Tuesday, October 31, 2023

नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीपणे राबवा - मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा


 

नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीपणे राबवा

- मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा

अमरावती, दि. 31 (जिमाका) : नव भारत साक्षरता कार्यक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज केले. नव भारत साक्षरता कार्यक्रम 2022-2027 अंतर्गत गठित नियामक परिषद समिती व कार्यकारी समितीची दुसरी बैठक आज श्री. अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षामध्ये आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

            नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी (योजना) सय्यद राजीक सय्यद गफ्फार यांनी प्रारंभी माहिती दिली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, जिल्हा व्यवसाय व कौशल्य विकास अधिकारी प्रांजली बारस्कर, डायट प्रतिनिधी विजय शिंदे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य एन.जी. देशमुख, जिल्हा सांख्यिकी अधिकारी संजय काळमेघ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर.एस. राऊत, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बुध्दभुषण सोनोने, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल कोल्हे, सहायक योजना अधिकारी प्रीतम गणगणे यावेळी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील एकूण निरक्षरांची संख्या 47 हजार 540 इतकी नोंदविली असून जिल्ह्यासाठी शासनाने 5 वर्षांसाठी एकूण उद्दिष्ट 3 लक्ष 6 हजार 800 एवढे दिले आहे. कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वेक्षण करावे. सर्व संबंधित यंत्रणेने पूर्ण क्षमतेने कार्य करुन योजना यशस्वी करण्याचे आवाहन श्री. पंडा यांनी यावेळी केले.

            यावेळी नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे स्वरुप, सहभागी यंत्रणा खर्च, तरतूद, यंत्रणांची जबाबदारी याबद्दल माहिती देण्यात आली. ही योजना राज्यात प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यात सन 2022-23 ला सुरु झाली. तसेच पूर्ण राज्यात या वर्षापासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत 15 ते 35 वयोगटातील निरक्षरांना साक्षर करावयाचे आहे. 

या कार्यक्रमांतर्गत 10 निरक्षरांना एक स्वयंसेवक साक्षर करणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 1 हजार 820 स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहे.  स्वयंसेवक कमीत-कमी 8 वा वर्ग शिकलेला असावा. या निरक्षरांचे सर्वेक्षण प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षक करणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, माता-पालक संघ, बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, समाजसेवक तसेच राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घेण्यात येईल. या योजनेचा निरक्षरांना लिहिता- वाचता येणे, दैनंदिन व्यवहारातील हिशोब येणे, डिजीटल साधनांचा उपयोग करण्यास सक्षम करणे हा उद्देश आहे. 

*****

भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

• दक्षता जनजागृती सप्ताह 5 नोव्हेंबरपर्यंत

 

          अमरावती, दि. 31 : राज्यात दरवर्षी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर या जन्म दिवसानिमित्त एक आठवडा ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे करण्यात येते.  यंदाही दि. 30 ऑक्टोबर 2023 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी यावर्षी ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’  ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती कार्यालय येथे नुकतीच भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताह 2023 ची सुरूवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना यावेळी वाचून दाखविण्यात आला.

           या कार्याक्रमास पोलीस अधिक्षक  मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर  यांच्यासह सर्व अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. दक्षता जनजागृती सप्ताह 2023 दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार निमुर्लन संबंधाने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याव्दारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधाने काहीही तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क क्र. 0721-2553055/2664902 यावर टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधावा. अथवा कार्यालय पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र, ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस उपअधीक्षक मिलींदकुमार बहाकर यांनी केले आहे.

00000

वनविभाग व संत गाडगेबाबा संस्थेचा स्तुत्य उपक्रम निसर्गाच्या माहितीवर आधारित परीक्षेत 200 विद्यार्थ्यांचा सहभाग

 




वनविभाग व संत गाडगेबाबा संस्थेचा स्तुत्य उपक्रम

निसर्गाच्या माहितीवर आधारित परीक्षेत 200 विद्यार्थ्यांचा सहभाग

 

अमरावती, दि. 31(जिमाका): अमरावती येथील ऑक्सीजन पार्कमध्ये संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यप्राणी, पक्षी व जंगलाचे ज्ञान होण्याच्या दृष्टीने नुकतीच स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी ऑक्सीजन पार्कमध्ये लावलेल्या वन्यप्राणी पक्षांच्या माहितीच्या फलकाचा अभ्यास केला. या स्पर्धा परीक्षेत जवळपास 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल जाहीर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर ठाकरे व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.

मनपा आयुक्त देविदास पवार यांनी या उपक्रमासाठी संस्थेला जी मदत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच हा नाविण्यपूर्ण उपक्रम संत गाडगेबाबा संस्था व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यासाठी मान्यता दिली.

उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच पर्यावरणाबाबत मार्गदर्शन केले. श्री. मिश्रा यांनी ऑक्सीजन पार्क मधील स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाला वनविभागामार्फत सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. किरण पातूरकर, प्राचार्य शीतल मेटकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

स्पर्धा परीक्षेत रामकृष्ण विद्यालयाचा विद्यार्थी संविधान अनिल मडामे हा सर्वात जास्त गुण घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तसेच रामकृष्ण विद्यालयाचा संयुक्त बाळापुरे, प्रज्योत उंबरकर, देवश्री अजमिरे असे एकूण पाच विद्यार्थ्यांनी प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षीस पटकाविले. श्रीराम विद्यालय वडाळीची मानसी इंगळे हिने सर्वच विद्यार्थ्यांमधून दुसरा क्रमांक पटकाविला तर संस्कार किरण पाटील याने व्दितीय क्रमांक पटकाविला.

इयत्ता 8 वी ते 10 वी गटाचे संपूर्ण बक्षिस स्व. आशाबाई खुशालराव पांडव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीपक पांडव, रा. डोंगरयावली, इयत्ता 5 ते 7 गटाचे संपूर्ण बक्षिस स्व. वेणुबाई गणेशराव बोंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राजेंद्र बोंडे, रा. हिवरखेड तर इयत्ता 3 ते 4 गटाचे संपूर्ण बक्षिस स्व. देवीदासपंत रामभाऊजी ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिलींद ढोले रा. मोर्शी यांनी पटकाविले.

अमरावती वनविभाग व संत गाडगेबाबा संस्थानाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीव्दारे निवृत्त वनअधिकारी अशोक कविटकर यांच्याशी संपर्क साधून स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाचे कौतुक करुन अमरावती वनविभाग तसेच संत गाडगेबाबा संस्था यांचे अभिनंदन केले.

संचलन गोवर्धन म्हाला यांनी तर आभार शांताराम उमाळे यांनी मानले. स्पर्धा परीक्षेची ऑक्सीजन पार्कमधील व्यवस्था वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती वर्षा हरणे व त्यांच्या चमूने सांभाळली.

00000

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

 

 

अमरावती (जिमाका),दि. 31 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 20 ते 29 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 55 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

 

अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 15 नोव्हेंबर, 2023 मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येतेवेळी Department of Sainik Welfare, Pune (DSW) या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-55 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

 

केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेऊन यावेत.

अ) कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. ब) एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. क) टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. ड) युनिर्व्हसिटी एन्ट्री स्कीम (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

 

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी- training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल यांनी केले आहे.

जिल्हा कोषागार कार्यालय येथे भूमीपूजन सोहळा

 

जिल्हा कोषागार कार्यालय येथे आज भूमीपूजन सोहळा

          अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्हा कोषागार कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत प्राप्त निधीतून जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती येथील सभागृह बांधकामाचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम उद्या बुधवार, दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पोलीस अधीक्षक ग्रामीण अविनाश बारगळ, सहसंचालक स्थानिक निधी लेखा विभाग विनोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अमरावती विभाग लेखा व कोषागारे सहसंचालक श्रीमती प्रिया तेलकुंटे राहतील.

00000

Friday, October 27, 2023

प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

 





येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी

नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

जिल्ह्यात 2 हजार 664 मतदार केंद्रे

 

            अमरावती, दि. 27 (जिमाका): लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविल्या जातो. आज दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित करून यंदाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे.            दि. 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण-तरूणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल, मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या-त्या तारखेला पूर्ण करण्यात येईल.

सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन श्री. कटियार यांनी केले.

            प्रारूप यादीत आपल्या नावाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. यासाठी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील अचूक आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. 8 भरावा. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबधी हरकतही घेता येते. एखाद्या मतदारसंघातील मतदार यादीत दिलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अशा नावाबाबत त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

            समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जातीसाठी 14, जमातीसाठी 19, सेक्स वर्करसाठी 1, तृतीयपंथी व्यक्ती 1, दिव्यांगासाठी 10, विद्यार्थ्यांसाठी 18 असे एकूण 64 शिबिरे घेण्यात आली असून या शिबिरामध्ये एकूण 3 हजार 744 अर्ज नवीन मतदार नोंदणीसाठी प्राप्त झाले. तसेच 12 हजार 259 दिव्यांगाना मतदार यादीत चिन्हांकित करण्यात आले. बीएलओ यांचे मार्फत व्हीआयपी व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांना चिन्हांकित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व यापुढे दि. 4 व 5 नोव्हेंबर तसेच 25 व 26 नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत विशेष शिबिर मोहिम राबविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणीसाठी महिला मेळावे, बचतगट, महिला व बाल विकास विभाग यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तर दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येक बीएलओ यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे. त्यामध्ये मयतांची संख्या 25 हजार 882, स्थलांतरीत 17 हजार 770, अनुपस्थिती 27 हजार 60 नावे आढळून आली आहेत. आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत बीएलओमार्फत नमुना 7 व 8 चे फार्म भरून घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

            पारधी, फासे पारधी, नाथ जोगी, गोसावी, धनगर, अशा विमुक्त भटक्याजमाती या समाजघटकाकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्राची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतेही कागदपत्रे नसले तरी मतदार नोंदणी करू शकणार आहेत.

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने विशेष ग्रामसभेचे आयोजन आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार आहे. या काळात ग्रामसभेचे मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्याअंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावाची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

            दि. 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरूष मतदारसंख्या 12 लक्ष 38 हजार 044, स्त्री मतदार संख्या 11 लक्ष 62 हजार 536 व तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकुण 24 लक्ष 662 होती. तर दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरूष मतदार संख्या 12 लक्ष 33 हजार 378 आहे. स्त्री मतदारांची संख्या 11 लक्ष 59 हजार 157 तर तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकूण मतदार संख्या 23 लक्ष 92 हजार 617 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 664 मतदान केंद्रे आहेत.

            भारत हा तरूणाचा देश आहे. त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पुरस्काराचे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

           नवमतदार व ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in व ceo.maharashtra.gov.in चा वापर करावा किंवा जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरावा किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले आहे.

            मतदार यादीची प्रसिध्दी आज, दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यामध्ये सर्वत्र केली आहे. मतदार यादी प्रकाशनाबाबत सविस्तर माहिती अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, महसूल उप जिल्हाधिकारी रणजीत भोसले, निवडणूक नायब तहसीलदार प्रविण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

 

***

‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

 ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित

शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 27(जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी  पाणीसाठा उपलब्ध असून पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून  95.50 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या  42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी  पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार  ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल

कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10  नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात  नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत  या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.

लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक

            इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.

मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35 मी. पर्यतच्या विहिरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या नगदी पिकांसाठी (उदा. ऊस, कापूस, केळी व फळबाग) पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के  दर लागू असेल.

पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.

शेतचारा स्वच्छ ठेवा

कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

             लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.

थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही.   वितरिकेत पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा  वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणीपाळी कालावधीत वाढ होते.

 

रब्बी हंगाम 2023-24 संभाव्य पाणी पाळी नियोजन

कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी  दि. 15 नोव्हेंबर  ते 5 डिसेंबर 2023  (22 दिवस) तर  कालवा बंद कालावधी 6 ते 12 डिसेंबर 2023 राहील. दि. 13 डिसेंबर 2023 ते 3 जानेवारी  2024 कालव्यात  (22 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 4 ते 10  जानेवारी 2024 कालवा बंद राहील. दि. 11 ते  दि. 27 जानेवारी 2024 (17 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 28 जानेवारी ते दि.3 फेब्रुवारी 2024 कालवा बंद राहील.  दि. 4 ते  दि. 20 फेब्रुवारी 2024 (17 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर  दि. 21 ते दि. 27 फेब्रुवारी 2024  कालवा बंद राहील. दि. 28 फेब्रुवारी  ते 15 मार्च 2024 (16 दिवस) पाणी सोडण्यात येईल.  कालव्यात एकूण 94 दिवस पाणी सोडण्यात येईल.

जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. 

000000

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमध्ये कारागिरांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 


प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमध्ये

   कारागिरांनी नोंदणी करावी

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): औजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारीक कारागिर आणि हस्तकलेच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्यांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगिण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना मंजूर केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पारंपारीक कारागिरांना लाभ होण्यासाठी तसेच लाभार्थी कारागिरांपर्यंत या योजनेची माहिती पोहचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या जिल्हा अंमलबजावणी समितीच्या सभेत नुकतेच दिले.

            अमरावती जिल्ह्यात या योजनेंतर्गत आज अखेर 1 हजार 581 ग्रामीण कारागिरांची नोंदणी झालेली आहे. ती वाढविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरापर्यंत या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल अशी सूचना श्री. कटियार यांनी यावेळी दिली.

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे पी.टी.डोईफोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक पंकज कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक गिरीश सांगळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, सीएससी व्यवस्थापक प्रशांत तायडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

            पारंपारीक कारागिर यांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कौशल्य वृध्दी प्रदान करणे, व्यवसायासंबंधित आणि योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे, चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी सहाय्य प्रदान करणे, विनातारण, सवलतीच्या व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करुन देणे, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे, ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

योजनेमधून नोंदणीकृत कारागिरांना मिळणारे लाभ

            कौशल्य पडताळणी नंतर 5 ते 7 दिवस मुलभूत प्रशिक्षण, इच्छुक उमेदवार 15‍दिवस प्रगत प्रशिक्षण, प्रशिक्षण विद्यावेतन दररोज 500 रुपये, टूलकिट प्रोत्साहन 15 हजार रुपये अनुदान, तारणमुक्त व्यवसायिकता विकास कर्ज 1 लक्ष रुपये आणि 2 लक्ष रुपये, सवलतीचा व्याजदर एनएसएनईव्दारे 8 टक्के व्याज सवलत मर्यादेसह लाभार्थीकडून 5 टक्के व्याज, या कर्जासाठी क्रेडीट गॅरंटी फी केंद्र शासन उचलेल, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन जास्तीत-जास्त 100 व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 1 रुपये, विपणन समर्थन नॅशनल कमिटी फॉर मार्केटिंग गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रँडींग आणि प्रमोशन, ई-कॉमर्स लंकेज, व्यापार मेळावे जाहिरात, प्रसिध्दी आणि इतर विपणन यासारख्या सेवा प्रदान करेल.

 

 

 

योजनेसाठी पात्र लाभार्थी

            असंघटित क्षेत्रात स्वयंरोजगार तत्त्वावर अवजारांची काम करणारे कारागीर, 18 कुटुंब आधारित पारंपारीक व्यवसायांपैकी एका व्यवसायात गुंतलेला कारागीर, नोंदणीच्या तारखेस लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्षे असावे. या योजनेंतर्गत नोंदणी असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

योजनेसाठी पात्र कारागीर व व्यवसाय

            सुतार, बोट निर्माता, लोहार, बॅमर आणि टूल किट मेलर, कुलपे बनविणारे, मूर्तीकार, स्टोन ब्रेकर, सोनार, कुंभार, मोची, शूस्मिथ, पादत्राणे कारागीर, गवंडी, राजमिस्त्री, बास्केट, मॅट, झाडू निर्मिती, कथ्या व्यवसाय करणारे, बाहुली आणि खेळणी निर्मिती, नाव्ही, माला निर्मिती, परीट, शिंपी, मासेमारी जाळी बनविणारे कारागिर या योजनेसाठी पात्र ठरतील.

ऑनलाईन अर्ज असा करावा

            या योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज करण्याची https://pmvishwakarma.gov.in ही लिंक जाहीर करण्यात आली आहे. अर्जदाराला त्याच्या जवळच्या सीएससी केंद्रातील ऑपरेटरव्दारे अर्ज करावा. प्रथमस्तरीय छाननी ग्रामपंचायत सरपंच करतील. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनाकडून कारागीर ओळखपत्र देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रांची किंवा माहितीची यादी

            लाभार्थ्याच्या नोंदणीसाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक तपशील, शिधापत्रिका आदी कागदपत्रे आवश्यक राहतील.

***** 

 

 

 

Thursday, October 26, 2023

मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना

 







मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत

अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत 'अमृत कलश यात्रा ' उपक्रम अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावातून संकलित करण्यात आलेल्या 14 तालुक्यातील मातीचे 14 माती कलश मुख्यालयाच्या ठिकाणी एकत्रित करुन मुंबई व तेथून दिल्लीला पाठविण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

           दि. 1 सप्टेंबर पासून जिल्ह्यात ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायत मधील 1 हजार 566 गावांमधून माती गोळा करुन तालुकास्तरावर माती कलश तयार करण्यात आले. सर्व 14 तालुक्याचे ठिकाणी वाजत-गाजत अमृत कलश यात्रा काढण्यात आली.

            तालुक्यावर संकलित करण्यात आलेल्या मातीचे अमृत कलश मुंबईला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी पाठविण्यासाठी आज जिल्हा परिषद प्रांगणात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रताप अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीसह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, विकास उपायुक्त राजीव खडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा ग्रामीण विकास योजना प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, पंचायत तथा सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीष धायगुडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके तसेच सर्व विभाग प्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुकास्तरावरील अमृत कलश जिल्हास्तरावर संकलन करणे, वाजत गाजत अमृत कलश यात्रा काढून मुंबईसाठी रवाना करणे इत्यादी उपक्रमाचा समावेश होता.

             आज 14 तालुक्यातील 14 माती कलश घेऊन 28 स्वयंसेवक व एक जिल्हा समन्वयक मुंबईसाठी रवाना झाले. जिल्हा समन्वयक, जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर असून 28 स्वयंसेवक हे नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी आहेत. शुक्रवार, दि. 27 ऑक्टोबरला मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि त्याच दिवशी 4 ते 6 वाजेदरम्यान राज्यातील सर्व स्वयंसेवक कलश घेऊन विशेष रेल्वेने दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा देशव्यापी समारोपीय कार्यक्रम मंगळवार, दि. 31 ऑक्टोबर दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

            या जिल्हास्तरीय कार्यक्रमात तालुकास्तरावरील अमृत कलशाचे पूजन करण्यात येऊन अमृत कलश मुंबईसाठी रवाना झाले .

00000

कृषी उद्योजकता निर्मिती व एमपीसी क्षमता विकास कार्यशाळा 27 ऑक्टोबर रोजी

 कृषी उद्योजकता निर्मिती व एमपीसी क्षमता विकास

कार्यशाळा 27 ऑक्टोबर रोजी

      अमरावती, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), कृषी विद्या विभाग-श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती व कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ‘कृषी उद्योजकता निर्मिती व एमपीसी क्षमता विकास कार्यशाळा-ॲग्री स्टार्ट-अप कनवेंशन’ डॉ. पंजाबराव देशमुख कृषक प्रशिक्षण केंद्र, श्री. शिवाजी कृषी विद्यान महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती येथे दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.

            या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार असून विभागीय कृषी सहसंचालक किसनजी मुळे, कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या कार्यशाळेला प्राचार्य श्री शिवाजी कृषी महाविद्यालय नंदकिशोर चिखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने  उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेसाठी चेअरमन-कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन भूषण निकम, तसेच चेअरमन- कृषी भूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी लि. नाशीक, कृषी विद्या विभाग श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक जितेंद्र दुर्गे प्रमुख वक्ते म्हणुन राहणार आहेत.

            या कार्यशाळेसाठी संबंधित शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

000000


अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित

 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्तीचे

अर्ज भरण्यास महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित

            अमरावती, दि. 25 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या वरील विविध शिष्यवृत्ती योजनांचे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर, 2023 पासून महाडीबीटी पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी स्तरावर असलेले अर्ज विद्यार्थ्यांना रि-अप्लाय करण्यासाठी व महाविद्यालयांना अर्ज पडताळणीसाठी सुध्दा शासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

            सन 2023-24 शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यावे. तसेच आपले महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी या संकेतस्थळावर तात्काळ भरून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी केले आहे.

00000

अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून विविधतेतून एकात्मतेचा संदेश - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 


जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा

अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून विविधतेतून एकात्मतेचा संदेश

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 23 (जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमातील देशभक्तीपर भावनेची अनुभूती आपण सर्वजण अनुभवत आहोत. अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून विविधतेतून एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा शंभर वर्षे पूर्ण होतील त्यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये तुमचे योगदान होते, याचा तुम्हाला अभियान राहील. गावा-गावात शूरवीरांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ शीलाफलक स्थापन करण्यात आले आहे. येणाऱ्या पिढीला हे शीलाफलक शौर्य, त्याग, बलिदान यांचे प्रतीक म्हणून देशसेवा करण्यासाठी प्रेरित करीत राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

नगरपालिका प्रशासन विभागामार्फत ‘माझी माती, माझा देश’ (मिट्टी को नमन, विरों को वंदन) याअंतर्गत जिल्हास्तरीय ‘अमृत कलश यात्रे’चे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. अमृत कलश यात्रेनिमित्त जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे अमृत कलश एकत्रित करण्यात आले. यावेळी श्री. कटियार यांनी अमृत कलशांचे पूजन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त सुमेध अलोणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा अभियान राबविण्यात आले आहे. मातृभूमीसाठी झटणारे तसेच आपल्या प्राणांची आहुती देकणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा, यासाठी हे अभियान देशभर राबविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी श्री. कटियार यावेळी म्हणाले.

जिल्हास्तरीय ‘अमृत कलश’ यावेळी बनविण्यात आला. हा कलश घेऊन 25 ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रतिनिधी मुंबई येथे रवाना होणार आहेत. तेथून राज्यभरातील सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी विशेष रेल्वेने दि. 27 ऑक्टोबर रोजी दिल्लीला जाणार आहेत. दिल्ली येथे मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 1 नोव्हेंबर 2023 रोजी विजयपथ येथे पथसंचलनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर देशातील राज्या-राज्यातून दिल्ली येथे आणण्यात आलेल्या अमृत कलशांच्या माध्यमातून ‘एक विशेष कलश’ निर्माण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली. श्री. कटियार यांच्या हस्ते यावेळी वड, पिंपळ, चिंच, बदाम तसेच उंबर या रोपांची लागवड करुन वृक्षारोपण करण्यात आले. अमरावती येथील बीडीएस डान्स ग्रृपच्या माध्यमातून यावेळी देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्याविष्कार सादर करण्यात आला. यावेळी मुंबई येथे कलश घेऊन जाणारे नगर विकास विभागाचे उप मुख्य अधिकारी गौरव इंगोले, गजानन चक्रनारायण, नगर अभियंता यश अग्रवाल यांना जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते गौरवून त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे संचालन नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा समन्वयक प्रवीण येवतीकर यांनी तर आभार मुख्याधिकारी विकास खंडारे यांनी मानले.

*****









Wednesday, October 25, 2023

मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना

                                                     










मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत

अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना

अमरावती, दि. 25 (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत 'अमृत कलश यात्रा ' उपक्रम अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावातून संकलित करण्यात आलेल्या 14 तालुक्यातील मातीचे 14 माती कलश मुख्यालयाच्या ठिकाणी एकत्रित करुन मुंबई व तेथून दिल्लीला पाठविण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

           दि. 1 सप्टेंबर पासून जिल्ह्यात ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायत मधील 1 हजार 566 गावांमधून माती गोळा करुन तालुकास्तरावर माती कलश तयार करण्यात आले. सर्व 14 तालुक्याचे ठिकाणी वाजत-गाजत अमृत कलश यात्रा काढण्यात आली.

            तालुक्यावर संकलित करण्यात आलेल्या मातीचे अमृत कलश मुंबईला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी पाठविण्यासाठी आज जिल्हा परिषद प्रांगणात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रताप अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीसह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, विकास उपायुक्त राजीव खडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा ग्रामीण विकास योजना प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, पंचायत तथा सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीष धायगुडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके तसेच सर्व विभाग प्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुकास्तरावरील अमृत कलश जिल्हास्तरावर संकलन करणे, वाजत गाजत अमृत कलश यात्रा काढून मुंबईसाठी रवाना करणे इत्यादी उपक्रमाचा समावेश होता.

             आज 14 तालुक्यातील 14 माती कलश घेऊन 28 स्वयंसेवक व एक जिल्हा समन्वयक मुंबईसाठी रवाना झाले. जिल्हा समन्वयक, जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर असून 28 स्वयंसेवक हे नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी आहेत. शुक्रवार, दि. 27 ऑक्टोबरला मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि त्याच दिवशी 4 ते 6 वाजेदरम्यान राज्यातील सर्व स्वयंसेवक कलश घेऊन विशेष रेल्वेने दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा देशव्यापी समारोपीय कार्यक्रम मंगळवार, दि. 31 ऑक्टोबर दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

            या जिल्हास्तरीय कार्यक्रमात तालुकास्तरावरील अमृत कलशाचे पूजन करण्यात येऊन अमृत कलश मुंबईसाठी रवाना झाले .

*****


DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...