माण, कोरडा नदीतील बंधारे
येत्या पावसाळ्यात भरुन घ्यावेत
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. २७ : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील माण आणि कोरडा नदीतील बंधारे सिंचनाच्या दृष्टीने येत्या पावसाळ्यात भरुन घ्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
विधान भवनात आज यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) आर. व्ही. पानसे आदी उपस्थित होते.
सांगोला तालुक्याची दुष्काळी परिस्थिती पाहता तसेच माण आणि कोरडा नद्यांमधील बंधारे कधीच भरलेले नसल्याचे स्थिती पाहता म्हैसाळ व टेंभू प्रकल्पांमधून हे बंधारे भरुन घ्यावेत. तसेच हे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार गणपतराव देशमुख यांनी यावेळी केली. माण नदीवर कोल्हापूर पद्धतीचे ४५ तर कोरडा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे १४बंधारे आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, सांगोला तालुका हा नेहमी दुष्काळी स्थितीत असणारा तालुका आहे. या तालुक्याचे सिंचन वाढविण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून प्रयत्न सुरु आहेत. तालुक्याच्या वाट्याचे संपूर्ण पाणी तालुक्याला कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच माण आणि कोरडा नदीतील बंधारे सिंचनासाठी सध्या पावसाळ्याच्या कालावधीत भरुन घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
००००
Comments
Post a Comment