भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम
राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण
अमरावती, दि. ८ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण आमदार सुलभाताई खोडके व विविध मान्यवरांच्या हस्ते आज सामाजिक न्यायभवनात करण्यात आले. गुणवत्ताप्राप्त ३० विद्यार्थ्यांना यावेळी पाच हजार रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वितरण कार्यक्रमाला आमदार सुलभाताई खोडके यांच्यासह प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनिल वारे, सहायक आयुक्तमाया केदार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनिय यश संपादन केलेल्या आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यामधुन प्रथम आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्काराचे धनादेश वितरण व प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, त्यांना प्रतिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग, समर्पण या बाबींचा अंगीकार करावा. निर्धाराने आयुष्याची प्रगतीकडे वाटचाल करुन समाजाच्या उभारणीसही हातभार लावावा, असे आवाहन आमदार सुलभाताई खोडके यांनी केले. श्रीमती खोडके यांनी सर्व पुरस्कारप्राप्त गुणवंतांचे अभिनंदन व कौतुक केले. यशाचे सातत्य कायम ठेवुन ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळेल त्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठावीत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील निवड झालेल्या 35 विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रतिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्रीमती केदार यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. राजेश गरुड यांनी आभार मानले.
सप्ताहात उद्या 9 एप्रिलला वृध्दाश्रमात ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व नागरिक मेळावा आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह निवासी शाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय स्तरावरील 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा येथे सकाळी 8 वाजता कार्यक्रम होणार आहे.
०००
No comments:
Post a Comment