अमरावती, दि. 26 : जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पाच तालुक्यांतील 42 गावांचा दौरा केला आहे. त्यानुसार त्यांनी पाणीवितरण व अपेक्षित नियोजन याबाबत चर्चा करण्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्प डावा व उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावली आहे. टंचाई व उपाययोजनांच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. 27) दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
बैठकीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदींसह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित राहणार आहेत. टंचाईच्या अनुषंगाने अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणीवितरण, चाराटंचाई व अपेक्षित कार्यवाही आदी विविध विषयांवर चर्चा होईल.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी 42 गावांचा पाहणी दौरा नुकताच केला. यावेळी त्यांनी शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकरी, शेतमजूर, गावकरी यांच्याशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
No comments:
Post a Comment