राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून विकासकामांचा आढावा विहित मुदतीत कामे पूर्ण करावीत - राज्यमंत्री बच्चू कडू
*आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश
अमरावती, दि. 3 : नागरिकांच्या सेवा- सुविधांसाठी विविध सार्वजनिक कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.
उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जलयुक्त शिवार, पांदणरस्ते योजना आदी विविध योजना व कामांचा आढावा यावेळी श्री. कडू यांनी घेतला.
श्री. कडू म्हणाले की, पांदणरस्ते योजना व जलयुक्त शिवार योजनेतील कामे गतीने पूर्ण करावी. जलसंधारणाची कामे करत असताना तेथील खनिज आदी साहित्याचा वापर पांदण रस्त्याच्या कामात करुन घेण्यात यावा. याबाबतचा एकत्रित प्रस्ताव गटविकास अधिकारी यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. उपविभागात 342 पांदण रस्ते प्रस्तावित असून याकरिता स्वातंत्र्य संग्राम सैनिक, गणेश मंडळ कार्यकर्ते तसेच संबंधित गावातील नागरिक व निमशासकीय कर्मचारी यांची तालुकास्तरावर समिती गठित करुन त्या समितीने नवीन पांदणरस्त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जुन्या व नवीन खचलेल्या विहिरींबाबत एकत्रित पंचनामे पूर्ण करावे, अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करावे, पीकविमा योजना व प्रधानमंत्री किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तालुका कृषि अधिकारी यांनी ऑनलाईन द्यावी, असे निर्देश त्यांनी केले. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले की, नागरिकांना वेळेत सेवा मिळाली पाहिजे. सातबारा, फेरफार आदी आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत. अचलपूर तहसील कार्यालयाने आदिवासी बांधवांच्या सुमारे दोनशे जात प्रमाणपत्रांबाबत प्रस्ताव तयार केले आहेत. चांदूरबाजार तहसील कार्यालयात 207 प्रकरणे प्रलंबित आहेत. ती तात्काळ निकाली काढावीत, तसेच शालेय जात प्रमाणपत्र वाटपाबाबत शाळानिहाय कार्यक्रम आखून महा ई-सेवा केंद्राच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना त्वरित जात प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे, असे निर्देश दिले.
00000
Comments
Post a Comment