उमरेड येथे औष्णीक विद्युत प्रकल्पाच्या
निर्मितीसंदर्भात सकारात्मक
- देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.4 : उमरेड येथे औष्णीक विद्युत प्रकल्पासाठी आवश्यक असलेला विपुल प्रमाणात कोळसा तसेच वीज उत्पादनाचा खर्च कमी होण्यासोबतच या परिसरातील सुमारे दहा हजार लोकांना रोजगार निर्माण होत असल्यामुळे उमरेड वीज प्रकल्पाच्या मंजुरीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे दिली.
उमरेड नगर परिषदेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन तसेच पंडीत दीनदयाल उपाध्याय शॉपींग मल्टीपर्पज हॉल (नाटयगृह) चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमाने, विकास महात्मे, आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.
उमरेड नगर परिषदेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यापूर्वी 10 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला असून आणखी 15 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील स्वच्छ शहर म्हणून शहराचा विकास करा. उमरेडला राज्यस्तरावर हागणदारीमुक्त शहर म्हणून गौरविण्यात आले असल्याचे सांगतांना शहरातील प्रत्येक गरीब कुटुंबांना घर देण्यासाठी प्रस्ताव तयार करा. यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
नागपूर नागरीक रेल्वेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर-उमरेड या सिमेंट मार्गासोबतच रस्त्याचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी दिला असून पुनर्वसनासाठीही आवश्यक असलेला संपूर्ण निधी देण्यात येईल, परंतु आदर्श पुनर्वसन करा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्यात.
ग्रामीण व शहरी भागातील चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री जनआरोग्य कक्षाच्या माध्यमातून दूर्धर आजारावरील उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी निधी देण्यात आला असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी जनआरोग्य योजना जाहीर केली असून 50 कोटी लोकांना खाजगी रुग्णालयात 5 लक्ष रुपये खर्चापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत उमरेड तालुक्यातील सुमारे 11 हजार 836 शेतकऱ्यांना 65 कोटी रुपयाची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल, श्रीफळ तसेच नांगराची प्रतिकृती भेट देवून कृतज्ञता व्यक्त केली.
गोरगाव कलांद्री येथील केशव शंकर बानाईत, मांढळ येथील रामकृष्ण निरगुळकर व सिलेपार येथील संभाजी घरड व राजू बाळबुधे आदी शेतकऱ्यांनी कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 39 हजार 492 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,राज्यातील 30 वर्षापेक्षा जास्त औष्णीक वीज प्रकल्प नियमानुसार बंद करण्यात येणार असून नव्याने उमरेड येथील वीज प्रकल्पाला मंजुरीचा प्रस्ताव आहे. नागनदीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन 1200 मेगावॅटचे दोन प्रकल्प सुरु होवू शकतात.
शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध राहणार आहे. उपसासिंचनासाठी दिवसा 12 तास ही सौरऊर्जेच्या माध्यमातून तर 12 तास औष्णीक ऊर्जेच्या माध्यमातून मिळणार आहे. चिंचघाट उपसासिंचनामुळे साडेसहा हजार शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळू शकेल. आतापर्यंत 5 लाख शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच शहराचे जिओ मॅपींग करण्याचे काम सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सुधीर पारवे यांनी यावेळी उमरेड मतदारसंघातील सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.
उमरेड नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भदोरिया यांनी आपल्या प्रास्ताविकातून शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांमध्ये विविध मूलभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता अभियान यामध्ये नगर परिषदेने उत्कृष्ठ काम केले आहे. त्यामुळे राज्यातील पहिले हागणदारीमुक्त शहर म्हणून राज्य शासनाकडून गौरविण्यात आले. नगर परिषदेच्या या विविध विकास कामांमध्ये रस्ते, मैदान, मुलींचे वसतीगृह, तलावाचे सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेला 25 कोटीच्या निधीची मागणी केली.
00000000
Comments
Post a Comment