बालनाट्य चळवळीच्या अध्वर्यू हरपल्या
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 5 : बाल रंगभूमीच्या विकासासाठी समर्पित भावनेने आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या सुधा करमरकर यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, कुटुंबातूनच नाट्यसेवेचा वारसा घेऊन आलेल्या सुधाताई या क्षेत्राशी पूर्णत: समरस झाल्या होत्या. मराठी रंगभूमीने प्रारंभीच्या वाटचालीत दुर्लक्षित केलेल्या बालकांसाठीच्या स्वतंत्र रंगभूमीचा त्यांनी प्राधान्याने विचार केला. अमेरिकेत जाऊन त्यांनी बाल रंगभूमी संकल्पनेचा विशेष अभ्यास केला होता. बालनाट्य चळवळ रुजविण्यासाठी लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून निष्ठेने प्रयत्न केले. या चळवळीच्या त्या खऱ्या अर्थाने अध्वर्यू होत्या. नाट्यलेखन,दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय अशा सर्वच भूमिका पार पाडताना त्या जणू आयुष्यभर रंगभूमीशी अविभाज्यपणे जोडल्या गेल्या होत्या. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केला असून अनेक कलावंतही घडवले आहेत.
-----000-----
Comments
Post a Comment