निधी अखर्चित राहिल्यास जबाबदारी विभागप्रमुखावर 14 फेब्रुवारीपूर्वी परिपूर्ण नियोजन सादर करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे यंत्रणांना निर्देश

 











जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा

निधी अखर्चित राहिल्यास जबाबदारी विभागप्रमुखावर               

14 फेब्रुवारीपूर्वी परिपूर्ण नियोजन सादर करा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे यंत्रणांना निर्देश

 

- आमझरी होणार मँगो व्हिलेज

- प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण

- ‘माझी वसुंधरामध्ये सौर ऊर्जा यंत्रणा

 

अमरावती, दि. 31 : जिल्हा नियोजनात नमूद कामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पूर्वनियोजनात काही बदल आवश्यक असेल तर 14 फेब्रुवारीपूर्वी निधीसाठीचे परिपूर्ण नियोजन सादर करावे. त्यानंतर मात्र प्राप्त निधीतून सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. निधी अखर्चित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली,  त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार रामदास तडस, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार सर्वश्री प्रताप अडसड, बळवंतराव वानखडे, राजकुमार पटेल, देवेंद्र भुयार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, अपर आदिवासी विकास आयुक्त विनोद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला निधीत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. मात्र, ‘मिशन बिगेन अगेननंतर ती वाढविण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार यंदा 219 कोटी 18 लाख रूपये प्रस्तावित नियतव्यय आहे. आदिवासी क्षेत्रातील उपयोजनांसाठी 78 कोटी व सामाजिक न्याय योजनांसाठी 101 कोटी रुपयांची तरतूद आहे. गतवर्षी 271 कोटी 40 लाख रूपये निधी मंजूर होता. त्याप्रमाणे सर्व विभागांकडून विहित वेळेत पूर्ण होणा-या आवश्यक कामांचे  प्रस्ताव प्राप्त करून घेऊन निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र, निधी अखर्चित राहिल्यास ती संबंधित विभागप्रमुखाची जबाबदारी असेल. त्यामुळे सर्व विभागांनी परिपूर्ण नियोजन 14 फेब्रुवारीपूर्वी देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात

        जिल्ह्यात नियमित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून कामे केली पाहिजेत. वीजवहन यंत्रणा वारंवार बंद पडून पुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन तत्काळ कार्यवाही व्हावी. जिल्ह्यात ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरबाबत 15 मार्चपूर्वी आवश्यक दुरुस्ती किंवा नवी यंत्रणा कार्यान्वित करणे ही कार्यवाही व्हावी. सुरळीत वीजेसाठी 250 ते 300 ट्रान्सफॉर्मर नवे लागणार आहेत. त्यासाठी निधी देण्यात येईल. ट्रान्सफॉर्मर ऑन व्हीलही संकल्पना राबवून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तत्काळ बदलून पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. कृषी पंपासाठी शासनाने हितकारी धोरण अंमलात आणले आहे. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण

कोरोना महामारी लक्षात घेता विविध ठिकाणी यंत्रणा उभी राहिली. जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध सुविधांसाठी 22 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणावर भर असेल, असेही त्यांनी सांगितले.

पांदणरस्त्यांसाठी विशेष मॉडेल

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, चांगले पांदणरस्ते नसले तर शेतकरी बांधवांना त्रास होतो. हे लक्षात घेऊन पांदणरस्ते योजनेचे अमरावती जिल्ह्यासाठी विशेष मॉडेल अंमलात आणले जाईल. कन्व्हर्जनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजन, मनरेगा, जिल्हा परिषद, आमदार निधीतूनही कामे राबविण्यात येतील.  चिखलदरा येथील सिडको प्रकल्पाचे काम मार्गी लागण्यासाठी सतत पाठपुरावा होत आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: तिथे भेट देऊन आढावा घेणार आहेत.

माझी वसुंधरामध्ये सौर ऊर्जा यंत्रणा

        माझी वसुंधरा उपक्रमात सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यात पंचायत समित्या, पालिका या ठिकाणी इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवून त्यांना ऊर्जावापराबाबत स्वयंपूर्ण करण्यात येईल. 

आमझरी होणार मँगो व्हिलेज

जिल्ह्यातील आमझरी हे मँगो व्हिलेजम्हणून विकसित करण्यात येईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय उभारण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेकडून विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 

            जिल्ह्यातील जलप्रकल्प व तेथील नैसर्गिक संपदा लक्षात घेता इनलँड वॉटर टुरिझमवर भर देण्यात येईल. जिल्ह्यात गारमेंट हब निर्माण करण्याचेही नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक निधी देऊ, असेही त्यांनी सांगितले.

            लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांचा नियोजनात समावेश व्हावा. विहित वेळेत सर्व यंत्रणांनी कामे करावीत व विभागांच्या नियोजनाचे अंतिम प्रारूप सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती