कुशल देशासाठी कौशल्यविषयक विचार समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे - संचालक दिगंबर दळवी

 






रोजगार भरती मेळाव्याचे यशस्वी आयोजन

कुशल देशासाठी कौशल्यविषयक विचार समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे

- संचालक दिगंबर दळवी

 

अमरावती दि.२१:( जिमाका)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील कुशल  भारत घडविण्यासाठी कौशल्यविषयक विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय ) व येथे प्रशिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी करीत आहे , असे प्रतिपादन राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी आज  केले.

           नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये  रोजगार भरती महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते , त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दळवी बोलत होते. यावेळी विद्यार्थी , पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

           मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड, शिक्षक आमदार  किरणकुमार सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अमरावती विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले, मुंबई प्रकल्प समन्वयक राजेंद्र येते, सहायक संचालक रवींद्र लोखंडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉ. शेळके, कौशल्य विकास उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, श्रीमती प्रांजली बायस्कर, नांदगाव खंडेश्वर आय.टी.आय.चे प्राचार्य एन. ए. भुकवाल आदी मान्यवर  उपस्थित होते.

             विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिगंबर दळवी म्हणाले की,  कोणतीही शासकीय संस्था ही नागरिकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असते. आय.टी.आय. मधील संसाधनांचा उपयोग गावातील नागरिकही करू शकतात. या विभागाने कौशल्य विकासाचा प्रचार व प्रसारासाठी अनेक लोकाभिमुख कार्यक्रम राबविले असून  सद्यस्थितीत 'मिशन शंभर' हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवित आहे. यामध्ये आय.टी.आय. च्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वॉटर कुलर, डिजिटल हॉल, स्वछतागृहे, परकीय भाषांचे प्रशिक्षण, सुंदर व पर्यावरण संतुलित परिसर, ओपन जिम, अभ्यासिका असे अनेक  विद्यार्थीपयोगी सुसज्ज उपक्रम  राज्यातील आय.टी.आय. मध्ये सुरु आहे.  याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होईल , असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

           खासदार रामदास तडस यांनी या देशात रोजगाराच्या संधी मुबलक प्रमाणात  असून कौशल्य प्राप्त केल्यावर त्या सहज उपलब्ध होत आहेत. कौशल्य प्राप्त करून उद्योग उभारा  व नोकरी देणारे हात व्हा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

      आमदार प्रताप अडसड यांनी  कल्पकता व क्षमता ओळखून नवीन तरुणांनी उद्योजक होण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.  यातून अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन स्वतःसह इतरानांही आर्थिक सक्षम बनवण्याचे आवाहन केले .

      आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी आपल्या देशात किसान, जवान यांनतर तंत्रज्ञानाला अग्रक्रम दिल्याने कौशल्य विकासाची संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज ग्रामीण भागातील युवक स्थानिक कौशल्य केंद्रात जाऊन आपले अल्पावधीचे अभ्यासक्रम पूर्ण करून आपला रोजगार सुरु करू शकतो,  असा विश्वास व्यक्त केला .

    रोजगार मेळाव्यात अठराशे विविध पदांसाठी 2 हजारविद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये महिंद्रा मोटर्स , रेडियन्ट ग्रुप जाधव मोटर्स ,मेटल क्राफ्ट, नवभारत फर्टिलायझर्स अशा अनेक कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच अमरावती विभागातील सर्व आयटीआयचे प्राचार्य, शिल्पनिदेशक, एमसीव्हीसी निदेशक, सरपंच , विद्यार्थी,पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 कार्यक्रम यशस्वीतेसाठी नांदगाव खंडेश्वर आयटीआयचे प्राचार्य श्री . भुकवाल  तसेच  गटनिदेशक, निदेशक, विद्यार्थी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची प्रस्तावना सहसंचालक प्रदीप घुले यांनी तर संचालन सुरेंद्र भांडे  यांनी केले .कार्यक्रमाची प्रस्तावना सहसंचालक प्रदीप घुले यांनी तर संचालन सुरेंद्र भांडे  यांनी केले .

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती