महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १३ हजार ५०६ घरे मंजूर
नवी दिल्ली, १ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) अंतर्गत महाराष्ट्रातील १५ शहरांतील गरिबांसाठी १३ हजार ५०६ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण १ लाख ५० हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत.
केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या ३४ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी ६४३ कोटींची गुंतवणूक आणि केंद्राच्या २०१ कोटींच्या सहाय्यासह १३ हजार ५०६ घरे मंजूर करण्यात आली आहेत.
राज्यातील पुणे जिल्हयातील पिंपरी वाघिरे, वाघोली आणि म्हाळुंगे तसेच शिरुर तालुक्यातील वाढु, हवेली तालुक्यातील वेळू व वडगाव .
अकोला जिल्हयातील अकोट, चंद्रपूर शहर, नांदेड जिल्हयातील नांदेड वाघाळा, नाशिक जिल्हयातील मालेगाव, सातारा शहर, नाशिक शहर, सोलापूर शहर, अहमदनगर जिल्हयातील राहता, कर्जत आणि पाथर्डी तसेच उस्मानाबाद शहर या शहरांमध्ये वर्ष २०१७-१८ साठी एकूण १३ हजार ५०६ घरे मंजूर झाली आहेत.
या बैठकीत ७ हजार २२७ कोटींची गुंतवणूक व २ हजार २०९ कोटींच्या अर्थ सहाय्यासह देशभरातील १० राज्यांच्या ३७० शहरांसाठी १ लाख ५० हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत .
Comments
Post a Comment