अमरावती, दि. 23 : नवी पिढी सुदृढ व सशक्त होण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचे मोठे योगदान आहे., आता शासनाने हाती घेतलेली मीझल्स रुबेला लसीकरण मोहिम अत्यंत महत्वपूर्ण असून, त्याच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आज येथे दिले.
मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. परदेशी म्हणाले की, ही मोहिम शाळांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य मुलामुलींपर्यंत पोहोचून त्यांचे लसीकरण झाले पाहिजे. अंगणवाड्यांत, शाळांत पालकसभा घेण्यात याव्यात. लसीकरणाबाबत पालकांमध्ये जनजागृती करावी. आदिवासी क्षेत्रात, दुर्गम परिसरात पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळवावे, असेही ते म्हणाले.
मोहिमेबाबत प्रशिक्षण, जनजागृतीसाठी प्रत्येक रूग्णालयात फलक, रॅली, मेळावे, प्रसिद्धी आदी नियोजन या बैठकीत करण्यात आले.
No comments:
Post a Comment