Friday, January 31, 2020

राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद

गोरगरीबांना दिलासा देणारा उपक्रम
     





-         जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 31 : नागरिकांच्या विविध समस्यांचे एकाच ठिकाणी निराकरण राहुटीच्या माध्यमातून होत आहे.  राहुटी हा गोर गरिबांना दिलासा देणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज केले.

चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे आज राहुटी उपक्रमांतर्गत विविध योजनांच्या अनेक लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले.  या अर्जांवर तात्काळ कार्यवाही होऊन सर्व नागरिकांना लवकरच प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांचे वाटप ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार उमेश खोडके यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सर्वसामान्य जनतेचे काम एकाच ठिकाणी गतीने होण्यासाठी ग्रामीण स्तरावर राहुटी हा उपक्रम राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. आज उपक्रमाचा दुसरा दिवस होता.  
ब्राम्हणवाडा थडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राहुटीचे आयोजन करण्यात आले होते.
लाभार्थी प्रमाणापत्र, महसूल दाखले, जमिनीचा फेरफार, नवीन शिधापत्रिका, मातृवंदन योजना, बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विद्युत जोडणी, घरकुल योजना, आरोग्य योजना, अपंग प्रमाणपत्र आदी विविध बाबींसंदर्भात प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल.
            जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनीही यावेळी नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. राहुटी उपक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
                                                                        000    

Thursday, January 30, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली


 

               देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हुतात्मा दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनीटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, January 28, 2020

अमरावती येथे विभागीय कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारती - उपमुख्यमंत्री अजित पवार






*पोलिसांच्या वाहनासाठी तरतूद
*निकषानुसार वार्षिक नियोजनचा निधी
*उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या सूचना
अमरावती, दि. 28 : अमरावती येथे विभागीय प्रशासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विशेष पोलिस महानिरीक्षक आदी कार्यालये जुन्याच इमारतीमध्ये आहेत. या कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील येत्या वर्षांच्या प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी येथील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. यावेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, अमरावतीसह अकोला, बुलडाणा येथील शासकीय कार्यालये जुन्या इमारतींमध्ये आहेत. अमरावती येथील विभागीय कार्यालये विविध ठिकाणी तसेच जुन्या जागेत आहेत. त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोलिस विभागातील विभागीय कार्यालयांच्या स्वतंत्र इमारतींसाठीही निधी देण्यात येतील.
राज्यातील सर्व जिल्ह्यांना लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या, जिल्ह्याचे क्षेत्रफळ, मानव विकास निर्देशांक आदी निकषांनुसार जिल्हा वार्षिक योजनेंत देण्यात येणारा निधी कळविण्यात आला आहे. या निधीच्या मर्यादेतच आराखडा तयार करण्यात यावा, जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या एकत्रित निधीपैकी वीस टक्के निधी शाळांच्या बांधकामासाठी द्यावा लागणार आहे. अमरावती आणि अकोला येथील विमानतळाचा विकास जलदगतीने होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. मनरेगामधून शाळा खोल्या बांधकाम करण्यासाठी येत्या काळात परवानगी देण्यात येणार आहे. शाळांच्या बांधकामासाठी काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या संस्थांची विश्वासार्हता तपासावी, त्यानंतरच त्यांना बांधकामाची परवानगी देण्यात यावी.
वन विभागाच्या आक्षेपामुळे रस्ते आणि विजेची कामे करण्यात येत असलेली अडचण दूर करण्यासाठी नागपूर येथे सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी काढण्यात येतील. विभागातील लोणार, सिंदखेड आणि शेगाव विकास आराखड्यांची कामे योग्य पद्धतीने व्हावीत. लोणार सरोवराजवळील अतिक्रमण हटविण्यासोबतच सांडपाण्यास पायबंद घालावा, ही कामे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात करण्यात यावीत. बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यानुसारच हा प्रकल्प पूर्णत्वास येईल.
जलसंधारणाची कामे करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आवश्यक असलेली इंधनाची सुविधा जिल्हा योजनेतून करण्यात यावी. कमी खर्चात पांदन रस्ते तयार करण्यासाठी अकोला जिल्ह्याला प्रायोगिक तत्वावर 15 कोटी रूपये देण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील इतर भागातही हा उपक्रम राबविण्यात येईल. कामांवरील खर्च कमी करण्याबरोबरच राज्याचे उत्पन्न वाढविण्याचे स्त्रोत लोकप्रतिनिधींनी सूचवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावरील सर्वच ठिकाणी पोलिस विभागातील वाहने जुनी झालेली आहे. त्या सर्वांना नवीन वाहनांसाठी निधी देण्यात येतील. जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग योग्यरित्या करावा. या निधीचा उपयोग आकांक्षित जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी व्हावा, यासाठी चालू वर्षातील संपूर्ण नियतव्यय उपलब्ध करून देण्यात येतील. अधिकारी यांनी सकारात्मकतेने कार्य करावे. या निधीचा संपूर्ण विनियोग करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Monday, January 27, 2020

सौर ऊर्जा प्रकल्पातून संस्थेची प्रतिवर्ष 50 लाखांची बचत












डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ 
                        पापळ येथे कृषी महाविद्यालयाबाबत पाठपुरावा करणार          
                            - महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 27 : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात 430 केडब्ल्यूपी क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, सचिव शेषराव खाडे, दिलीप इंगोले, हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे अशोक घुसे, प्रमोद देशमुख व संस्थेचे आजीवन सदस्य उपस्थित होते.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संस्थेच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्राच्या रखडलेला अनुदानाचा प्रश्नही सोडविण्यात येईल. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण व कृषी क्षेत्रासाठी मोलाचे कार्य केले. त्यांचा आदर्श मानून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
            शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, शेती, आरोग्य व शिक्षण या तीन क्षेत्रात चांगले काम होणे आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. श्री शिवाजी शिक्षण संस्था ही विदर्भाचा आत्मा आहे. संस्थेच्या पदभरतीतील अडचणी व विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू.   
             संस्थेचे अध्यक्ष श्री. देशमुख, उपाध्यक्ष श्री. ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. खाडे यांनी आभार मानले.
                                                            वर्षाला 50 लाखांची बचत   
            सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रुव्हन कन्सल्टिंग सर्व्हिसेस या कंपनीशी करार करण्यात आला आहे.  त्यातून पुढील 20 वर्षे महाविद्यालयाला 4 रुपये 9 पैसे दराने वीज पुरवली जाईल म्हणजे सुमारे साडे सहा रुपये प्रतीयुनिट बचत होईल. त्यामुळे संस्थेला सुमारे 50 लाख रुपयांची बचत वर्षाकाठी होणार आहे. २० वर्षांपर्यंत कंपनी देखभाल करेल. त्यानंतर प्रकल्प संस्थेला हस्तांतरित केला जाईल.
                                                       ०००

पालकमंत्र्यांकडून महापालिकेत विविध कामांचा आढावा







अपंग, महिला व बालकांसाठीच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा
                                                               -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी शासन स्तरावर प्रस्ताव मांडणार
अमरावती, दि. 27 : प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तेथील अपंग, महिला व बालकांसाठी निधी असतो. त्या निधीचा वापर वेळेत करून त्यांना लाभ दिला पाहिजे. जिल्ह्यातील अपंग, महिला व बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्राधान्याने खर्च करण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी आज महापालिकेच्या शहरातील विविध विकासकामांचा आढावा पालिकेच्या सभागृहात   बैठकीत घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, उपमहापौर सुमन साहू, मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अपंग व्यक्ती कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणाऱ्या निधीतून अपंग कल्याणकारी योजना राबवून अपंगांचे पुनर्वसन करण्यात येते. हा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळेत खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, सर्वच संस्था हा‍ निधी खर्च करतातच असे चित्र नाही. अपंगांच्या पुनवर्सनासाठी त्यांना स्वत:चा रोजगार उभारण्यासाठी अर्थसहाय्य करुन स्वयंपूर्ण करावे. महिला व बालकांसाठी राज्य शासनाव्दारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचा जिल्ह्यातील महिला व बालकांना लाभ मिळावा यासाठी बचतगट, गृहउद्योग, कुटीर व ग्रामोद्योग उभारण्यासाठी मनपाला नियमित निधी प्राप्त होतो. त्या निधीतून महिलांना कौशल्य विकासातून स्वयंपूर्ण व बालकांच्या पोषणासाठी, शैक्षणिक सुविधा आदी कामे नियमित करावी.
            अमृत पाणी पुरवठा, अमृत भूयारी गटार योजने अंतर्गत शहरातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. फेरीवाल्यांसाठी स्पेशल झोन निश्चित करुन या प्रश्नांवर कायमचा तोडगा काढावा. नागरिकांना परवडणारी घर उपलब्धतेसाठी प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुल निर्मितीची कामे विहीत मूदतीत पूर्ण करा. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी, कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता, स्वयंरोजगार कार्यक्रम आदी उपक्रम प्रभावीपणे राबवून महिलांना रोजगाराची साधने उपलब्ध करुन देण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
            जिल्ह्याच्या अंबादेवी तिर्थक्षेत्राला दरवर्षी सुमारे दहा लाखांवर भक्तगण दर्शनाला येतात. त्याअनुषंगाने अंबादेवी तीर्थक्षेत्राला अ वर्ग दर्जा मिळण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन शासनाला सादर करावा. शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या संदर्भात काम पूर्ण करण्यासाठी पोलीस विभागासोबत तातडीने समन्वय बैठक घेऊन नागरिकांची गैरसोय होणार याचा तोडगा काढावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
            अमरावती महानगरपालिका प्रतिष्ठित महानगरपालिका आहे. या संस्थेला वैभव मिळवून देण्याकरीता महानगरपालिकेची नवीन इमारत उभारण्यासाठी शासनस्तरावर मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार असल्याची श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागाला समान निधी वितरण धोरण राबवून सर्वांच्या स्वप्नातील अमरावतीचा विकास घडवून आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            महानगरपालिका अंदाजपत्रक 2019-20, शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा वार्षिक योजना, अमृत पाणी पुरवठा, अमृत भुयारी गटार योजना, हरित क्षेत्र विकास, महिला व बालविकास, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, फिशरीज हब स्थापना, छत्री तलाव सौंदर्यीकरण, शिवटेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, पालखी मार्ग, नागरी दलीत वस्ती सुधार योजना, रमाई घरकुल यांना, घनकचरा व्यवस्थापन, राजापेठ उड्डाणपुल व भूयारी मार्ग, विशेष अनुदान मागणी आदी विविध योजना व कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.
00000


Sunday, January 26, 2020

जिल्ह्यात शिवभोजन योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


अमरावती, दि. 26 : जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी उपाहारगृह येथे झाला.
बाजार समितीसह अमरावती बसस्थानक येथील एस. टी. उपाहारगृह, डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल येथेही शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ झाला. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर, संचालक प्रफुल्ल राऊत, प्रकाश कोकाटे, प्रवीण बिचकुले, उमेश गोरडे, मिलिंद तायडे, प्रवीण भुगुल, सचिव दीपक विजयकर, धीरज कोकाटे, राजेंद्रकुमार भटकर आदी यावेळी उपस्थित होते.
योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पहिली थाळी लाभार्थ्याला दिली. वरण, भात, चपात्या, भाजी आदी विविध पदार्थांचा समावेश असलेल्या या थाळीचा आस्वाद आज अनेक लाभार्थ्यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी यावेळी उपाहारगृहाची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवादही साधला.
शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा आजपासून संपूर्ण राज्यात प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात 50 ठिकाणी प्रारंभ होत आहे. राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना अल्प दरात म्हणजे केवळ दहा रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्‍ध्‍ करुन देणारी ही योजना आहे. गोरगरीबांना पोटभर व दर्जेदार जेवण मिळावे हा योजनेचा हेतू आहे. छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना त्यामागे आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शिवभोजन थाळी योजनेचा हा पहिला टप्पा आहे. अमरावती जिल्ह्यासाठी 500 थाळ्यांचे उद्दिष्ट आहे. भोजनालयात स्वच्छता व शुद्ध अन्नपदार्थ देण्याची भोजनालय चालकाची जबाबदारी असेल. राज्यातील गरीब व गरजू व्यक्तिना केवळ दहा रुपयांत स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन मिळणार असल्याने ही योजना गरीब आणि गरजूंसाठी वरदान ठरणार आहे, असे श्री. नवाल यांनी सांगितले.
एस. टी. उपाहारगृह, डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल येथेही अनेक लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.


Saturday, January 25, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते वैदर्भी मार्टचा शुभारंभ








अमरावती, दि. 26 : उमेद अर्थात राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘वैदर्भी मार्ट’ हे स्वतंत्र दालन सुरू करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला.
विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांच्यासह गटांचे प्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.  
खादी ग्रामोद्योग कार्यालयांतर्गत कस्तुरबा खादी समितीसह विविध 35 स्वयंसहायता समूहांची उत्पादने या दालनात उपलब्ध असतील. कपडे, खाद्यपदार्थ, शोभिवंत वस्तू आदी विविध उत्पादनांचा त्यात समावेश आहे.
या उपक्रमामुळे स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांचे विपणन मजबूत व्हायला मदत होईल, तसेच अधिक रोजगारनिर्मितीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासह उत्पादनांच्या गुणवत्तावाढीसाठीही उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केले जाते.
विविध गटांच्या महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या.
                              000 

राज्यघटनेतील मूल्यांशी बांधीलकी मानून शासनाची वाटचाल - पालकमंत्री यशोमती ठाकूर

प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण 
        





अमरावती, दि. 26 : राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता व एकात्मता या मूल्यांशी बांधीलकी मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी शासनाने किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. त्याद्वारे समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबवून त्यांचा विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.    
          प्रारंभी पालकमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी व लोकशाही गणराज्याच्या निर्मितीसाठी योगदान देणा-या थोरपुरुषांना अभिवादन केले व जिल्ह्यातील समस्त नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत, कर्जमुक्ती, विमा योजनेची पुर्नरचना, शेतमालाला भाव मिळण्यासाठी योजना, दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी पोहचवणारी यंत्रणा, रिक्त पदांची भरती, महिला सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, नागरिकांच्या आरोग्यासाठी एक रुपया क्लिनीक योजना, उद्योगांसाठी सुलभ परवानगी प्रक्रिया, वंचित घटकांच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण अशा किमान समान कार्यक्रमाद्वारे सर्व घटकांचा विकास करण्याचे धोरण आहे. गरीब व गरजू व्यक्तींसाठी शिवभोजन थाळी योजनेचा आज शुभारंभ होत आहे. छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना त्यामागे आहे. जिल्ह्यात शेतीकेंद्रित तसेच औद्योगिक विकास साधत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेक महत्वाची पावले उचलण्यात येत आहेत.
          पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे व शेतीकेंद्रित विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासनाने सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाऊल उचलले. जिल्ह्यात सुमारे 1 लाख 50 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यातून सुमारे 1 हजार 174 कोटी रुपयांचे  कर्ज माफ होणार आहे. जिल्ह्यात गारपीट व अकाली पावसाने झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण रण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. खरीप हंगामात सुमारे 55 हजार शेतकऱ्यांना सुमारे 600 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. रब्बी हंगाम कर्जवाटपाचा लक्षांक 415 कोटी असून ही प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. 
          त्या पुढे म्हणाल्या की, कृषी यांत्रिकीकरण योजना, पोकरा, आवास योजना, उद्योग विकास यासह पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे. कुपोषण निर्मुलनासाठी भक्कम यंत्रणा निर्माण करण्यासह अधिक रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न आहे.  टेक होम रेशन तसेच हॉट कुक मील योजनेत अधिकाधिक बचत गटांना निविदा प्रक्रियेत भाग घेता यावा यासाठी वार्षिक व्यवहाराच्या सरासरीची रक्कम 25 हजार रुपयांवरुन 10 हजार रुपये इतकी कमी करण्यात आली आहे. बचत गटांच्या सहाय्याने स्वयंरोजगाराचे अनेकविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. मागील 3 वर्षामध्ये रिक्त झालेल्या एकूण पदापैकी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची 6 हजार 500 पदे तत्काळ भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी पदभरतीवरील निर्बंध हटवले आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या रिक्त जागा याद्वारे भरल्या जातील. त्याशिवाय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या 45 पदांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत केंद्र शासनाची मान्यता असूनही अनेक अंगणवाड्या कार्यान्वित झाल्या नव्हत्या. त्या 98 अंगणवाडी केंद्र व 745 मिनी अंगणवाडी केंद्र सुरु करण्यास तातडीने मान्यता देण्यात आली असून, या निर्णयांमुळे कुपोषणमुक्तीचा कार्यक्रम गतीने राबविण्यास मदत होईल.
त्या पुढे म्हणाल्या की, राज्यातील 37 हजार 545 अंगणवाड्या खासगी इमारतीत असून, भाड्यापोटी अत्यल्प रक्कम दिली जात होती. त्यामुळे पुरेशा सोयी- सुविधा असलेली इमारत मिळत नव्हती. ग्रामीण, नागरी व महानगरी या तिन्ही क्षेत्रांसाठी केवळ 750 रुपये जुने भाडे होते. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी क्षेत्रासाठी एक हजार रूपये व नागरी क्षेत्रासाठी 4 हजार, तर महानगर क्षेत्रासाठी 6 हजार रूपये भाडे करण्याचा निर्णय घेतला आहे.  बालकांसह महिलांच्या सुरक्षिततेसाठी व आर्थिक उन्नतीसाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी बचतगट चळवळीद्वारे महिला सक्षमीकरण व प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचे केंद्र स्थापन करण्याचा मानस आहे.   
तीर्थक्षेत्र विकास
जिल्ह्यात श्रीसंत गाडगेबाबा स्मृती विकास आराखड्यात ऋणमोचन, शेंडगाव, नागरवाडी व आमला या 4 तीर्थक्षेत्रांचा विकास होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे श्रीक्षेत्र मोझरी, श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे भेट देणाऱ्या नागरिकांसाठी चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, शिक्षणमहर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे विचार, शिकवण, मूल्य आणि दृष्टी यांचा प्रसार करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
          प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जीपमधून फेरी मारून मैदानावरील पथकांचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस पथकासह विविध सुरक्षा दलांच्या पथकांनी कवायती सादर केल्या. विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरवही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
00000

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण







अमरावती, दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते आज सकाळी झाले.सोहळ्यात प्रारंभी ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले.  जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. 
अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, स्नेहल कनिचे, शरद पाटील, मनीष गायकवाड, राम लंके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर,अधीक्षक गजेंद्र मालठाणे,  विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, पालकमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद माळवे, नायब तहसीलदार श्याम देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

00000

अधिक विकासकामांसाठी भरीव निधी मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न - पालकमंत्री यशोमती ठाकूर

नियोजन समितीची बैठक

                        




·        विविध नाविन्यपूर्ण कामांचा अंतर्भाव

अमरावती, दि. 25 : ग्रामीण व शहरी भागातील विकासकामांसह विविध नाविन्यपूर्ण कामांचा अंतर्भाव जिल्हा नियोजनात करण्यात येईल. अधिकाधिक विकासकामे व्हावीत यासाठी निधी वाढवून मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू. प्रशासनानेही गतिमान होत कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार रवी राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त संजय निपाने आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेत सन 2020-21 साठी 219 कोटी 18 लाख रूपये नियतव्यय असून, अधिक विकासकामे व अपेक्षित अतिरिक्त निधी मागणीबाबत चर्चा या बैठकीत झाली.   

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे झाली पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अंतर्भाव नियोजनात करण्यात येईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी साडेदहा वाजता लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामांविषयी बैठक घेण्यात येईल. 
 त्या पुढे म्हणाल्या की,  विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाकडूनही गती मिळणे गरजेचे आहे. कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्राप्त निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. फास्ट फॉरवर्ड होत कामे करावीत. ग्रामपंचायत व इतर महत्वाच्या कार्यालयांच्या जुन्या व शिकस्त इमारती असतील, तिथे नवीन इमारती व गावोगाव अभ्यासिका उभारण्यासाठी निधी देण्यात येईल. ७० गावे पाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाशी सांगड घालण्याबाबत  प्रयत्न करण्यात येईल. तूर खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करावीत.  शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारतींची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील.

 महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची गतीने अंमलबजावणी करावी. अतिवृष्टी व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. क वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पाठपुरावा करण्यात यावा. तिवसा येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे काम तात्काळ सुरू करावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकर मार्गी लागण्यासाठी कॅबिनेट मध्ये पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी स्त्री- पुरुष समानतेसाठी व लिंगभेद विषमता निर्मूलनासाठी योगदान देण्याची शपथ सर्वांनी घेतली. 
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची माहिती देणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...