Monday, February 28, 2022

विभागीय आयुक्तांच्या हस्ते ‘इर्विन आरोग्य ज्योत’चे प्रकाशन

 

 










विभागीय आयुक्तांच्या हस्ते
इर्विन आरोग्य ज्योतचे प्रकाशन

उत्तम आरोग्य सेवेत महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर

-          विभागीय आयुक्त पियुष सिंह

अमरावती, दि. 28 : ‘हेल्थ इंडिकेटरनुसार उत्तम आरोग्य सेवेत महाराष्ट्र राज्य देशात सातत्याने आघाडीवर राहिले आहे. शासकीय आरोग्य सेवेचे त्यात मोठे योगदान आहे. राज्याच्या आरोग्य सेवेने उपचार सुविधांबरोबरच आरोग्य शिक्षणाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे प्रकाशित इर्विन आरोग्य ज्योतया पुस्तकाचे प्रकाशन विभागीय आयुक्तांच्या हस्ते बचतभवनात झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. प्रमोद निरवणे यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यावेळी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांच्या निवृत्तीनिमित्त त्यांचा गौरवही मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाला.

विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, जिल्हा आरोग्य रुग्णालयातर्फे आरोग्य योजना-उपक्रमांची माहिती पुस्तकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अशा उपक्रमात कॉफीटेबल बुक आदींद्वारेही भर घालता येईल. कोविड साथीसारख्या कठीण काळात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी मोलाची सेवा बजावली, असे सांगून श्री. सिंह यांनी डॉ. निकम यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, आरोग्य सेवांची माहिती अत्यंत सुबोध भाषेत या पुस्तकाद्वारे मांडण्यात आली आहे. इर्विनच्या टीमने मेहनत घेऊन महत्वाचे पुस्तक निर्माण केले. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

डॉ. निकम म्हणाले की, पुस्तकातील माहिती शास्त्रीयदृष्ट्या अचूक व परिपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची वाचनीयता वाढविण्यासाठी डॉक्टरांचे विविध अनुभव, कविता आदी साहित्याचाही समावेश केला आहे.

पुस्तकासाठी योगदान देणा-या डॉ. व्ही. के. कुर्तकोटी, यश बुधवाणी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, ॲड. प्रतिमा भाकरे, उज्ज्वला मोहोड, डॉ. ज्योत्स्ना किटकुले, अमर बोडखे आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. श्री. साखरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. बोडखे यांनी आभार मानले.

000

 

पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरीत करावी - पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर










पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची

 अंमलबजावणी त्वरीत करावी

-         पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर

Ø  पाणी टंचाई आढावा बैठकीत दिले निर्देश    

अमरावती दि.28: येत्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता झपाट्याने वाढेल अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नये यासाठी प्रशासनाने पाणी टंचाई  निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची त्वरीत अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. मोर्शी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात मोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 33 गावांच्या पाणी टंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता ढोमणे, अनिल उनराखे, मोर्शी पंचायत समिती सभापती विना बोबडे, उपसभापती सोनाली नवले, सदस्य रुपाली पुड, जया कळसकर, माया वानखेडे, सुनिल कडु, भाऊ छापाने, शंकर उईके, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी रविंद्र पवार, आदी उपस्थित होते.

एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता असलेल्या

गावात उपाय योजना सुरु कराव्या

लेहगाव, वाघोली, सावरखेड, शिरखेड, आखतवाडा, बेलापुर, अडगाव, पातुर, शिरुर, शिरलस, राजुरवाडी, निपाणी, तळेगाव, कवठा, भांबोरा, तुळजापुर, मंगरूळ, बोरगव्हाण व धामणगाव याठिकाणी पाण्याची समस्या नसल्याबाबतची माहिती संबंधित गावाच्या सरपंचांनी दिली. परंतु तीव्र उन्ह्याळयात संभाव्य पाणी टंचाईची समस्या नाकारता येत नाही. या गावांमध्ये त्यावर उपाययोजना करण्यात याव्या. लेहगाव येथे हातपंपाची दुरुस्ती, सावरखेड व शिरखेड येथे नवीन टाकीसाठी प्रस्ताव, अडगाव व तळेगाव येथे पाईपलाईनचे काम, शिरलस येथे येत्या एप्रिल-मे महिन्यात विहिरी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया, धामणगाव येथे हातपंपसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावे असे निर्देश श्रीमती ठाकुर यांनी संबंधीतांना दिले. गोराळा, विष्णोरा, शिरलस, कमळापुर येथे येत्या काळात विहिरी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया पुर्ण करावी.

टंचाईग्रस्त गावात तातडीने सुविधा निर्माण कराव्या

मोर्शी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाईबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावे. गोराळा, काटपुर, पुसदा, घोडगव्हाण, काटसुर, नया वाठोडा, लिहीदा, रोहनखेड, विचोरी, शिरजगाव, अडगाव, नेरपिंगळाई येथे तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नळ दुरुस्ती, गावातील विहिरींची दुरुस्ती, गाळ काढणे, यासारख्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. असे निर्देश श्रीमती ठाकुर यांनी दिले. शिरजगाव  येथील  अंतर्गत पाईप जोडणीचे काम, रोहणखेड येथे बोअर करण्यात यावे. नेरपिंगळाई, पुसदा येथिल टंचाई बाबतचे प्रस्ताव प्राधान्याने पुर्ण करण्याच्या सुचना श्रीमती ठाकुर यांनी केल्या.

 

जलजीवन मिशन अंतर्गत जास्तीत जास्त कामे पूर्ण करावी

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी टंचाई वर जास्तीत जास्त उपाययोजना करता येणे शक्य आहे. सर्व ग्रामपंचायतींनी टंचाईबाबतच्या प्रस्तावित कामाबाबत ठराव तात्काळ मंजूर करून प्रशासनास सादर करावा. आवश्यकता असेल त्या गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवण्याच्या नवीन टाकीची निर्मिती, जुन्या पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात यावे. अशा सूचना श्रीमती ठाकूर यांनी  संबंधिताना दिल्या.

0000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 









मोझरी, वलगाव, कौंडण्यपूर, शेंडगाव विकास आराखड्यातील कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

 







मोझरी, वलगाव, कौंडण्यपूर, शेंडगाव विकास आराखड्यातील कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

आराखड्याद्वारे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांना चालना

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : जिल्ह्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र मोझरी, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव, श्री क्षेत्र कौंडण्यपूर व  शेंडगाव येथे विकास आराखड्याद्वारे मोठा निधी उपलब्ध करून देऊन अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांना चालना देण्यात आली. आराखड्यातील उर्वरित कामे व नव्याने राबवावयाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

विविध विकास आराखड्यांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.   

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आराखड्यातील प्रत्येक काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. दर्जेदार सुविधांची निर्मिती याद्वारे होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती देणारा चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे. या चित्रपटासह त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणा-या सचित्र माहितीचे प्रदर्शनही तिथे उपलब्ध करून द्यावे. त्यासाठीचा प्रकल्प आराखडा तयार करावा.  शिराळा येथील काम पूर्ण करण्यासाठी पर्यटन किंवा खनिज निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. महिलाभगिनींना रोजगार मिळवून देणारे प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे. 

 

संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यात अनेक चांगली कामे उभी राहिली. त्या ठिकाणी संत गाडगेबाबा यांचा पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. वलगाव एसटी स्थानक विकासाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. रेवसा, साऊर, कामुंजा येथे विकासकामांबाबत आराखडा सादर करावा. कौंडण्यपूर येथे उद्यान विकासाला चालना द्यावी. शेंडगाव विकास आराखडा, तसेच इतर सर्व विकास आराखड्यातील उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

 

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी विकास आराखडा एकूण 150 कोटी 83 लक्ष रूपयांचा आहे. आराखड्याद्वारे मोझरी, गुरुदेवनगर, वरखेड, शिराळा, यावली आदी गावांत स्मृती मंदिर, ग्राम सचिवालय, सर्वधर्म प्रार्थनास्थळ, शहिद स्मारक, प्रार्थना मंदिर, ग्राम सचिवालय, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, उद्यान विकास, पूर संरक्षक भिंत, काँक्रिट रस्ते, चौक सौंदर्यीकरण, व्हीआयपी गेस्टहाऊस आदी अनेक कामांना चालना देण्यात आली आहे व अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यातून 37. 86 कोटी निधीतून विविध कामे राबविण्यात येत आहेत.

 

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचाही आढावा यावेळी घेण्यात आला. 35 कोटी 44 लक्ष रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. इमारतीचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

 

 

000000

 

‘पीडीएमसी’ रूग्णालयात हिमोडायलिसिस युनिटचे पालकमंत्र्यांचा हस्ते उद्घाटन

 






पीडीएमसीरूग्णालयात हिमोडायलिसिस युनिटचे पालकमंत्र्यांचा हस्ते उद्घाटन

गोरगरीब, गरजू रूग्णांसाठी महत्वपूर्ण सुविधा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत हिमोडायलिसिस युनिट कार्यान्वित झाले आहे. गोरगरीब व गरजू रूग्णांना हे युनिट उपयुक्त ठरेल. जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

 

           डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत हिमोडायलिसिस युनिटचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, दिलीप इंगोले, युनिटप्रमुख डॉ. सुनय जी. व्यास, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. स्वप्नील मोलके, डॉ. निखिल बडनेरकर, डॉ. सौरभ लांडे, डॉ. शुभांगी वर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

 

किडनीची कार्यक्षमता अगदी कमी होणे किंवा निकामी झाल्यावर डायलिसिसची गरज भासते. रक्त शुद्धीकरणासाठी ही प्रक्रिया नियमित करावी लागते. पीडीएमसी रूग्णालयात हिमोडायलिसिस युनिटद्वारे महिन्याला अडीचशे ते तीनशे व्यक्तींवर हे उपचार केले जातात. गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ही सुविधा उपयुक्त आहे. शासनाकडून गरीब व गरजू रुग्णांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून द्यावा. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेबरोबरच अल्प उत्पन्न गटासाठीच्या योजना- उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

यापूर्वी हे युनिट पाच खाटांचे होते. आता 10 खाटा उपलब्ध करून दिल्या असून, हेपॅटायटिस बी व हेपॅटायटिस सी या रुग्णांसाठी प्रत्येक एक खाट राखीव ठेवण्यात आली आहे, अशी माहिती युनिटप्रमुख डॉ. व्यास यांनी दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

000   

 

जि. प. अध्यक्ष निवासस्थान इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 






जि. प. अध्यक्ष निवासस्थान इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 

अमरावती, दि. 28 : येथे जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान इमारतीचे भूमीपूजन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले. हे काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

यावेळी आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जि. प. सभापती सुरेश निमकर, बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, गिरीश कराळे, जयंतराव देशमुख, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, कार्यकारी अभियंता विजय वाठ आदी उपस्थित होते.

 

या कामासाठी 2 कोटी 53 लक्ष रुपये प्रशासकीय मान्यता आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी चोवीस महिन्यांचा आहे. सुमारे 1 हजार 820 चौ. मी. क्षेत्रफळाचा प्लॉट आहे. तळमजला 549 चौ. मी., तर 424 चौ. मी. पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ असेल.

000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...