छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आता व्यक्ती घटक मानणार - राज्यमंत्री गुलाबराव पाटील
नागपूर, दि. 20 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता कुटुंब घटक न मानता व्यक्ती घटक मानण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
सदस्य प्रकाश आबिटकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, कर्जमाफी योजनेंतर्गत 58 लाख खातेदार असून आतापर्यंत 15 हजार 882 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेंतर्गत कुटुंब या घटकाऐवजी व्यक्ती हा घटक मानण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्नाबाबत उत्तर देताना राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, या जिल्ह्यातील 2 लाख 76 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 1 लाख 88 हजार खातेदारांना 377 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित 82 हजार शेतकऱ्यांच्या ऑनलाईन माहितीत त्रुटी असल्याने रक्कम जमा झालेली नाही. या त्रुटींची पुर्तता करुन त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, दिपक चव्हाण, किशोर पाटील, चंद्रदीप नरके, शंभूराजे देसाई, समीर कुणावार यांनी भाग घेतला.
Comments
Post a Comment