : कृषीपंप वीज धोरण-2020 राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कृषी ग्राहकांना वीज बील थकबाकीची रक्कम भरणा करण्यासाठी सवलत दिली जात आहे. वसूल होणारी सवलतीची रक्कम संबंधित ग्राम पंचायतीत विकासनिधी म्हणून जमा होऊन गावांच्या विकासाला हातभार लागू शकतो. त्यामुळे या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी चांदूर बाजार येथे केले.

            चांदूर बाजार तहसील कार्यालयात राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली क्रिडा व उर्जा विभागाचा सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, चांदूर बाजारचे तहसीलदार धिरज स्थुल, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव, कार्यकारी अभियंता दिपक आघाव, उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे, श्री. वानखडे यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

            श्री. कडू म्हणाले की, कृषीपंप वीज धोरण 2020 अंतर्गत कृषी ग्राहकांना, शेतकऱ्यांना सौरउर्जा अथवा उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेतून मागासवर्गीय कृषी ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणीकरीता सवलत दिल्या जाते. पाच वर्षापर्यंतच्या थकबाकीवरील संपूर्ण विलंब व्याज व विलंब आकार माफ करण्यात येत असून उर्वरित रक्कम कृषी ग्राहकांच्या सोयीनुसार तीन वर्षात भरण्याची मुभा  दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून वीजबिल थकबाकी असलेल्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असल्याने या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्याकडील वीजबीलाची थकबाकी चूकवावी, असेही त्यांनी सांगितले.

            कृषीपंप वीज धोरणात अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ देता येईल, याची यादी तयार करण्याचे आदेश श्री. कडू यांनी महावितरण विभागाला दिले.

            जिल्ह्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी तालुकास्तरावर सर्व सुविधायुक्त क्रिडा संकुले निर्माण करावीत. खेळाचे मैदाने, ओपन जीम, वृक्ष लागवड आदी महत्वाच्या बाबी त्याठिकाणी तयार कराव्यात. क्रिडा विभागाला उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे यासाठी संकुलाच्या भागात दुकानांची सुनियोजित गाळे निर्माण करावे. गाळ्यांचे बांधकाम तसेच क्रिडा संकुलाच्या उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच तालुका क्रिडा समितीच्या अनुषंगाने नियोजित आराखडा तयार करुन संकुलाचे काम पूर्णत्वास न्यावे. लीज पध्दतीने दुकानांचे गाळे देतांना कालावधी, दुरुस्ती व देखभाल, नियमित भाडे, अटी व शर्ती आदी बाबींचा करारात स्पष्ट उल्लेख करावा. चांदूर बाजार व अचलपूर येथील क्रिडा संकुलाच्या परिसरातील अतिक्रमणे हटवितांना संबंधितांना पूर्व कल्पना देऊन वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश श्री कडू यांनी यावेळी दिले.

            बैठकीत अतिवृष्टीमुळे पडझड व नुकसान झालेल्या घरांच्या कुटूबांना राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते नुकसान भरपाईच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. गोरगरीबांच्या अडचणीच्या प्रसंगी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सदैव प्रयत्नरत राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

00000

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...