Thursday, June 25, 2020

जिल्हाधिका-यांची अंजनगाव सुर्जीला भेट व शेतांची पाहणी








सदोष बियाणे तक्रारींबाबत तत्काळ पंचनामे करावेत

       - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

            अमरावती, दि. 25 : काही कंपन्यांच्या बियाण्याची उगवण होत नसल्याच्या शेतकरी बांधवांच्या तक्रारींनुसार तत्काळ पंचनामे करून रविवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज अंजनगाव सुर्जी येथे दिले.

            जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज अंजनगाव सुर्जी शहर व तालुक्याचा दौरा केला. या पाहणीत त्यांनी अंजनगाव सुर्जी येथील कंटेनमेंट झोन, बफर झोनची पाहणी केली, तसेच तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन शेतीची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार विश्वनाथ घुगे यांच्यासह नगरपालिका व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अंजनगाव सुर्जी येथील कंटेनमेंट झोन, बफर झोनची पाहणी करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने शहरात सर्व प्रकारची दक्षता घेतली जावी. नगरपरिषद, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभागांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. कोरोना प्रतिबंधक दक्षता नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

            तालुक्यातून सदोष बियाण्याबाबत सुमारे सव्वाशे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींनुसार तत्काळ पंचनामे पूर्ण करून रविवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.

हसनापूर येथे कनीराम रोकडे यांच्या शेताला भेट देऊन जिल्हाधिका-यांनी स्थानिक शेतकरी बांधवांशी चर्चा केली. तूरखेड येथील अलकाताई शंकरराव कडू यांच्या शेतातील फळबाग लागवडीची पाहणीही त्यांनी केली. हसनापूर ते आडगाव खाडे या दरम्यानच्या पांदणरस्त्याची पाहणीही जिल्हाधिका-यांनी यावेळी केली.

विविध योजनांतील प्रलंबित मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

                                    000  

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...