अचलपूर तालुक्यात 14 विधवा महिलांना मदत
कुटुंबप्रमुखाचा अनपेक्षितपणे मृत्यू झाल्यास एकाकी पडलेल्या महिला भगिनींवर कुटुंबाची जबाबदारी येते. या संकटात त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना लागू करण्यात आली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा, कामगार व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.
राज्यमंत्री श्री. कडू यांनी तहसील कार्यालयाच्या विविध बाबींचा आढावा घेतला असता या योजनेतून विधवा महिलांना तत्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अचलपूर तालुक्यातील 14 विधवा महिलांना शासनातर्फे प्रत्येकी 20 हजार रूपयांची मदत देण्यात आली. अचलपूरचे तहसीलदार मदत जाधव, नायब तहसीलदार एस. एम. श्रीराव, अव्वल कारकून शे. युसूफ शे. हुसेन, प्रदीप धुले यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही केली.
अचलपूर पंचायत समिती क्षेत्रातील 9 महिलांना व नगरपरिषद अचलपूर क्षेत्रातील 5 विधवा भगिनींना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी योजनेतून दोन लाख 80 हजार रूपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्याप्रमाणे ग्रामीण क्षेत्रात एक लाख 80 हजार व नगरपालिका क्षेत्रात एक लाख रूपयाचा असा एकूण 2 लाख 80 हजार रूपये आर्थिक सहायता निधी वितरीत करण्यात आला.
विधवा भगिनींना सन्मानाने जगता यावे, यासाठी मदत देण्याचा योजनेचा हेतू आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. कुणीही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment