राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहाला आजपासून सुरुवात
राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहाला आजपासून सुरुवात
अमरावती, दि.
14 :
अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे व ऊर्जा संवर्धन करणे या बाबींना प्राधान्य
देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणमार्फत (महाऊर्जा ) राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन
सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सप्ताह 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
पारंपारिक ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत सिमित
असल्याने सद्यस्थितीत ऊर्जा बचतीशिवाय पर्याय नाही. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर
वाढवून ऊर्जा संवर्धन करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह राबविण्यात
येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच
भविष्यातील ऊर्जा संकटाबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे व अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या
वापराविषयी प्रबोधन करण्यासाठी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकडून ऊर्जा बचत संबंधीचे
संदेश जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल
तायडे यांनी केले आहे.
जगभरातील हरितवायू उत्सर्जन करणाऱ्या
देशांपैकी भारत प्रमुख देश म्हणून गणला जातो. भारताने पॅरिस वैश्विक हवामान बदल करारनाम्यानुसार
आपल्या सक्रिय सहभागास अनुमती दर्शविली. या अनुषंगाने भारत 17 शाश्वत विकास ध्येय अत्यंत
वेगाने व नविनतम पध्दतीने साध्य होण्यासाठी ध्येय धोरणे राबवित आहेत. जास्तीत-जास्त
नागरिकांपर्यंत ऊर्जा बचतीचे महत्त्व पोहचविणे हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहाचा
उद्देश आहे.
*****
Comments
Post a Comment