Tuesday, January 31, 2023

अंतरिम आकडेवारीनुसार पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान

 


















अंतरिम आकडेवारीनुसार

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान

 

     अमरावती, दि. 30 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान झाले. याबाबत मतदान पथकांच्या नोंदी व दस्तऐवज यांच्या संपूर्ण तपासणीअंती अंतिम आकडेवारी जाहीर होईल. या आकडेवारीत काहीसा बदल संभवतो.

या निवडणूकीत एकूण 23 उमेदवार निवडणूक लढत आहेत. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाला आज सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये 262 मतदान केंद्रावर सरासरी 5.49 टक्के मतदान झाले.

सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्रावर 4.25 टक्के, अकोला जिल्ह्यात 61 मतदान केंद्रावर 5.53 टक्के, बुलडाणा जिल्ह्यात 52 मतदान केंद्रावर 6.38 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 48 मतदान केंद्रावर 5.78 टक्के, वाशिम जिल्ह्यात 26 मतदान केंद्रावर 7.42 टक्के मतदान झाले.

दुपारी 12 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 13.69 टक्के, अकोला जिल्ह्यात 14.65 टक्के, बुलडाणा  जिल्ह्यात 17.89 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 18.07 टक्के तर वाशीम 19.39 टक्के मतदान झाले आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये 262 मतदान केंद्रावर सरासरी 15.94 टक्के मतदान झाले.

दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 26.15 टक्के, अकोला जिल्ह्यात 28.45 टक्के, बुलडाणा  जिल्ह्यात 33.47 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 35.60 टक्के तर वाशीम जिल्ह्यात 34.37 टक्के मतदान झाले आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये 262 मतदान केंद्रावर सरासरी 30.40 टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

 

दुपारी 4 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 43.37, अकोला जिल्ह्यात 46.91, बुलडाणा जिल्ह्यात 53.04, वाशिम जिल्ह्यात 54.80, यवतमाळ जिल्ह्यात 58.87 असे एकूण 49.67 टक्के अंदाजे मतदान झाले. 

 

00000

 

 

 

 

मेळघाटात पहिले पक्षी सर्वेक्षण; २१० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद मेळघाटात पक्ष्यांच्या दहा नवीन प्रजातींची भर

 




मेळघाटात पहिले पक्षी सर्वेक्षण; २१० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद

मेळघाटात पक्ष्यांच्या दहा नवीन प्रजातींची भर

 

अमरावती दि. ३० : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे दि. २६ ते २९ जानेवारीदरम्यान करण्यात आलेल्या पहिल्या पक्षी सर्वेक्षणात पक्ष्यांच्या २१० प्रजातींची नोंद घेण्यात आली.  त्यात मेळघाटात आढळणा-या पक्ष्यांच्या यादीत नव्याने १० प्रजातींची भर पडली.

महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, प. बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व जम्मू आणि काश्मीर आदी १० राज्यांतील एकूण ६० पक्षी अभ्यासक सर्वेक्षण मोहिमेत सहभागी झाले होते.

अकोट वन्यजीव विभागातील शहानूर येथे सर्वेक्षणाचा शुभारंभ झाला. तिथून सर्व सहभागींपैकी प्रत्येकी दोन निरीक्षक याप्रमाणे ३० पथके मेळघाटातील चार विभागांत विविध ठिकाणी रवाना झाली. सर्वेक्षणाच्या पहिल्या व दुस-या दिवशी प्रत्यक्षात पक्षी अभ्यास व नोंदणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व माहितीची ई-बर्ड या संकेतस्थळावर तसेच प्रपत्रांमधे लिखित स्वरुपात नोंद करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वी नोंद झालेल्या २९४ पक्षी प्रजातीपैकी सुमारे २१३ प्रजातींचे पक्षी नोंदविण्यात आले आहेत. या अभ्यासातून या पक्ष्यांची संख्या व काही पक्षी प्रजातींची सद्य:स्थिती (Status) कळण्यास मदत होणार आहे. सर्वेक्षणात मेळघाटच्या यादीत यापूर्वी समाविष्ट नसलेले सुमारे १० प्रजातींचे पक्षी प्रथमत:च नोंदविण्यात आले. या नवीन नोंदीमुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी तीनशेवर पोहोचली आहे.

मेळघाटात प्रथमच नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमधे हिमालयन रुबीथ्रोट, गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार, सोनेरी डोक्याचा वटवट्या, रेषाळ गळ्याचा सुतार, मोठा राखी खाटिक व काळ्या पंखाचा कोकिळ खाटिक हे काही दुर्मिळ पक्षी, तसेच शेंडी बदक व तरंग बदक या सारखे स्थलांतरित पाणपक्षी नोंदविण्यात आले आहेत.

 

मेळघाटचे वैभव असलेला रानपिंगळा अनेक पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षण ठरला. हा पक्षी सर्वेक्षणात अनेक ठिकाणी आढळून आला. तो अनेकांना प्रथमच बघायला मिळाला. मेळघाटात प्रथमच आढळून आलेले पक्षी हे मेळघाटातील पुनर्वसन झालेल्या गावठाण क्षेत्रातील विकसित झालेल्या गवताळ अधिवासात आढळून आले आहेत. मेळघाटमधून २० वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या कुंड या ठिकाणी पक्षी अभ्यासक श्री. मिलिंद सावदेकर व सामिष डोंगळे यांना गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार हे तीन पक्षी आढळून आले. हिमालयन रूबीथ्रोट या सुंदर पक्ष्याची नोंद ले. क. रोहित शर्मा यांनी वान अभयारण्यातील बारुखेडा या ठिकाणी घेतली.

पक्ष्यांसाठी संपन्न अधिवास

रेषाळ गळ्याचा सुतार, मोठा राखी खाटिक या दोन पक्ष्यांची नोंद केळपाणी या पुनर्वसित गावाच्या परिसरात डॉ. पवन राठोड व आमोद गवारीकर यांनी घेतली. काळ्या पंखाचा कोकिळ खाटिक (Black-winged Cuckoo Shrike) या पक्ष्याची नोंद चैतन्य दुधाळकर यांनी घेतली. या भागातील बारुखेडा, तलई, केळपाणी, सोमठाणा, धारगड, गुल्लरघाट आदी गावांचे मागील १० वर्षापूर्वी पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी संपन्न असे अधिवास निर्माण झाले आहेत. या ठिकाणी रानपिंगळा, स्थलांतरित आखूड कानाचे घुबड, निळ्या डोक्याचा कस्तुर असे अनेक दुर्मिळ पक्षी आढळून आले. या सर्व नोंदीवरून मेळघाटातील पक्षी विश्व संपन्न असल्याचा निष्कर्ष आहे. सर्व सहभागींकडून प्राप्त माहिती व छायाचित्रांवरून प्रकल्पाद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास होत आहे.

प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात आणि मेळवाटच्या गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्या भारती व अकोट वन्यजीव विभागाच्या सहा. वनसंरक्षक आर्या यांच्या सहकार्याने मोहिम पार पडली. या आयोजनासाठी गठित समितीतील विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार, वन परिक्षेत्र अधिकारी योगेश तापस, तसेच मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, प्रा. डॉ. सावन देशमुख तसेच विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी प्रा. डॉ. निशिकांत काळे, डॉ. गजानन वाघ, अमोल सावंत, मिलिंद सावदेकर, किरण मोरे, स्वप्नील बांगडे, अतुल तिखे. तसेच ई- बर्डचे तेजस पारशिवणीकर व शहानूर येथील अधिकारी हर्षली रिठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

00000

Friday, January 27, 2023

निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

 












अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023

निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

मास्टर ट्रेनरकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण

       अमरावती, दि. २७ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन नियोजनबध्दरित्या अचूकपणे कामे पार पाडावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपटट्टे यांनी आज येथे दिले.

         पदवीधर मतदार संघाच्या 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने नियोजनभवन येथे मतमोजणीचे सादरीकरणाच्या माध्यमातून दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अमरावतीचे प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावन कुमार, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, विजय भाकरे, अजय लहाने, अपर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, रविंद्र महाले यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने व श्यामकांत मस्के यांनी यावेळी उपस्थितांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले.

 

        या प्रक्रियेसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, सुमारे 340 अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा महत्वाचा टप्पा असून सर्व प्रक्रिया नियोजनबध्दरीत्या पार पाडण्यासाठी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वांनी जबाबदारी ओळखून कामे करावीत, असे निर्देश श्री. पांढरपट्टे यांनी दिले.

मतमोजणीची प्रक्रिया

बडनेरा येथील नेमाणी गोडावूनमध्ये मतमोजणी दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता मतमोजणी केंद्रावर हजर राहावे. सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमोर मतपेट्या स्ट्राँग रुममधून आणून उघडण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण अठ्ठावीस टेबल राहणार असून त्यावर 28 चमू मतमोजणीचे काम पार पाडणार आहे.

                                     संशयित मत पत्रिकांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

संशयित बॅलेट पेपरसंदर्भात तत्काळ कार्यवाही होण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लवकर निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करतील. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी कुठलीही चूक होऊ नये म्हणून सर्वांनी जाणीवपूर्वक व खबरदारीपूर्वक काम करावे. मतमोजणीसंदर्भात कुठलाही चुकीचा संदेश प्रसारित होऊ नये म्हणून काळजीपूर्वक काम करावे, असेही निर्देश श्री. पांढरपट्टे यांनी दिले.

             या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ‘मतदारांनी मत कसे नोंदवावे याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा अवलंब करुन मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. याबाबत सातत्याने जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये

           मतमोजणी पूर्व तपासणी, मतमोजणीसाठी अनुषंगीक माहिती नमूद करण्याचे विवरणपत्रे, टपाली मतपत्रिकांची मोजणी, मतपत्रिका वैध व अवैध ठरविणे, अवैध मतपत्रिकांची वर्गवारी, टेबलवरील मतपत्रिका मोजणी आदीबाबत  मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गणना पर्यवेक्षक व गणना सहायक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले. मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने, श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर यांनी मतमोजणी करताना विविध टप्प्यावर घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणीच्या प्रक्रियेत डोळ्यात तेल घालून काम करणे आवश्यक असते. कुठेही दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये. अन्यथा लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर सकाळी सहा वाजताच उपस्थित राहावे व सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. आधीच सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे श्री. बावने यांनी सांगितले.

 

00000

 

 

 

 

 

 

Thursday, January 26, 2023

आदिवासींव्दारे निर्मित उत्पादनांच्या विक्री केंद्र ‘आदिहाट’ चे थाटात उद्घाटन हस्तकला, बांबुकला, चित्रकला व खाद्यपर्दांचे विविध विक्री स्टॉल्स

 



आदिवासींव्दारे निर्मित उत्पादनांच्या विक्री केंद्र ‘आदिहाट’ चे थाटात उद्घाटन

हस्तकला, बांबुकला, चित्रकला व खाद्यपर्दांचे विविध विक्री स्टॉल्स



      अमरावती, दि. २६ : आदिवासी समाज हा राज्याच्या विविध डोंगराळ व दुर्गम भागामध्ये वास्तव्य करतो. त्यांची स्वतंत्र अशी संस्कृती असून ती संपन्न आणि समृध्द आहे. तसेच त्यांची जीवनशैली सुध्दा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे तीचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. 

आदिवासी समाजातील व्यक्तींच्या उपजत कौशल्याला प्रामुख्याने हस्तकला, बांबुकला, चित्रकला इत्यादी तसेच  आदिवासी भागात उत्पादीत रानमेवा, वनौषधी, कृषी उत्पादने, विशिष्ट खाद्यपदार्थ आदींच्या विक्रीसाठी कायमस्वरुपी हक्काचे ठिकाणी मिळावे, यासाठी ‘आदिहाट’ ही संकल्पना आदिवासी विकास मत्र्यांच्या संकल्पनेतून विभागात राबविली जात आहे. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर येथील अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘आदिहाट’ या विक्री केंद्राचे आज अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


           यावेळी जात पडताळणी समितीच्या सह-आयुक्त प्रिती बोंद्रे, अमरावती, उपायुक्त (आदिवासी विकास) जागृती कुमरे, पोलीस निरिक्षक श्री. पाटील, सेवानिवृत्त उपायुक्त श्री. राघोर्ते, सहाय्यक आयुक्त (लेखा) प्रविण इंगळे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) शिवानंद पेढेकर, सहाय्यक आयुक्त (शिक्षण) संजय ससाने, वरिष्ठ संशोधन अधिकारी प्रिती तेलखडे यांच्यासह अपर आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच आदिवासी बांधव व विद्यार्थी आदी उपस्थित होते. 


        या ‘आदिहाट’मध्ये वरुड येथील आदिवासी कारागिर मिथुन आहाके यांनी बनविलेल्या अत्यंत आकर्षक लाकडी शोभेच्या वस्तु तसेच मेळघाटातील दुणी गावाच्या बचतगटांमार्फत नैसर्गिक व सेंद्रिय पध्दतीने पिकविलेले कृषी उत्पादने, हस्तकलेच्या वस्तु, आदिवासी संस्कृतीशी संबंधित विविध शिल्प, कलाकुसरीच्या वस्तु, दाग-दागीने व महादेव खोरी येथील बचतगटांनी बनविलेल्या विविध खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉल लावण्यात आले होते. 

या ‘आदिहाट’ विक्री केंद्रावर आदिवासी कलाकार, बचत गटांनी वस्तू विक्रीकरिता आणाव्यात तसेच या स्टॉलवर विक्रीकरिता उपलब्ध असलेल्या वस्तू नागरिकांनी खरेदी करुन आदिवासी विक्रेत्यांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन अपर आयुक्त श्री. वानखडे यांनी याप्रसंगी केले.  


        0000

Wednesday, January 25, 2023

‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत सुरक्षा पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद

 






‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत

सुरक्षा पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद

 

अमरावतीदि.26: ‍‍प्रजासत्ताक दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये विविध सुरक्षा पथकांनी केलेले शिस्तबध्द कवायत व पथसंचलनाला अमरावतीकरांनी मोठी दाद दिली. यावेळी ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी आसमंत निनादून गेले होते.

मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विविध सुरक्षादलांच्या व  विभागांच्या चमूमार्फत शिस्तबध्द पथसंचलन करण्यात आले. त्यात  एकूण 17 पथकांनी भाग घेतला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेडियममधील प्रेक्षागृह गर्दीने फुलून गेले होते.   

राज्य राखीव पोलीस बल गट, अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस पथक, ग्रामीण पोलीस पथक, महिलाविषयक गुन्हे व तक्रार निवारणासाठी दक्ष असलेले पथक, गृहरक्षक पुरुष तसेच महिला दल, शहर वाहतुक पथक, पोलीस बॅन्ड पथकाने दिमाखदार पथसंचलन करुन सर्वांची मने जिंकली.

स्कुल ऑफ स्कॉलर्स राजमाता जिजाबाई गाईड पथक तसेच स्वामी विवेकानंद स्काऊट पथक, केम्ब्रिज इंग्लिश स्कुल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कुल, दिपा इंग्लिश प्रायमरी स्कुल, अस्मिता विद्यालय यांचे स्काऊट गाईड यांनी आकर्षक पथसंचलन करुन मोठी दाद मिळविली. पथसंचलनामध्ये पोलिस विभागाचे श्वानपथक आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. यावेळी श्वानाने सलामी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.  महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला शक्तीचा जागर करणारा देखावा लक्षवेधी ठरला.

जलद प्रतिसाद पथक, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, मनपा अग्निशामक वाहन तसेच बुलेट दुचाकी, दंगा नियंत्रण पथक ‘वज्र वाहन’, ‘वरुण वाहन’,  मनपा आरोग्य विभागाचे वाहन, परिवहन महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणारी एसटी बस, जिल्हा आरोग्य रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे पथक संचालनात सहभागी होते.

000000


भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 






























भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया

- विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

          अमरावती, दि. 26 : जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो. ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांच्या सौहार्द, सहिष्णूता व बंधुभावाचे ते गमक आहे. नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळून ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्तांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राकेश कलासागर आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीतानंतर विभागीय आयुक्तांनी मैदानावर उघड्या जीपमधून फेरी मारून पोलीस, विविध सुरक्षा दलांच्या व विभागांच्या पथकांचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते विविध गुणवंत अधिकारी व कर्मचा-यांना गौरविण्यात आले. 

विभागीय आयुक्तांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की,  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात लोकांचे राज्य स्थापण्याच्या हेतूने लोकशाही प्रस्थापित करण्याचा विचार पुढे आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने राज्यघटना निर्माण केली. ती 26 जानेवारी 1950 रोजी देशभर लागू करण्यात आली. आज सात दशकांहून अधिक काळ लोकशाही या देशात दृढपणे टिकून आहे, वृद्धिंगत व अधिक मजबूत होत आहे. ही खरी संविधानाची ताकद आहे. 

ते पुढे म्हणाले की, लोकशाही हा केवळ शासनसंस्थेचा प्रकार नाही तर ती एकत्रित असण्याची जीवनपद्धती आहे. समाज बदलण्याचे सामर्थ्य लोकशाहीच्या संकल्पनेत आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक हक्क संविधानाने बहाल केले आहेत. गत सात दशकांमध्ये राज्यघटनेद्वारे न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मूल्ये येथे रुजली. लोकशाही प्रस्थापित झाली.  लोकशाहीचे सक्षमीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. लोकसहभाग हा यातील महत्वाचा घटक आहे. हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही बळकट करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

 

राष्ट्रीय मतदारदिनाचा उल्लेख करून ते म्हणाले की, आपला मताधिकार बजावण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार म्हणून नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘गाव हा विश्वाचा नकाशा’ या रचनेतील ओळीही त्यांनी यावेळी उद्धृत केल्या.  

शासन व्यवहारात लोकसहभाग आवश्यक असतो. त्यामुळे एक मतदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तव्य कसोशीने पार पाडण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, विविध अधिकारी व कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...