प्रत्येक तालुक्यात दोन आदर्श शाळांचे उद्दिष्ट पूर्ण करावे - मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा
जि. प. प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समितीच्या सभा
प्रत्येक तालुक्यात दोन आदर्श शाळांचे उद्दिष्ट पूर्ण करावे
- मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा
अमरावती, दि. 5 : शासनाकडून निवड करण्यात आलेल्या आदर्श शाळांमध्ये मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. या शाळांव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे जिल्ह्यातील 28 आणखी शाळांची निवड करुन पुढील शैक्षणिक सत्रात त्या आदर्श शाळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज येथे दिले.
प्रशासक श्री. पंडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समिती, शिक्षण विषय समिती व पशुसंवर्धन विषय समितीच्या सभा झाल्या, त्यावेळी ते बोलत होते.
शिक्षण विभागाचा आढावा
प्रशासक श्री. पंडा म्हणाले की, जिल्ह्यातील २८ शाळा आदर्श करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते गट शिक्षणाधिकारी यांनी पूर्णत्वास न्यावे. सकाळ सत्रातील शाळेची वेळ ही सकाळी ७ ते ११.३० विदयार्थ्यांकरीता आणि व ७ ते १२.३० या वेळेत शिक्षकांनी उपस्थित राहून शालेय कामकाजाचे तासिका यांचे योग्य नियोजन करुन शैक्षणिक कामे व अध्यापन कार्य नियमितपणे करण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. शालेय पोषण आहार योजनेच्या स्थितीबाबत आढावा घेऊन त्यांनी पुढील शैक्षणिक सत्रासाठी पाककृतीस मंजुरी मिळण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
खतवापराबाबत जनजागृती करा
खरीप हंगाम 2022 करीता रासायनिक खताचे 1 लक्ष 14 हजार 940 मे. टन आवंटन मंजूर आहे. मागील वर्षी 96 हजार मे. टन खताची विक्री झालेली होती. मंजूर आवंटन पुरेसे आहे. परंतु डीएपी या रा. खताचा पुरवठा यावर्षी आवंटनाप्रमाणे होणार नाही . त्याकरिता एसएसपी , युरिया व संयुक्त खते वापरणेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हयामधे सध्या शिल्लक असलेला 21 हजार मे. टन खत साठा तसेच जीएसएफसी या कंपनीकडून या सप्ताहात प्राप्त 1 हजार मे. टन खत साठा विक्री करावी. खत उपलब्धता व वापराबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांनी दर आठवड्याला माहिती सादर करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
बियाणे उपलब्धतेबाबत चर्चा
जिल्ह्यात विविध पिकांचे 1 लाख 30 हजार 466 क्विं. बियाण्याची आवश्यकता आहे . त्यापैकी प्रामुख्याने सोयाबिन बियाण्याची 1 लाख 13 हजार 750 क्विं. आवश्यकता आहे महाबीजकडुन 65 हजार क्विं.बियाणे पुरवठा करणे शक्य नसून 10 ते 12 हजार क्विंटल सोयाबिन बियाणे पुरवठा होईल असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक यांनी सांगितले.
जिल्ह्यात शेतकऱ्यांनी 2 लाख 81 हजार 399 क्विं. सोयाबिन बियाणे घरचे राखून ठेवलेले आहे. त्यामुळे सोयाबिन बियाण्याची टंचाई निर्माण होणार नाही असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या बियाण्याची उगवणशक्ती पेरणीपर्यंत वेळोवेळी तपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे ,जेणेकरुन खरीपामधे तक्रारी उद्भवणार नाही, असे निर्देश श्री. पंडा यांनी दिले.
कृषी समिती स्थापनेला वेग द्या
जिल्हयामधे 100 टक्के गावामधे 1 आठवडयात ग्राम कृषि विकास समिती स्थापन होतील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांना देण्यात आले. पशुधन विकास अधिकारी यांनी कामकाजाचा अहवाल सादर करण्याबाबत सूचना त्यांनी केली. तसेच नया अकोला पशुधन पर्यवेक्षक या रिक्त पदाबाबत व पंचायत समिती मधील आरएसपी यांना पदस्थापना देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
00000
Comments
Post a Comment