आयुष्यमान भारत योजना; एकही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये - जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे निर्देश
आयुष्यमान भारत योजना; एकही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये
- जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे निर्देश
अमरावती, दि. 13 (जिमाका) : आयुष्यमान भारत योजनव्दारे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड मिळण्यासाठी संबधित विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट ठरवून द्यावे. जिल्ह्यातील उर्वरित पात्र 6 लक्ष 68 हजार 586 लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड काढण्याचे उद्दिष्ट त्वरीत पूर्ण करा. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड’संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, नगर विकास शाखा सुमेध अलोने, जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी यांनी आपल्या विभागामार्फत विहित कालावधीचे नियोजन करुन गोल्डन कार्ड तयार करण्याची कार्यवाही करावी. जिल्ह्यासाठी असलेले उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अधिनस्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक दिवशी किमान 10 गोल्डन कार्ड काढण्याचे उद्दिष्ट ठरवून द्यावे. येत्या पंधरा दिवसात उर्वरित 6 लक्ष 68 हजार 586 पात्र लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी दिले.
अमरावती जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेचे पात्र लाभार्थी संख्या 10 लक्ष 69 हजार 224 ऐवढी आहे. यापैकी आजपर्यंत 4 लक्ष 3 हजार 273 कार्ड काढण्यात आलेले आहे. तर उर्वरित 6 लक्ष 68 हजार 586 गोल्डन कार्ड काढण्याचे कार्य सुरु आहे, अशी माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले यांनी दिली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना भ्रमणध्वनीमार्फत गोल्डन कार्ड काढण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
योजनेच्या लाभासाठी संपर्क करावा
योजनेच्या माहितीसाठी 1800111565 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा आरोग्य मित्रास भेटावे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी 18002332200 वर संपर्क करावा. तसेच मोबाईल ॲपव्दारे लाभार्थी स्वतः गोल्डन कार्ड काढू शकतात. ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, आशा यांच्यामार्फतही कार्ड काढता येईल. शहरी भागात शहरी आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय येथूनही कार्ड काढता येईल. जिल्ह्यातील योजनेमधील 22 अंगीकृत रुग्णालयात आयुष्मान योजनेतंर्गत 1 हजार 209 गंभीर आजारांवर प्रति वर्ष प्रती कुटुंब पाच लक्ष इतका विमा संरक्षण अंगीकृत रुग्णालयामार्फत मोफत उपचार रूग्ण घेऊ शकतो.
०००००
Comments
Post a Comment