गो रगरीबांना दिलासा देणारा उपक्रम
- जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 31 : नागरिकांच्या विविध समस्यांचे एकाच ठिकाणी निराकरण राहुटीच्या माध्यमातून होत आहे. राहुटी हा गोर गरिबांना दिलासा देणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज केले.
चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे आज राहुटी उपक्रमांतर्गत विविध योजनांच्या अनेक लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. या अर्जांवर तात्काळ कार्यवाही होऊन सर्व नागरिकांना लवकरच प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांचे वाटप ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार उमेश खोडके यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेचे काम एकाच ठिकाणी गतीने होण्यासाठी ग्रामीण स्तरावर राहुटी हा उपक्रम राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. आज उपक्रमाचा दुसरा दिवस होता.
ब्राम्हणवाडा थडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राहुटीचे आयोजन करण्यात आले होते.
लाभार्थी प्रमाणापत्र, महसूल दाखले, जमिनीचा फेरफार, नवीन शिधापत्रिका, मातृवंदन योजना, बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विद्युत जोडणी, घरकुल योजना, आरोग्य योजना, अपंग प्रमाणपत्र आदी विविध बाबींसंदर्भात प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनीही यावेळी नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. राहुटी उपक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment