कृती दलामार्फत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या
ऊर्वरित समस्या तत्काळ सोडवाव्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 19 : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना करून प्रकल्पग्रस्तांच्या ऊर्वरित प्रश्नांचा तत्काळ निपटारा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आज विधानमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या दूर करण्यासाठी वॉररुम स्थापन करणे, प्रकल्पग्रस्तांना पडिक जमिनी ऐवजी पर्यायी चांगली जमिन देणे, नोकरीत प्राधान्य देणे, प्रकल्पग्रस्तांना पाणी व विजपुरवठा करणे, तसेच धरणाच्या परिसरातील गावांमध्ये पर्यटनासाठी बोटींग सुरू करण्याची परवानगी देणे, पर्यावरण विकास आराखडा राबविणे, पायाभूत सुविधा देणे आदी विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने येत्या तीन महिन्यात प्रकल्पग्रस्तांची माहिती गोळा करून, किती गावांतील नागरिकांची याबाबत माहिती जमा करण्याची राहिली आहे याचा अहवाल देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
यावेळी महसूल, मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शंभूराजे देसाई, मंदा म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम, साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, प्रकल्पग्रस्त कृती समितीचे भारत पाटणकर यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
००००
Comments
Post a Comment