गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - मंत्री यशोमती ठाकूर यांचे जिल्हाधिका-यांना निर्देश
शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी
अमरावती, दि. 2 - जिल्ह्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.
श्रीमती ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करुन जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी शासन कटिबद्ध असून शेतकरी बांधवांनी या संकटकालीन परिस्थितीत विचलित होऊ नये. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले आहे.
श्रीमती ठाकूर यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांना तात्काळ नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. श्रीमती ठाकूर या उद्या तिवसा तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांनाही भेट देणार आहेत. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे प्रभावित झालेल्या शेतक-यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या परिस्थिती जाणून घेणार आहेत.
Comments
Post a Comment