Saturday, April 30, 2022

विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा उपक्रम प्रशंसनीय - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 











संत ज्ञानेश्वर सभागृहात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा उपक्रम प्रशंसनीय

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

      अमरावती, दि. 01 : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती नागरिकांना व्हावी, या दृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सचित्र प्रदर्शनाचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

            संत ज्ञानेश्वर सभागृह येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व विकास कामांची माहिती देणाऱ्या छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

            आमदार सुलभाताई खोडके, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विभागीय माहिती कार्यालयाचे प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार, श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली ठाकरे, हरीभाऊ मोहोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनामार्फत सर्वंकष प्रयत्न होत आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत महाराष्ट्रदिनी एकाचवेळी राज्यभर सर्व विभागीय ठिकाणी सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम नागरिकांना योजना व विकास कामांची माहिती मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हास्तरावरील नाविण्यपूर्ण योजना, उपक्रम व संबंधित यंत्रणा आदी माहितीबाबतही याचप्रकारे सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            महाविकास आघाडी शासनातर्फे गेल्या दोन वर्षात कोरोनाकाळातही अनेकविध विकासकामे राबविण्यात आली. या उपक्रमांची माहिती प्रदर्शनातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे आमदार श्रीमती खोडके यांनी सांगितले.

            गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना, उद्योग विभाग, आरोग्य, महसूल तसेच इतर विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण योजनांची सचित्र माहिती या प्रदर्शनात सादर करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार यांनी केले.

            प्रदर्शनात अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विकास कामांची माहिती सादर करण्यात आली आहे. माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी सूत्रसंचालन केले. माहिती सहायक पल्लवी धारव यांनी आभार मानले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, रामेश्वर अभ्यंकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक रवीराज ढोणे, आयआयएमसीचे प्रा. अनिल जाधव, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. कुमार बोबडे यांच्यासह अनेक मान्यवर, महिला, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            हे प्रदर्शन संत ज्ञानेश्वर सभागृहात दिनांक 5 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या कालावीत सर्वांसाठी खुले आहे.

00000       

विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आजपासून आयोजन संत ज्ञानेश्वर सभागृहात उद्घाटन




विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आजपासून आयोजन

संत ज्ञानेश्वर सभागृहात उद्घाटन

 

अमरावती, दि.30 : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि  विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या  अमरावती विभागस्तरीय   प्रदर्शनाचे उद्या दि.1 मे रोजी  संत ज्ञानेश्वर सभागृह येथे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

संत ज्ञानेश्वर सभागृहात सकाळी नऊला होणाऱ्या या कार्यक्रमास आमदार सुलभाताई खोडके, राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त आरती सिंह, महानगरपालिका आयुक्त प्रविण आष्टीकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

            'दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची' या मोहिमेअंतर्गत शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येईल. हे प्रदर्शन दि. 5 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये राज्यासोबतच अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा  स्वतंत्ररित्या  समावेश करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारने  विविध विकासकामे केली असून कोरोना महामारी आणि अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना राबविल्या असून या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने राज्यातील विविध ठिकाणी ही प्रदर्शने आयोजित केली आहेत. या प्रदर्शनास नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर आणि नागपूर-अमरावती  विभाग संचालक हेमराज बागुल  यांनी केले आहे.

00000

 

 

 

 

 

 

 


रस्ते निर्मिती व बळकटिकरणामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना - पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर











 रस्ते निर्मिती व बळकटिकरणामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना

- पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर


चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण भागात 75 कोटींच्या रस्ते निर्मिती व रस्ते सुधारणा कामाचे पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

 

          अमरावती, दि.30:  दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात रस्त्यांची निर्मिती व सुधारणा अत्यावश्यक आहे. रस्त्यांच्या निर्मिती व बळकटीकरणामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना मिळेल. नागरिकांसाठी रस्ते निर्मिती व इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हयाच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

          आज चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण भागात विविध योजनेअंतर्गत प्राप्त 75 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते निर्मिती व सुधारणांच्या कामांचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अर्थसंकल्पातर्गत प्राप्त 75 कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.


प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन

          लोणी येथील पाळा ते लोणी NH 06 या 3 कोटी 41 लक्ष रुपयांच्या निधीतून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता कामाचे भुमीपूजन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सोनोरा  बु. येथे  बग्गी सोनोरा बु. ते राजुरा येथील 5 कोटी 58 लक्ष रुपयांच्या निधीतून निधीतून निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन, पिंपळखुटा येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 3 कोटी 31 लक्ष रुपयांच्या निधीतून दाभाडा (कावली) ते पिंपळखुटा रस्ता कामाचे भुमीपूजन, पहुर येथे  MRL03 पाचोड ते पहुर NH 06 या 6 किमी रस्त्याचे 3 कोटी 64 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या रस्ता कामाचे भुमीपूजन आणि
नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव कंझरा या 30 लक्ष रुपयांच्या निधीतून रस्ता सुधारणा कामाचे भुमीपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून रस्ते निर्मिती व सुधारणा कामे
          जावरा येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत प्रजिमा 34 जावरा ते ईब्राहिमपूर बग्गी रस्ता कामाचे 1 कोटी 22  लक्ष व झाडा निबोंली धामणगाव रेल्वे, सिरजगांव कोरडे येथे तुळजापूर ते सिरजगांव कोरडे या 4 कोटी 28 लक्ष रुपयांच्या निधीतून रस्ता सुधारण्याच्या कामाचे भूमिपूजन, धानोरा मोगल  येथील दिघी ते धानोरा मोगल या 3 किमी रस्त्याचे 2 कोटी 41 लक्ष रुपयांच्या निधीतून निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भुमीपूजन, नारगावंडी  येथे नारगावंडी ते भिल्लीच्या 2 कोटी 45 लक्ष रुपयांच्या निधीतून  रस्ता कामाचे भुमीपूजन, सोनोरा काकडे येथे बोरगाव निस्ताने ते सोनोरा काकडे रस्ता सुधारणा कामाचे 2 कोटी 31 लक्ष रुपयांच्या निधीतून  भुमीपूजन, नायगाव येथे SH 280  ते नायगाव पर्यंत 2 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीतून तयार करण्यात येणाऱ्या रस्ता कामाचे भुमीपूजन श्रीमती ठाकूर यांनी आज केले.


अर्थसंकल्पातून प्राप्त निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

          आमला विश्र्वेश्र्वर नादगाव ख.- चांदुर रेल्वे - आमला - कुऱ्हा - आर्वी येथे 3 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ता सुधारणा कामाचे भुमीपूजन, तिवरा धनोडी सातेफळ घुईखेड रत्स्याच्या रुंदीकरणासह 4 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ता सुधारणा कामाचे भुमीपूजन, सावंगी संगम येथे नांदगाव खं. राजुरा पळसखेड चांदुर रेल्वे रस्ता सुधारणेचे  3 कोटी रुपयांच्या निधीतून रा. मा. 294 कामाचे  भुमीपूजन, मार्डी- कारला- चांदुर रेल्वे रा. मा. 303 रस्त्याचे 4 कोटी रुपयांतून  रुंदीकरणासह मजबुतीकरण कामाचे भुमीपूजन, धानोरा गुरव ते वाढोणा रस्ता सुधारणा कामाचे अर्थसंकल्पातून प्राप्त 2 कोटी रुपयांच्या निधीतून भूमीपूजन, कळमजापूर येथील चांदुररेल्वे सोनगाव बग्गी राजूरा रस्ता सुधारणेचे 3 कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या  कामाचे भुमीपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

          यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह लोणीचे सुरज औतकर, धानोरा गुरवचे आश्विनी शिंदे, पहूरचे अमृता जेठे, धानोरा मोगलचे अमोल लबाहर,सावंगी संगमच्या सरिता राऊत, सोनाराच्या कविता खडसे, जावराचे मिलिंद गुजरकर, कळमजापुरचे हर्षा गुढदे, सोनगावचे भानुदास गावंडे, कारल्याचे दीपाली जाधव, आदी गावातील सरपंच उपस्थित होते.

0000

Tuesday, April 26, 2022

मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करा - रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे

 














मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करा

-          रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे

 

* मातोश्री पाणंद रस्ते तसेच रोजगार हमी योजनेची विभागीय आढावा बैठक

 * प्रत्येक पंचायत समितीला मातोश्री भवन बांधणार

 

अमरावती दि. 26 : शेतमाल बाजारात पोहविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामाला गती देऊन मंजूर पाणंद रस्ते 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश रोजगार हमी योजना तसेच फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी आज येथे दिला.

नियोजन भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजना अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक रोजगार हमी योजना मंत्री श्री. भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, विभागीय आयुक्त पियुष सिंह, नरेगा आयुक्त शांतनु गोयल,  अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, अकोला जिल्हाधिकरी निमा अरोरा, यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे, बुलडाणा जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शेती व शेती पूरक उद्योगांचा विकास करण्यासाठी गूणवत्तापूर्ण पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून रोहयो मंत्री श्री. भूमरे म्हणाले की,  दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब आहे. शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे. पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामासाठी आवश्यक साधनांची ने-आण करण्यासाठी  उपयोगात येतात. यासाठी मातोश्री पाणंद रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजे 15 जूनपर्यंत पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्या. ज्या गावात रोहयोंच्या कामांवर मजूरांचा प्रतिसाद चांगला आहे, तेथे आवश्यक काम हाती घ्या. जेणेकरुन मजूरांना रोजगार मिळेल व रोजगारामुळे मजूरांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे, हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

संपूर्ण राज्यात प्रत्येक पंचायत समितीत रोजगार सेवकाला कामकाजासाठी तसेच आसन व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मातोश्री भवन स्थापन करण्यात येईल. राज्यात एक लाखांवर रस्त्यांची मागणी आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्यावर भर द्या. याशिवाय शाळेची कुंपण भिंत, स्मशानभूमी अशा कामांसाठीही रोहयोच्या मजूरांची मदत घ्या. मातोश्री पाणंद रस्ते हा केवळ शेतकऱ्यांसाठी नसून संपूर्ण गावकऱ्यांना याचा फायदा होतो. यासाठी पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्वक करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अमरावती विभागातील रोहयो विभागाची जिल्हानिहाय स्थिती यावेळी जाणून घेण्यात आली. रोजगार हमी योजनेची सुरुवातच महाराष्ट्रातून झाली आहे. यामुळे रोहयोच्या कामांमध्ये महाराष्ट्र अव्वल व्हावा. रोजगार हमी योजनेंतर्गत मजूराने कामाची मागणी केल्यास त्याला 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करुन द्यावे. मजूरांसाठी पुरेसे जॉबकार्ड तयार होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधितांनी सातत्त्यपूर्ण प्रयत्न करावे. यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी क्षेत्रनिहाय भेटी द्याव्यात. कामाचे अंदाजपत्रक लवकारात लवकर तयार व्हावे, यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर करा. तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता त्वरित मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असे अपर मुख्य सचिव श्री. नंद कुमार यांनी  यावेळी सांगितले.

आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक तसेच तामिळनाडू येथे रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. याच धर्तीवर राज्यातही रोहयोच्या कामामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. या कामांना निधीची कमतरता भासल्यास शासनामार्फत त्वरित निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गावाला रस्ता उपलब्ध झाल्यास गावाचा विकास आपसुकच होतो. मातोश्री पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे गावकऱ्यांनाही फायदा होणार असल्यामुळे ती कामे त्वरित पूर्ण करुन तसा अहवाल सादर करावा. तसेच प्राप्त मनुष्य दिवस निर्मितीचे लक्षांक जिल्ह्यांनी यंत्रणानिहाय व तालुकानिहाय वाटप करुन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश श्री. नंद कुमार यांनी यावेळी दिले.

 

 विभागीय आयुक्त श्री. पियुष सिंह यांनी अमरावती विभागात मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सुत्रसंचालन केले. रोहयो कामामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमरावती विभागाचे सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000

Thursday, April 21, 2022

नवचेतना शालेय विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 








नवचेतना शालेय विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा

-  राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अचलपूर,चांदुर बाजार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 14 शाळांमध्ये राबविणार

 

                अमरावती दि 21: ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा व दर्जेदार शिक्षण देता यावे. विद्यार्थ्यांचे सर्व विषयांवर प्रभुत्व निर्माण होण्यासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नवचेतना शालेय विकास कार्यक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले. टोपे नगर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

     यावेळी जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)अनिल कोल्हे, (प्राथमिक) गंगाधर मोहने, विस्तार अधिकारी(शिक्षण) प्रवीण खांडेकर, चांदुर बाजार पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शुभांगी श्रीराव, अचलपूरचे गट शिक्षणाधिकारी अब्दुल कलीम, अमरावती येथील जिल्हा व शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता पवन मानकर, दीपक चांदूरे, अकोला येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण  संस्थेच्या अधिव्याख्याता कविता चव्हाण, अकोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे आदी उपस्थित होते.

     जिल्ह्यातील अचलपूर जिल्हा परिषदेच्या 7  व चांदुर बाजार येथील 7 अश्या 14 शाळांचा दर्जा व  शैक्षणिक गुणवत्ता नवचेतना शालेय विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढविण्यात येणार आहे. यात दोनीही तालुक्यातील प्रत्येकी 5 मराठी व 2 उर्दू शाळांचा समावेश असणार आहे. अकोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री कडू यांनी दिली.

नवचेतना शालेय  विकास कार्यक्रम राबविण्यासाठी सर्वसमावेशक नियोजन करावे

 

     नवचेतना शालेय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अत्यंत आवश्यक त्या बाबींचा समावेश प्राधान्याने करण्यात यावा.शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा व पालक-विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे सर्वसमावेशक नियोजन करण्यात यावे. कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळेसाठी एकत्र येणाऱ्या गावांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा. असे निर्देश राज्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.

 

जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा विविध विभागाच्या आढावा बैठकीत दिले निर्देश

 










जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा

विविध विभागाच्या आढावा बैठकीत दिले निर्देश

 

     अमरावती दि 21: विभागातील जिल्हा मध्यवर्ती बँकांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पोर्टलवर माहिती सादर केली होती त्या खात्यांपैकी पूर्ण कर्ज माफीची खाती, एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत येणारी खाती व नियमित कर्जदारांची खाती असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी सहायक निबंधक कार्यालयात अर्ज सादर करावा. याबाबत बँकेने अर्जदारांशी संपर्क साधून परत अर्ज करण्याबाबत सूचना कराव्या.असे निर्देश जलसंपदा व  लाभक्षेत्र मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना व कर्ज पुनर्गठन योजनेबाबत आढावा राज्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

     सहकारी संस्थेचे  विभागीय सहनिबंधक राजेश लव्हेकर, अकोला येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक विनायक काहळेकर, सहायक निबंधक (प्रशासन) मधुसूदन लाठी, यवतमाळ व वाशीम जिल्हयाचे उपनिबंधक रमेश कटके, बुलडाणाचे जिल्हा उपनिबंधक घोंगे, बुलडाणा सहकारी बँकेचे अरुण चव्हाण, अकोला मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुधाकर झळके, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल आदी उपस्थित होते.

महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचा आढावा

     या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या संबंधित 13 हजार खात्यांची कर्जमाफीची रकम शासनाकडून अद्याप प्राप्त झाली नाही ती प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री कडू यांनी संबंधितांना दिले.

अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव स्वीकारावे

      चांदुर बाजार व अचलपूर येथील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ऑनलाइन पध्दती सोबतच ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव स्वीकारावे. तसेच ऑनलाइन पध्दतीने प्रस्ताव सादर करताना येणाऱ्या तांत्रिक बाबींची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी असे निर्देश श्री कडू यांनी आढावा बैठकीत दिले.

 

 

      अचलपूर, चांदुर बाजार तालुक्यात ग्रामीण भागात  घरकुलांच्या निर्मितीसाठी शासकीय जमिनीवरील करण्यात आलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.चांदुर बाजार येथे 402 व अचलपूर येथे 82 प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती संबंधितांनी यावेळी दिली.

 

     जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, अचलपूरचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे, चांदुर बाजारचे संजय काळे, तसेच तांत्रिक बाबींची समस्या सोडवण्यासाठी दुरदृश्य प्रणालीद्वारे राज्य व्यवस्थापन कक्षाचे उपसंचालक मधुकर वाघ, सुरज पाटील, मंदार राणे आदी उपस्थित होते.

 

धरणातून गाळ काढून पाणी संचय क्षमता वाढविण्याच्या उपक्रमात युवकांचा सहभाग

 

     धरणातील गाळ काढून धरणाची पाणी संचय क्षमता वाढविणे ही काळाची गरज आहे यासाठी युवकांना या कार्यात सहभागी करून घेता येईल अशा सूचना श्री कडू यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिल्या.प्रत्येक तालुक्यातील एका धरणाची निवड करून येणारा संपूर्ण महिना हा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी आवश्यक तो निधी प्राप्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व ग्रामपंचायत स्तरावर तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.

      यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपायुक्त (पुनर्वसन)गजेंद्र बावणे, वाशीमचे उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, यवतमाळ उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, बुलडाणा उपजिल्हाधिकारी अनिल माचेवड, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अभय पाठक, पाटबंधारे विभागाचे संबंधित व माजी सैनिक उपस्थित होते.

 

               0000

Wednesday, April 20, 2022

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गुुरुवारी आरोग्य मेळावा

 जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गुुरुवारी आरोग्य मेळावा

 

अमरावती दि. 20 : केंद्रिय स्वास्थ व कुटुंब कल्याण, मंत्रालय, भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य विद्यमाने, आजादी का अमृत महोत्सव व आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र यांचा 4 था वर्धापन दिनानिमित्त आणि आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे गुरुवार, दिनांक 21 एप्रिलला आरोग्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

नियोजनानुसार सदर शिबिरामध्ये डिजीटल हेल्थ आयडी काढणे, आयुष्यमान कार्ड वाटप, तपासणी, उपचार, टेलीकम्युनिकेशन, स्त्रीरोग, प्रसुती, स्तनपान, लसिकरण, बालरोग, कुटुंब कल्याण कार्यक्रम समुपदेशन, गर्भनिरोधक साधनांचा वापर बाबत समुपदेशन, मलेरिया, क्षयरोग, कुष्ठरोग, मोतीबिंदू, संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार जसे उच्च रक्तदाब, मधुमेहाचे लवकर निदान, एच.आय.व्ही समुपदेशन, कॅन्सर, हृदयरोग, अस्थमा, दंत, कान, नाक, घसा, प्लास्टीक सर्जरी, त्वचा व त्वचाविज्ञान, आवश्यक रक्त चाचण्या, ई.सी.जी., एक्स-रे, आयुर्वेदिक, युनानी, सिदध, होमेओपॅथी, इतर तपासण्या व औषधांसह मूलभूत आरोग्य सेवा आणि संबंधित आरोग्य तज्ञांशी दूरसंचारव्दारे तपासणी (स्क्रिनिंग) प्रदान करण्यात येईल.

एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी- पिवळे, केसरी अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक कुटुंबे, शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरीक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत जिवित बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब संबंधित संस्था/प्राधिकरण यांचे कडील ओळखपत्रानुसार पात्र.

तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी सामाजिक व आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंदीत ग्रामिण व शहरी भागातील कुटुंबे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड (पात्र लाभार्थ्यांना) काढून देण्यात येणार व सर्व नागरिकांचे आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढून देण्यात येणार आहे. आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांकासह मोबाईल सोबत आणावा.

लाभ घेण्यासाठी वैध शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड व शासनमान्य फोटो- ओळखपत्र इत्यादी सोबत आणावे.)

  आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...