मतदार जनजागृती तिरंगा महारॅलीला दाखवली हिरवी झेंडी; लोकशाही समृद्धीसाठी मतदारांनी स्वयंप्रेरणेने मतदानाचा हक्क बजावावा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 




























मतदार जनजागृती तिरंगा महारॅलीला दाखवली हिरवी झेंडी;

लोकशाही समृद्धीसाठी मतदारांनी स्वयंप्रेरणेने मतदानाचा हक्क बजावावा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

            अमरावती, दि. 19 (जिमाका) : भारत सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असून लोकशाहीने आपल्या देशाला एकसंघ ठेवले आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे असून मत आपला अधिकार आहे. तशीच आपली जबाबदारी देखील आहे, म्हणून प्रत्येकाने लोकशाही समृद्धीसाठी स्वयंप्रेरणेने 100 टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज मतदार जनजागृती तिरंगा महारॅली प्रसंगी केले. 

 

            लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने विविध उपक्रम स्वीप उपक्रमांतर्गत राबविले जात आहेत. त्याअनुषंगाने आज सायंकाळी नेहरु मैदान, अमरावती येथून मोठ्या संख्येने शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, शाळा महाविद्यालयीन व्यवस्थापन, विद्यापीठ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभागातील कर्मचारी, 75 स्वयंसेवी संस्था, युवा मतदारांनी मतदान जनजागृती तिरंगा महारॅलीमध्ये सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क बजावावा, हा संदेश दिला. यावेळी मी मतदान करणार, मतदान माझे हक्क अशा विविध बॅनर, फलक व मतदार जनजागृतीपर घोषणेने मैदान व रॅली मार्ग दुमदुमले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. त्यानंतर राष्ट्रगीत व ‘मी मतदान करणार’ अशी शपथ घेऊन मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा महारॅली मार्गस्थ केली.

 

         तिरंगा महारॅलीची सुरुवात नेहरु मैदान येथून सुरु होऊन राजकमल चौक- श्याम चौक- मालवीय चौक येथून मार्गक्रमनकरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन करुन महारॅलीचे समारोप झाला. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी  पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मनपा आयुक्त देवीदास पवार, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके तसेच वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी व नागरिक महारॅलीत सहभागी होऊन मतदार जनजागृती केली.

           

            लोकशाही समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता लोकशाहीच्या महोत्सवात सहभाग नोंदवून निर्भीडपणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 100 टक्के करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती