मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून विकासकामांचा आढावा शेतकरीहिताला प्राधान्य द्यावे - मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश
अमरावती, दि. 3 – नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी बांधव अडचणीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्यासह विविध विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना होणार आहे. त्याची अंमलबजावणी गतीने करावी. गारपीट व अकाली पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करावेत. शेतकरी बांधवांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, शेततळे, कृषी यांत्रिकीकरण योजनेतील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत. वीजपुरवठ्यात नियमितता आणावी. पावसाने कोसळलेले खांब उभारणीचे काम गतीने करावे.
त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कामांना गती मिळावी. त्यासाठीचा निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. सिंचन प्रकल्पाची अपूर्ण कामे कालावधीचे नियोजन करून पूर्ण करावी. विकासकामांची सद्यस्थिती व नियोजन याबाबत परिपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
उपजिल्हाधिकारी अजय लहाने, डॉ. नितीन व्यवहारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment