Monday, February 14, 2022

भक्कम पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळेल - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 





ग्रामसडक योजनेत विकासकामांचा शुभारंभ

भक्कम पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळेल

-         जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. 14  : रस्ते हे विकासाचे वाहक असतात. हे लक्षात घेऊन रस्ते व विविध पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागातही अनेक कामांना चालना देण्यात आली आहे. भक्कम पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज केले.  

          प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांत विविध विकासकामांना चालना देण्यात आली आहे. त्याअंतर्गत कु-हा येथे भालेवाडी ते करजगाव ते कल्होडी ते कु-हा या रस्त्यासाठी 3 कोटी 55 लाख रूपये निधीतून रस्ता विकासकामाचे भूमिपूजन राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. रस्त्यांच्या अनेक कामांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी चांगली सुविधा निर्माण होईल. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत व प्रत्येक कामाची गुणवत्ता राखली जावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

परिसरातील आवश्यक कामांबाबत प्रस्ताव द्यावेत. शासन स्तरावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. ग्रामीण भागात रस्ते निर्मिती, रस्ते सुधारणा, सभागृहे, इमारती आदी निर्मिती, परिसराचे सौंदर्यीकरण आदी पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक निधी मिळवून दिला जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

कृउबासचे माजी सभापती मंगेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक यावेळी उपस्थित होते.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...