Thursday, March 31, 2022

मेळघाटातील 4 हजार कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


चावडीवाचनानंतर अपात्र नावांची वगळणी; गरजूंचा समावेश

मेळघाटातील 4 हजार कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ

-   जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

 अमरावती, दि. 31 : मेळघाट क्षेत्रात गावोगाव शिधापत्रिका चावडीवाचनाचा धडक कार्यक्रम राबवून मृत व अपात्र व्यक्तींची नावे वगळण्यात आली आणि अंत्योदय योजनेत पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या मोहिमेमुळे मेळघाटातील तब्बल 4 हजार कुटुंबांचा नव्याने अंत्योदय योजनेत समावेश होऊन त्यांना योजनेचा लाभ मिळाला.

गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात धान्य मिळवून देण्यासाठी अंत्योदय योजना राबवली जाते. मेळघाटातील दुर्गम पाड्यापाड्यांवर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनानुसार चिखलदरा व धारणी तालुक्यातील गावांमध्ये शिधापत्रिका चावडीवाचनाचा धडक कार्यक्रम राबविण्यात आला.

 या मोहिमेत शिधापत्रिकेतील मृत सदस्यांची नावे वगळण्याबरोबरच राज्याबाहेर किंवा इतर जिल्ह्यांत गेलेल्या व्यक्तींच्या शिधापत्रिका कमी करण्यात आल्या. शासकीय नोकरीत असलेल्या शिधापत्रिकाधारकांची नावे अंत्योदय योजनेत असल्याचे मोहिमेत आढळून आले. अशा नोकरदारांची शिधापत्रिका केशरी शिधापत्रिकेच्या वर्गवारीत टाकण्यात आली.

या शोध मोहिमेमुळे अंत्योदय योजनेच्या इष्टांकात गरजू व्यक्तींचा समावेश करणे शक्य झाले. त्यानुसार मेळघाटातील पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेत व प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात आले. या सर्व प्रक्रियेमुळे मेळघाटातील पाड्यापाड्यांवरील तब्बल 4 हजार कुटुंबांचा नव्याने अंत्योदय योजनेत समावेश झाला. या सर्वांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहिम महसूल विभाग, पुरवठा विभागातर्फे विविध विभागांच्या सहकार्याने व समन्वयाने राबविण्यात आली. 

 

00000

 

Wednesday, March 30, 2022

जिल्हा लोकशाही दिन 4 एप्रिलला होणार

जिल्हा लोकशाही दिन 4 एप्रिलला होणार

 

अमरावती, दि.30: जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार या महिन्यातील लोकशाहीदिन दि.4 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी जिल्हा लोकशाही दिनाचे दिवशी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

 

 

 


समाजकल्याण विभागासाठी ‘डायनॅमिक वेबसाईट’ व नेट सुविधेसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

 समाजकल्याण विभागासाठी ‘डायनॅमिक वेबसाईट’

व नेट सुविधेसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन


अमरावती, दि.30: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत विविध योजनांची कार्यपध्दती, शासन निर्णय व इतर माहितीसाठी डायनॅमिक वेबसाईट तयार करण्यासाठी व सर्व शासकीय निवासी शाळा मुलांचे, तसेच मुलींचे वसतिगृह येथे इंटरनेट लिझ लाईन सुविधा पुरविण्यासाठी इच्छूक संस्थांकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

  इंटरनेट लिझ लाईन सुविधा ही वायरलेस व वायर या दोन्ही पध्दतीने पुरविण्यात यावी. झिरो डाऊन टाईम सुविधा लिझलाईनची असावी. डाटा प्रायव्हसी व सिक्युरिटी आणि नेटवर्क सुरक्षा आदी लिझ लाईन सुविधेसोबत असणे आवश्यक आहे. 24/7 सपोर्ट टीम असावी. दरपत्रक सादर करणा-या कंपनीला शासकीय व प्रशासकीय कार्यालयाला सुविधा पुरविण्याचा अनुभव असावा.

डायनॅमिक वेबसाईटसाठी दुकाने परवाना असणे बंधनकारक आहे. जी. एस. टी. रजिस्ट्रेशन असावे. उद्यम सर्टिफिकेट असावे. शासकीय वेबसाईट तयार करण्याचा अनुभव, तसेच पीएचपी, जावा व एसक्यूएलची टीम असावी. इच्छूक संस्थांनी ही दरपत्रके दि. 4 एप्रिल 2022 पर्यंत सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
                                          000

निवृत्तीवेतनधारकांना मार्चच्या वेतनाबाबत सूचना

 निवृत्तीवेतनधारकांना मार्चच्या वेतनाबाबत सूचना

 

            अमरावती, दि.30: अमरावती कोषागारामधून निवृत्तीवेतन स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन व कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की, मार्च अखेर असल्याने तसेच माहे एप्रिल महिन्याच्या सुरवातीला शासकीय सुट्टया असल्याने माहे मार्च 2022 चे देय होणारे मासिक निवृत्तीवेतन अदा होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. कृपया सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनी नोंद घेवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे.

0000

दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन

 दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन

 

        अमरावती, दि.30: दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे. आर टी ओ कार्यालयाकडून हेल्मेट वापरासंबंधी मोहिम राबविण्यात येत आहे.  बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोहिमेतंर्गत हेल्मेट वापर करण्याबाबत नागरिक, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थेतील अधिकारी, कर्मचारी  यांना हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच हेल्मेट न वापरणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

            सर्व दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट वापरावे. तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: हेल्मेट वापरुन  कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना हेल्मेट वापरासंबंधी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

0000

अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी मंजूर - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकू

 



अंगणवाडी सेविकांना दिलासा; महिला व बालविकास मंत्र्यांच्या पाठपुराव्याने शासनाचा निर्णय

अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी मंजूर

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. ३०: राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींना होणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

 

       अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, तसेच मदतनीस यांना एकरकमी लाभ मिळवून देण्यासाठी निधी मिळण्याबाबत प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत विशेष प्रयत्न करून शासन स्तरावर पाठपुरावा केला. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली. 

 

     यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.

 

     अशा एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली निघून त्यांना लाभ मिळणे शक्य होणार आहे.

 

     अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची कार्यवाही महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.

00000

 

 

 


अंगणवाडी सेविका, मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात - ॲड.यशोमती ठाकूर

 



अंगणवाडी सेविकामदतनीसांना प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात

ॲड.यशोमती ठाकूर

 

            मुंबईदि. 29 : पोषण ट्रॅकरचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकामदतनीस यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात लवकरच जमा केला जाईलअशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. यासाठी सुमारे ५१ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

            ५५३ तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना या निर्णयामुळे अनुक्रमे प्रत्येकी ५०० रु आणि  २५० रु दरमहा प्रोत्साहन भत्ता मागील थकबाकीसह उपलब्ध होणार आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१. ऑक्टोबर २०२१ या  ७ महिन्यांच्या कालावधीसाठी सदर प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या थेट बँक खात्यावर देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

            राज्याच्या  अंगणवाडी केंद्रातून ० ते ६ वयोगटातील मुलेगर्भवती महिलास्तनदा माता यांना सकस पोषण आहार दिला जातो. याद्वारे दररोज जवळपास ७६ लाख लाभार्थींपर्यंत शासन पोहोचत आहे. ५५३ तालुक्यातील अंगणवाड्यांमधून पोषण आहार देत असतानाच पोषण ट्रँकर या अॅपच्या माध्यमातून लहान मुलांचीतसेच नवजात शिशुच्या पोषणाचीवाढीचीही नोंद ठेवली जाते. या मुलांचे वजनउंची आदीबाबतची माहिती अद्ययावत केली जाते. त्यानुसार या मुलांकडे लक्षही दिले जाते. या पोषण ट्रॅकर अॅपमधून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्याकुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना हा प्रोत्साहन भत्ता मिळेल.

            राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. केंद्र आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून निधीची तरतूद करून असे उपक्रम राबविले जातात. कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या  अंगणवाडी सेविकामदतनीस यांनी फार मोठी कामगिरी पार पाडली आहेत्यामुळे त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे हे शासन म्हणून आपले कर्तव्य असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकामदतनीस यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

*****

Tuesday, March 29, 2022

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना आवाहन

 


परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा

-    जिल्हाधिकारी पवनीत कौर

विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना आवाहन

 

अमरावती दि. 29 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील समस्त विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांच्याशी शुक्रवार, दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता थेट संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम दिल्ली येथील टालकाटोरा स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार असून ऑनलाईन पध्दतीने मा. पंतप्रधान संवाद साधणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या ताणतणावाच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात आपले प्रश्न, मत http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AMRAVATI/en/home/ या संकेतस्थळावर नोंदवावे.

तसेच संबंधितांना आपले विचारही या संकेतस्थळावर अपलोड करता येतील. हा कार्यक्रम दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्या, शिक्षा मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर एकाचवेळी प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ससिंद्रन सि.के. यांनी दिली आहे.

          ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येनी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर

 








कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करावी

-      पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर

 

कामगारांची आरोग्य तपासणी व किट वाटप  शिबिराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

 

          अमरावती दि29: बांधकाम क्षेत्रात कामगार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची बाब आहे. जिल्ह्यातील सर्व कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पूर्ण करून  तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेण्याबाबत नियोजन करण्यात यावे असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या सुविधा व विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता आरोग्य तपासणी, माध्यान्ह भोजन, घरेलू कामगार नोंदणी, ई- श्रम कार्ड वाटप व अत्यावश्यक सुरक्षा किट वाटपाबाबत तिवसा येथे  शिबिराचे आयोजन करण्यात आले. कामगार विभाग, कामगार उपायुक्त कार्यालयाच्यावतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पुजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पाताई हांडे, उपसभापती शरद वानखेडे, पंचायत समिती सदस्य सत्तार मुल्ला, निलेश खुळे, कल्पना दिवे, तिवसा नगराधक्ष्य योगेश वानखेडे, तहसिलदार वैभव फरतारे, नोंदणी अधिकारी अविकांत चौधरी, संजय धुर्वे, अर्चना कांबळे, नियंत्रक संजय पांडे आदी उपस्थित होते.

              तिवसा तालुक्यात 5 हजार 634 कामगारांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली असुन शिबीरात श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते 300 कामगारांना अत्यावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तिवसा तालुक्यात कामगारांसाठी माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत जेवणाच्या व्यवस्थेची त्यांनी माहीती घेतली. वीटभट्टी, बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना वेळेत व सकस जेवण देण्याबाबत श्रीमती ठाकुर यांनी निर्देश दिले.

नोंदणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करावे

        जास्तीत जास्त कामगाराची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करण्यात यावी. नोंदणी प्रक्रियेबाबत तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. एकही कामगार नोंदणी प्रक्रिया व योजनांच्या लाभापासुन वंचित राहता कामा नये, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अत्यावश्यक किटमधील सांधनांचा कामगारांनी वापर  करावा

           सुरक्षा किट मध्ये कामगारांसाठी बॅटरी, हेल्मेट, चटई, जेवणाचा डबा, रबरी बुट, दोरी, हातमोजे, मास्क, जॅकेट, हेडफोन इत्यादी वस्तुंचा समावेश आहे. या सर्व साधनांचा सर्व क्षेत्रिय ठिकाणी वेळोवेळी उपयोग करावा. संरक्षणार्थ असलेल्या या साधनांचा उपयोग  करतांना कामगारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास श्रीमती ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केला.

           यावेळी दिपक बिसेन, दिनेश चवळे, कविता चौधरी, सलिम शहा, अंकुश मेश्राम यांना ई-श्रम कार्ड व नलिनी मेश्राम, अंजु गवळी, तुळशीराम माहोरे, सय्यद खलिम, किशन कोल्हाट व शंकर चाकरे यांना सुरक्षा किटचे वाटप श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

000000

तिवसा तालुक्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन

 




तिवसा तालुक्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते 1 कोटी 20 लक्ष

रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

           अमरावती दि 29: ग्रामीण भागातील विविध विकासकामे  पुर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकुर यांनी येथे दिली. तिवसा तालुक्यात आज विविध‍ विकासकामांच्या भूमिपूजन श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विविध भूमिपूजनांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, अभ्यासिका, रस्ता बांधकाम, रस्त्याचे काँक्रिटीकरण, स्मशानभुमी परिसराचे सौंदर्यीकरण आदी विकास कामांचा समावेश होता.

 

                 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त 42 लक्ष रुपयांच्या निधीतून विद्यार्थ्यांकरीता अभ्यासिका व वाचनालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन ऍड. श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरी दलितेतर योजनेअंतर्गत सार्वजनिक हिंदु स्मशानभूमीच्या 11 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या सौंदर्यीकरणांच्या कामाचे  भूमिपूजन यावेळी करण्यात आले. तिवसा नगर पंचायत कार्यालय परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत अंदाजे 5 लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन व सिमेंट नाली बांधकामाच्या कामाचे अंदाजे 21 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तिवसा तालुक्यात योजनेअंतर्गत प्राप्त निधीतुन रस्त्यांच्या, नालीच्या कामाचे व परिसर सौदर्यीकरणा सारख्या विविध कामाचे भूमिपूजन  आज करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश वानखेडे, नगर परिषदेच्या उपाध्यक्ष प्रिया विघ्ने, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप काळबांडे, नगरसेवक वैभव वानखेडे आदी उपस्थित होते.

00000

 

 

विद्यार्थ्यांनी सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी - ऍड. यशोमती ठाकूर रासेयोच्या निवासी श्रम शिबीराला पालकमत्र्यांकडून भेट

 








विद्यार्थ्यांनी सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी

                                                          - ऍड. यशोमती ठाकूर

रासेयोच्या निवासी श्रम शिबीराला पालकमत्र्यांकडून भेट

 

         अमरावती दि 29:  विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्काराचे, सर्वधर्मसमभावाचे मूल्य रुजविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनच्या माध्यमातून केले जाते. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी. जीवनात सेवा व त्याग या मूलमंत्राचा स्वीकार करून समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन जिल्हयाच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी येथे केले.

 

          कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत तिवसा तालुक्यातील शेंडोळा खुर्द येथे शासकीय  औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनच्या निवासी श्रम संस्कार शिबिराला श्रीमती ठाकूर यांनी भेट दिली.यावेळी त्या बोलत होत्या. 

 

               जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा आमले, तिवस्याच्या पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखेडे, तिवसा सरपंच मुकुंद पुनसे, शेंडोळा खुर्दचे सरपंच अर्चना चिकटे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक श्री देवतळे, मोझरीच्या प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विवेक पडोळे, शासकीय तंत्र माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र लोखंडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसाळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश साबळे, उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरतारे आदी उपस्थित होते. 

 

                विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व, छंद, सवयी, दृष्टिकोन, जीवनावश्यक मुल्ये व क्षमता विकसीत कराव्या. अनुभव व जिज्ञासु वृत्तीची जोपासना करावी. रासेयोच्या माध्यमातुन शिकवण्यात येणारी शिस्तबद्धता अंगी बाणवावी. जीवनात यशस्वी होण्याचे हे सुत्र सर्वांनी आत्मसात करण्याबाबत श्रीमती ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना सांगीतले.

    

               शिबिरात गुरुकुंज  मोझरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. दिनांक 27 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ग्रामस्वच्छता, स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन, प्रभात फेरी, अंधश्रद्धा निर्मुलन, सामुदायिक प्रार्थना, मानवी जीवनात संस्काराचे महत्व आदी विषयांवर व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य विवेक पडोळे यांनी दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

              भातकुली तालुक्यातील आष्टी येथील बीएसएफचे जवान शहिद कॉन्स्टेबल संजय जवंजाळ यांना कर्तव्यावर असतांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन श्रीमती ठाकुर यांनी त्यांना धीर दिला.

 

 

 

Monday, March 28, 2022

कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर कलावंतांना एकरकमी अर्थसाह्य जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 36 अर्ज मंजूर

 



कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर कलावंतांना एकरकमी अर्थसाह्य

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 36 अर्ज मंजूर

 

अमरावती, दि. 28 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटित व असंघटित कलाप्रकारांतील विविध कलावंतांना एकरकमी अर्थसाह्य करण्यात येत आहे. योजनेचे निकष पूर्ण करणा-या 36 कलावंतांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांचाही संवेदनशीलपणे विचार करावा व अधिकाधिक कलावंतांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

योजनेत प्राप्त अर्जांनुसार पात्र कलावंतांची निवड करण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, समितीचे सदस्य सचिव अति. मु. का. अधिकारी एस. एम. कुलकर्णी, जिल्हा सूचना अधिकारी अरूण रणवीर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, महापालिकेचे डॉ. विशाल काळे, सदस्य दिलीप काळबांडे,राजेंद्र भुडेकार, हरीनारायण ढोले, दिलीप व-हाडे, भोलेश्वर मुदगल, देवीदास गायकवाड, प्रमिलाताई गणवीर, नारायण दरेकर, अजय महल्ले आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात टाळेबंदी लागू होती. त्यामुळे सुमारे दीड वर्षे कलावंतांना कला सादरीकरण व त्यातून मिळणा-या उत्पन्नापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक प्रकारातील कलाकारांना शासनातर्फे प्रतिकलावंत 5 हजार रूपये एकरकमी अर्थसाह्य देण्यात येत आहे.

जिल्ह्यातून 14 तालुक्यांतून 197 अर्ज प्राप्त झाले. योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षांचा अधिवास, 15 वर्षे कला क्षेत्रात कार्यरत असणे, उत्पन्नाचा दाखला, वृद्ध कलावंत योजनेचा लाभ घेतलेला नसणे आदी निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार प्राप्त अर्जांपैकी 36 अर्जदारांची निवड करण्यात आली, अशी माहिती सदस्य सचिव श्री. जाधवर यांनी दिली. कलावंतांचे कोविडकाळात मोठे नुकसान झाले. त्यामुळे प्राप्त अर्जांचा संवेदनशीलपणे विचार करावा. अधिकाधिक कलावंतांना योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

 

नझूल मिळकतधारकांनी 31 मार्चपूर्वी कराचा भरणा करावा - भूमी अभिलेख उपअधिक्षक अनिल फुलझेले

 

नझूल मिळकतधारकांनी 31 मार्चपूर्वी कराचा भरणा करावा

-        भूमी अभिलेख उपअधिक्षक अनिल फुलझेले

अमरावती, दि.  28 : नझूल मिळकतधारकांनी कर व थकबाकीचा भरणा 31 मार्चपूर्वी करावा, अन्यथा जमीन महसूल अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा भूमी अभिलेख उपअधिक्षक अनिल फुलझेले यांनी दिला आहे.

शहरात अनेक नझूल मिळकतधारक आहेत. त्यांनी दरवर्षी 31 मार्चपूर्वी कराचा भरणा करणे आवश्यक आहे. तथापि, केवळ 35 टक्के नझूल मिळकतधारकांनी कर भरला आहे. 65 टक्के मिळकतधारकांनी अद्यापही कर भरलेला नाही.  भूमी अभिलेख कार्यालयाने वारंवार विनंती, सूचना करूनही अनेकांनी कराची रक्कम भरली नाही. या बाबीची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

संबंधित मिळकतधारकांनी 31 मार्चपूर्वी कर न दिल्यास थकित नझूल करवसुलीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार कार्यवाही करण्याचा इशारा श्री. फुलझेले यांनी दिला आहे.

00000

 

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...